Tuesday, September 3, 2024

### कोडिंगचे लॅपटॉप ###

### कोडिंगचे लॅपटॉप ###

 गेले बरेच महिने मी नवीन लॅपटॉप घ्यायचा विचार करत होतो. आपल मोबाईल फोन आणि लॅपटॉप याबद्दल आधीच ठरलं आहे कि मोबाईल फोन हा दर तीन वर्षांनी आणि लॅपटॉप हा दर चार वर्षांनी नवीन घ्यायचा . मोबाईल फोन हा पंधरा हजार रुपये आणि लॅपटॉप हा तीस हजारच्या आतच घ्यायचा . 

आता सध्या वापरत होतो तो लॅपटॉप २०१८ मध्ये घेतला होता . त्यावर इलेक्ट्रोनिक्स आणि मेकॅनिकलसाठी लागणारी सगळी सॉफ्टवेअर अजूनही गुण्यागोविंदाने चालत होती तरीपण वाटलं नवीन घ्यावा . आता नवीन घ्यायचं म्हणजे शोधाशोध आली . वेगवेगळ्या कॉलेजमध्ये मी वर्कशॉप घेत असतो त्यामुळे बऱ्याच प्रकारचे लॅपटॉप दिसतात मग  मुलांनाच विचारायचो कितीला घेतला? . प्रत्येकजण सत्तरहजारच्या वरचीच किंमत सांगायचा . 

गेल्या  दोन वर्षात साठ  हजाराच्या खाली किमतीचा लॅपटॉप घेतलेला  कुणीही  भेटला नाही त्यातच मध्यंतरी चीनमधून आयात बंद केल्याने लॅपटॉपच्या  किंमत वाढल्या असही कळल होत . आजकाल पेपरमध्ये पण ज्या जाहिराती येतात त्यामध्येपण  ऐंशी हजाराच्यावरच लॅपटॉपच्या  किमती असतात . आता काय करायचं? कसतरी पन्नास हजार पर्यंत बजेट वाढवलं पण कुठला लॅपटॉप घ्यायचा ते  सुचेना .

 शेवटी पोराला म्हटलं एखादा पन्नासच्या खाली चांगला लॅपटॉप शोधून काढ  . त्याला विचारल्यावर त्याने झटदिशी नेटवरून शोधून काढलं आणि म्हणाला सध्या १६ जीबी राम आणि ५१६ जीबी एस एस डी मेमरीचा लॅपटॉप ४०००० च्या खाली मिळतोय आणि त्यान शोधून पण काढलं कि कुठे मिळतोय? . मग त्याला घेउनच मी शोरूम ला गेलो . 

तिथ गेल्यावर लगेच आमच एका सेल्समनने स्वागत केलं . मग माझ्या मुलांकडे पहात  विचारलं लॅपटॉप कोडिंगला पाहिजे का ? अर्थात आम्ही होय म्हटल्यावर तो एका बाजूला घेउन गेला . लय भारी भारी लॅपटॉप दाखऊ लागला . सगळे ऐंशी हजाराच्या आसपासच्या किमतीचे होते . मला परत टेन्शन, माझी चुळबुळ सुरु झाली  . सेल्समन माझ्याकडे  बघतच नव्हता त्याच लक्ष्य माझ्या मुलाकडे होत आणि मुद्दा कोडिंग वरून गेमिंग वर आला आणि हे लॅपटॉप  गेमिंगसाठी कसे भारी आहेत ते सांगू लागला . कमी कमी करत त्याने ६५००० हजारच्या पर्यंतचे लॅपटॉप दाखवायला सुरुवात केली .

 मला हे कळेना कि कोडिंगसाठी गेमिंग लॅपटॉप कशाला पाहिजे . मग मी मुलाला त्याने शोधून काढलेल्या  लॅपटॉपविषयी विचारायला सांगितलं मग काय ? सेल्समनच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला  त्याने दुसरा सेल्समन बोलावलं आणि आमच्याबरोबर पाठवला . एका कोपऱ्यात हे लॅपटॉप ठवले होते .अगदी यांची रेंज १८००० रुपये पासुन सुरु होत होते. सध्या मी वापरत असलेल्या लॅपटॉपपेक्षा चागले फीचर्सअसणारा लॅपटॉप अगदी पंचवीस हजाराच्या आत येत होता .

 हे सर्व चालल असताना एक साध कुटुंब आल . अठरा एकोणीस वर्षाच पोरग सोबत पंचवीस  वर्षाच पोरग, आई वडील आणि सोबत वडिलांचा मित्र असावा. ते आत आलेवर लगेच मघाचा सेल्समन त्यांचेकडे गेला.. त्यांना विचारलं कि  लॅपटॉप कुणाला पाहिजे ,तर लॅपटॉप त्या एकोणीस वर्षाच्या मुलाला पाहिजे होता. तो इंजीनियरिंग करत होतो . दुसऱ्या वर्षात शिकत होता... मग काय त्याला सावज मिळालं . दुसरा मुलगा हा त्याचा भाऊ होता आणि सध्या तो आय टी मध्ये होता . कोडिंग वरून विषय गेमिंगवर आला आणि शेवटी नव्वद हजाराच्या पुढचा झगमगीत लायटिंग दिसणारा लॅपटॉपघेउन लगेच गेले.... आणि मला महाग लॅपटॉप गुपित कळल ,खुपच वाईट वाटलं .

आजकाल लोकांच्या हातात पैसा बऱ्यापैकी  खेळायला लागला आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनाची महाविद्यालयाचा सुकाळ झाला आहे त्यामुळे मेरीट हि पद्धत बंद होत चालली आहे. आजकाल  एडमिशन पण लगेच मिळतात .एकदा अडमिशन घेतलं कि इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला पोरग गेलं कि त्याची लॅपटॉपसाठी पिरपिर सुरु होते. पालकाना पण कौतुक वाटत आणि आपलं पोरग अभ्यासात माग पडू नये म्हणून मुकाटपणे त्यांने दाखवेल तो   लॅपटॉप गपगुमान घेऊन देतात. खरच एव्हढ्या महागड्या लॅपटॉपची गरज असते का?

बऱ्याच वेळा लॅपटॉप हा एकदा चांगला  घेतला कि पुढ पाच सहा वर्षे बघायला नको असंही त्याचं मार्केटिंग केलं जात . तस बघायला गेल तर तीन वर्षात तंत्रज्ञान इतकं बदलेलं असत कि  एकदाच महागडा लॅपटॉप घेण्याऐवजी दर तीन वर्षांनी दोन स्वस्त लॅपटॉप घेण कधीही परवडत .

आज ज्यावेळी मी ट्रेनिंग घेत असतो तर अगदी गावाकडच्या विद्यार्थ्याकडेपण लॅपटॉप असतो. किबहुना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासाठी लॅपटॉप हा अनिवार्यच झाला आहे पण खरंच मुलांना लॅपटॉप वापरता येतो का ? अगदी शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्याला सुद्धा लॅपटॉप वापरता येत नाही . अगदी कंप्युटर इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याना सुद्धा विंडोज किती बिट्सची आहे , ऑपरेटिंग सिस्टीम कशी टाकावी ? अगदी डिस्क पार्टिशन कस कराव इतकीही माहिती नसते . 

आज पाहिल्यासारखे  लॅपटॉप मेंटेन करण एव्हढ अवघड राहिलेले नाहीत पण   महागडा लॅपटॉप घेतला आहे म्हणून त्याला इतकं जपलं जात कि त्याच्यावर काही प्रयोग केले जातच नाहीत . अगदी त्याच्या कि बोर्डवरच कव्हर तीन वर्षानंतर पण तसच असत म्हणजे लॅपटॉपचा वापर जास्त केला जात नाही. 

२०१० पूर्वी मुलांच्या  लॅपटॉप मध्ये सोफ्टवेअर , पिक्चर आणि टेक्निकल पुस्तकांचा भरणा  असायचा   . त्यानंतर हळूहळू सोफ्टवेअर आणि टेक्निकल  पुस्तके कमी होउ लागली आणि aptitude परीक्षा आणि मोटिव्हेशनल पुस्तकांची संख्या वाढू लागली , हार्ड डिस्कचा साठवणूक क्षमता वाढू लागलेने  पिक्चर हि  वाढू लागले. २०१५ नंतर टेक्निकल पुस्तके कमी झाली आणि यु ट्युब च्या व्हिडीओ, ओ टी टी वरच्या वेब सेरीज  आणि त्याचबरोबर गेम्सचा भरणा वाढू लागला .लॅपटॉप हे शिकण्याच साधन कमी झालं आणि  मनोरंजनाच साधन झालं. 

आज जर पाहिलं (बघा जरा सहज सर्वे करून ) तर बऱ्यापैकी लॅपटॉपवर गेमिंगची सोफ्तवेअर  आणि वेब सेरीज यांचाच भरणा दिसतो. अलीकडे लॅपटॉप हा शिकण्यासाठी कमी आणि गेमिंग साठीच घेण्याच प्रमाण वाढलं आहे .

कोडिंग च्या नावाखाली गेमिंगचे  लॅपटॉप घेण्यामध्ये पालकांच्या पैशाची नासाडी होत चालली आहे .

तुमची प्रतिक्रिया अवश्य मांडा.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे

Wednesday, August 28, 2024

#### यु. एस. बी. ने लावली इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग शिक्षणाची वाट #####

 ####  यु. एस. बी. ने लावली इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग शिक्षणाची वाट     #####


हो चक्रावलात ना ? पण हे सत्य आहे. आज इलेक्ट्रोनिक्सच्या क्षेत्रात एव्हढी मोठी संधी आहे पण प्रत्येकाला वाटत कि आय. टी. मध्ये गेलं तरच आपल भलं होईल . आज इलेक्ट्रोनिक्सला एडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पण इलेक्ट्रोनिक्स  शिकण्यामध्ये काही इंटरेस्ट उरलेला नाही . ए आय , कंप्युटर गेला बाजार आय टी ला प्रवेश  मिळाला  नाही म्हणून नाईलाजाने इलेक्ट्रोनिक्सला ऍडमिशन घेतो कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आय. टी. कंपनीत प्लेस होतो . जर नाही झाला तर  नंतर सोफ्टवेअरचे कोर्स करतो आणि शेवटी आय. टी. उद्योगात अभिमानाने प्रवेश करतो .  एखाद दुसरे विद्यार्थी असतात ज्यांना कोअरमध्ये जायचे असते पण  त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा त्यांची पूर्वतयारी होत नाही म्हणून नाईलाजाने ते पण शेवटी आय. टी. मध्येच जातात.

आज प्रत्येक क्षेत्रात इलेक्ट्रोनिक्स आहे आणि याचा विचार न करता काही विद्यापीठांनी तर इलेक्ट्रोनिक्सच्या अभ्यासक्रमामध्ये पण आय. टी. ला पुरक ठरणारे  विषय टाकण्याचा आणि त्यासाठी इलेक्ट्रोनिक्सचे महत्वाचे विषयांचा बळी देण्याचा  मूर्खपणा केला आहे. इलेक्ट्रोनिक्स शिक्षण क्षेत्र आपलं अस्मिता विसरून गेलं आहे .  कधी कधी  याला कारण का याच एक मजेदार उत्तर मी सांगतो कि इथं सगळी सर्कीटच आहेत . चला विनोदांच बाजूला ठेवू या आणि मूळ विषयाकड परत येउ या .

सर्वसाधारणपणे २००८ ते २०१२ च्या सुमारास इलेक्ट्रोनिक्स शिक्षणाचा अभ्यासक्रम हा अत्युच्य पातळीवर होता .(आताचा म्हणाल तर त्याच्या तुलनेत कचराच आहे ...त्याबद्दल नंतर कधीतरी) आज ज्या गोष्टींचा बोलबाला आहे त्या  एम्बेडेड सिस्टीम , व्ही एल एस आय , आय सी डिझाईन , आय ओ टी अशा गोष्टी त्या काळात होत्या आणि महत्वाचे म्हणजे यांचे प्रॅक्टिकल पण अतिशय गंभीरपणे व्हायची. मूलंपण छान प्रोजेक्ट करायची. 

पण तेव्हढ्यात एक घोटाळा झाला . सर्व महाविद्यालयात नवीन संगणक येउ लागले आणि या संगणकाना   सिरीयल पोर्ट आणि पॅरॅलल पोर्ट यायचं बंद झालं होत . आता यु एस बी पोर्ट येउ लागलं होत . महाविद्यालयात असणाऱ्या ८०५१ मायक्रोकंट्रोलरना प्रोग्राम करण्यासाठी सिरीयल पोर्ट तर एफ. पी. जी. आय. प्रोग्राम करण्यासाठी पॅरॅलल पोर्टची गरज असायची मग आता काय? . मग जुनेच संगणक वापरण चालू होत . ते पण घाईला येउ लागले . कॉलेजची कीट्स हि लवकर बदलता येत नव्हती नुकतीच नवीन घेतली होती आणि एकदा घेतली तर पुढचे दहा वर्षे तरी ती बदलली जात नाहीत . आता आला का प्रॉब्लेम . त्याच वेळी बाजारात यु एस बी ते सिरीयल कन्व्हर्टर पण आले पण त्याची वेगळीच गंमत . त्याचे ड्रायव्हर मॅच व्हायचे नाहीत.कधी कधी एका पी सी वर व्हायचे तर दुसऱ्या पीसी वर चालायचेच नाहीत .  त्यामुळे आता जरी प्रोग्राम डाउनलोड झाला तर पुढच्यावेळी होईल अशी शाश्वती नसायची . एकच गोंधळ उडाला. त्यामुळे झाल काय जो मायक्रोकंट्रोलरचा पाया शिकण्यासाठी जो सगळ्यात सोपा ८०५१ मायक्रोकंट्रोलर जो होता त्याची किट्सवरील प्रात्यक्षिक बंद करून  त्याला हळूहळू सिम्युलेटर वर शिकवायला सुरुवात झाली . त्याच महत्व कमी करायला सुरुवात झाली. 

त्याच्या ऐवजी पी. आय. सी. मायक्रोकंट्रोलरला महत्व जास्त द्यायला सुरुवात झाली अर्थात तो हि महत्वाचा कंट्रोलर आहे पण ते म्हणजे ज्यांना बडबड गीते जमत नाहीत त्याना कालिदासाची महाकाव्ये शिकवण्याचा प्रकार झाला . मुलांना ते काही कळेना . आता कोणी कबुल करणार नाही पण जवळजवळ ९९% शिक्षकांना पण पी आय सी मायक्रोकंट्रोलर येत नाही ( तसा तो सोपा पण नाही आणि पन्नास मार्काच्या अभ्यासक्रमात  बसण्याइतका   सहज नाही ). मग आता ८ बिट्सचा ८०५१ कळत नाही त्याना ३२ बिट्सचा आर्म कंट्रोलर कसा काय कळणार? ज्यांना पेरिफेरल कसे चालतात हेच कळत नाही तर त्यांना डिजिटल आय.सी. कसे डिझाईन करता येणार? असा एकच गोंधळ उडाला.

आता नवीन बोर्ड जे बाजारात येत आहेत ते चांगले आहेत आणि यु एस बी पोर्ट चांगले चालतात पण मधल्या काळात हळु  हळू मायक्रोकंट्रोलर हा विषय शिकवण्याचा आत्मविश्वास इलेक्ट्रोनिक्स शिक्षण क्षेत्र गमावुन बसलं. आता मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग  शिकवण्यातल कौशल्य संपल  केवळ पाटी टाकायचं काम उरलं आहे. 

एम्बेडेड सिस्टीम ,एफ. पी. जी. ए. प्रोग्रामिंग हे विषय आता ऑप्शनला टाकले जात आहेत . मग आता सांगा जगावर राज्य करणारी एम्बेडेड सिस्टीम ज्याचा मेन चालक मायक्रोकंट्रोलर त्यालाच कसं प्रोग्राम करायचं हे  जर शिकलं नाही तर नोकऱ्या कशा मिळणार ?

कळल का यु एस बी मुळे निर्माण झालेला एक मोठा प्रॉब्लेम .......?

तुमची प्रतिक्रिया अवश्य मांडा.


चित्तरंजन महाजन

डॉल्फिन लॅब्स,पुणे

Thursday, May 9, 2024

****** भारतीय परंपरा , मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन ********

 *

१ .....
खुप वर्षापूर्वी म्हणजे १९८३ साली वाचलेली गोष्ट आहे . त्यावेळी मी तिसरीत होतो . रामकृष्ण मिशनच्या कुठल्यातरी एक पॉकेट बुकमध्ये लिहिलेली होती . त्यावेळी मला या गोष्टीचा अर्थ एव्हढा खोल मध्ये समजला नव्हता पण आज त्या एका गोष्टीत वरील विषयाला समजून घेण्याचा परिपूर्ण संदर्भ आहे .
गोष्ट तशी लहानच आहे . त्यावेळच्या परिस्थितीला ती परिपूर्ण होती पण आजच्या विषयासाठी मी त्यात थोडीशी भर घालेन.
एका गावातील एक मुलगा लहान वयातच घर सोडून तप :श्चर्या करण्यासाठी जंगलात जातो तो बारा वर्षांनी साधू बनून घरी येतो. सगळे लोक त्याचा सन्मान करतात . त्याचा मोठा भाऊ त्याला विचारतो या तपश्चर्या केल्याचे फळ काय ? मग तो साधू भावाला घेऊन नदीकिनारी जातो. आणि नदीच्या पाण्यावरून या तीरावरून चालत पलीकडच्या तीराला जातो आणि परत येतो . साधूला वाटते कि भाऊ कौतुक करील. पण भाउ म्हणतो काय बारा वर्ष तपस्चर्या करून हे इतकंच मिळवलास ? यात कौतुकाच काय आहे? दोन आणे दिले तर नावाडी मला या तीरावरून तिकडे आणि परत मला घेऊन येतो . तू ज्ञानाच्या सागरात तर उतरलास पण मोती आणायच्या ऐवजी गोटे आणलेस . साधूला चूक कळली आणि परत तो जंगलाच्या दिशेने चालू लागला .
तर हि गोष्ट इथेच संपली पण मी थोडा शेवट बदलतो .
ज्यावेळी भाउ साधूला फटकारतो तेव्हा साधू म्हणतो . अरे दादा हे कलियुग आहे . इथे नमस्कार हा चमत्काराला होतो . मी पाण्यावरून चालून जायच्या कार्यक्रमाच आयोजन करेन आणि भक्त मंडळी वाढवून एक वेगळा पंथ निर्माण करेन , मोठमोठे मठ बांधेन आणि बरंच काही करता येईल . अस त्यान थोडस भावाला समजावून सांगितले आणि त्या बरोबर भावाने लगेच त्याचे पट्ट शिष्यत्व स्वीकारले.
२ .....
सुमारे पाच वर्षापासून मी एक व्हिडीओ पाहतोय . अधून मधून तो व्हाटस अप वर मला दिसतो .तुम्ही पण पाहीला असेल आणि शेअर पण केला असेल .
तर ‘गरुड संजीवनी’ नावाची एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. ती फक्त भारतात आढळते आणि काही दाव्यानुसार ती हजारो वर्षापासून आपल्याकडच्या लोकांना माहित आहे . त्या वनस्पतीची जर काडी पाण्यात टाकली तर ती प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहात जाते . जर नळ चालू केला तर त्याच्या धारेमध्ये सुद्धा ती वरच्या दिशेने जाते . मला वाटते कि ज्याच्या फोनवर whats app, फेसबुक , इन्स्टाग्राम आहे त्या सर्वांनी तो पाहिला असेलच . हा व्ही डी ओ पाहणाऱ्यामध्ये भारतातील मोठमोठे नामांकित असतील .
तर सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्याकडील एकालाही वाटलं नाही कि या वनस्पतीचा अभ्यास करावा . जर हा व्हिडिओ खरा असेल तर जवळ जवळ पन्नास पेक्षा जास्त पी एच डी चे टॉपीक यातूनच मिळतील . या वनस्पतीच्या काडीच्या आकाराचे असे काय वैशिष्ठ्य आहे कि ज्यामुळे हि काडी प्रवाहाच्या विरुध्द आहे हे जर कळले तर बऱ्याच गोष्टीमध्ये क्रांती होईल. पण आमच्याकडे या दृष्टीने कधीच पाहिले जात नाही उलट हा चमत्कार मानून ती वस्तू देव्हाऱ्यात ठेवली तर अमुक अमुक लाभ होईल अशा भाकड कथन करून तीची पूजा तर केली जाईल किंवा भरमसाठ पैशात ती विकली जाईल .
आमच्याकडे चमत्काराचा कधी अभ्यास केला जात नाही उलट त्याला प्रश्न केला कि त्याला धर्मविरोधी म्हणणे आणि बहिष्कृत करणे हेच केलं जात . अध्यात्माचा अभ्यास विज्ञानाच्या चश्मातून कधी केलाच जात नाही . उद्या कदाचित पाश्चात्य संशोधकांनी या वनस्पतीच्या काडीच्या आकाराचा अभ्यास करून जर एखादे प्रोडक्ट बनवले तर लोक लगेच एखाद्या पुस्तकाचा आधार देवून गळे काढून हे तंत्रज्ञान भारतातच कस बनलं होत हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतील.
आपल्याकडे हाच मोठा प्रश्न आहे . भास्कराचार्य , जीवक, कणाद, वराहमिहिर , सुश्रुत हे मधल्या काळात कुठे गडप झाले होते. असे कितीतरी लोक आपल्याकडे काळाच्या ओघात गडप झाले.
हळदी मध्ये निरमा पावडर मिसळून हळदीचे कुंकू बनवून दाखवून रोज काही हजारात कमावणारे बुवा अगदी गेल्या दशकापर्यंत होते .
लोकांना सांगण्यासाठी शास्त्र झाली पण शास्त्रज्ञ अस्तंगत झाले. आजच्या काळात तर परिस्थिती खूपच वाईट आहे . लोकांचा प्रवास परत उलटा होत आहे . शास्त्राचा अभ्यास करून सृष्टीचे गूढ सोडवण्या ऐवजी परत चमत्कार आणि बुवाबाजीला उत येत चालला आहे.
आमच्याकडे देशाची सेवा करणारे शास्त्रज्ञ याच्यापेक्षा साधू आणि बुवा जास्त कमावतात . परवा चंद्रावर यान उतरवल त्या इस्त्रोच्या सगळ्या शास्त्रज्ञाच्या टीमच्या एका महिन्याच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा आणि मानसन्मान आपल्याकडचे काही बुवा किंवा महाराज एका दिवसात कमवत असतील.
भारतीय परंपरेत खुप चांगल्या गोष्टी असतील पण त्याचा वैज्ञानिक अभ्यास होत नाही . चमत्कार आणि कर्मकांड यात या गोष्टीच अवडंबर माजवल जात आहे . याला कारण आमच्याकडे नमस्कार हा चमत्काराला मिळतो . त्या चमत्काराच्या मागचे शास्त्र समजून घेउन त्यावर संशोधन करून सध्याच्या काळाला अनुरूप अशा गोष्टी स्वीकारायाची मानसिकता अजूनही तयार झालेली नाही.
आणि इथून पुढ स्वीकारतील अस वाटत नाही ... सध्यातरी एक गोष्ट घडत आहे आपण झपाट्याने उलट्या दिशेने चाललो आहोत. बघू पुढ काय होतंय ते .
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स
९७६३७१४८६०
See insights
Boost a post
All reactions:
Mahesh Waghmare, Dr-Tejashri Mohite Patil and 7 others

^^^^^^नवीन शिक्षण पद्धती – अमुलाग्र बदलाची गरज ^^^^^^


आज काल नवीन शिक्षण पद्धतीवर सगळीकडे विचार मंथन सुरु आहे . अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राने तर हे खूपच मनावर घेतले आहे . बरेच महान वक्ते आणि अभ्यासक यावर विचार मांडत आहेत त्यामुळे माझं लिहीन म्हणजे सूर्यासमोर पणतीचा प्रकाश. पण याचा अर्थ विचार मांडूच नये असा नाही त्यामुळे हे लिहित आहे .
नवीन शिक्षण पध्दती मध्ये बरंच सगळ नवीन आणलं आहे . चांगली गोष्ट आहे. बदल हा घडलाच पाहिजे पण आपल्याकडे बदल हा गांभीर्याने घेतला जात नाही . आपल्याकडे बदल म्हणजे जुन्या बाटलीला नवीन लेबल लावलं म्हणजे झाल . नवीन शिक्षण पद्धतीत आता आता हे बदलायची गरज आहे .आता इथं केवळ बाटलीच नव्हे तर बाटलीच्या आतील पदार्थ सगळंच बदलायची गरज आहे . केवळ हे पदार्थच नाही तर ते पदार्थाचे डोस द्यायची पद्धत सुद्धा बदलायची गरज आहे . या अनुषंगाने विचार केला तर हे करत असतांना महाविद्यालय , स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठे (याठिकाणी विद्यापीठ म्हणजे स्वायत्त विद्यापीठ ज्याला इतर महाविद्यालये जोडलेली नाहीत असा आहे ). यामध्ये द्यायच्या शिक्षण पद्धती मध्ये आमुलाग्र बदल केला पाहिजे . कारण यांचे प्रत्येकाचे उद्देश हे वेगवेगळे आहेत आणि यातील सीमारेषा अगदी धूसर आहे . तसा हा विषय खूपच मोठा आहे त्यामुळे हळूहळू बदल कुठे झाले पाहिजेत यावर जमेल तस लिहित जाईन .
बदल करत असताना सध्याचा जो एक तास एक विषय हा असा एका दिवसात चार विषय थेअरी आणि एक प्रॅक्टिकल ढाचा हा मोडला पाहिजे . किमान विद्यापीठ पातळीवर तर झाला पाहिजे . थेअरी आणि प्रॅक्टिकल हे आता वेगवेगळ घ्यायची पद्धत पण आता मोडीत काढली पाहिजे . मुळात विषयांची जी अनावश्यक संख्या वाढवली आहे ती कमी केली पाहिजे आणि तास पद्धती ऐवजी सुरवातीला आठवड्यातून तीन तीन दिवस एक विषय असे दोन विषय एका आठवड्यात शिकवणे असे स्वरूप ठेवले पाहिजे.
सुरुवातीच्या काळात प्रात्याक्षिके झाली पाहिजे . विद्यार्थ्याला विषयाची ओळखच हि प्रात्यक्षिकातून झाली पाहिजे मग त्या विषयाची मांडणी हळूहळू विषय जाणून घेणे आणि नंतर त्या विषयाची खोली वाढवत नेणे असा प्रवास झाला पाहिजे . म्हणजेच सेमिस्टरच्या सुरुवातीला पहिल्या महिन्यात एक विषय तीन दिवस असे स्वरूप पाहिजे . नंतरच्या महिन्यात एक विषय एक दिवस आणि तिसऱ्या महिन्यात मग एक तास एक विषय अस स्वरूप झाल पाहिजे .
सुरुवातीला विचार केला तर हे अवघड वाटेल पण जर शांतपणे विचार केला तर हे एकदम सोप आहे .उलट या पद्धतीत बऱ्याच गोष्टीची कटकट कमी होईल.
आता या प्रकारे विषय शिकवण्यासाठी विषय शिकवण्याच्या पद्धती मध्ये पण बदल करायला लागेल . अभ्यासक्रमाचा ढाचा हा पूर्णपणे बदलावा लागेल. विषय हे प्रात्यक्षिकच्या रुपात मांडले जातील त्यामुळे विध्यार्थाना पण विषय चांगले समजतील.
सध्याचा अभ्यासक्रम हा नरसाल्याप्रमाणे आहे ज्यामध्ये विद्यार्थी हा मोठ्या बाजूने आत जातो आणि बाहेर येताना तो निमुळत्या बाजूने येतो . म्हणजेच तो जसजसा तो शिकत जातो तसा त्याचा फोकस हा कमी होत जातो त्यामुळे त्याला बाहेर संधी मिळत नाही . त्याउलट आता अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलले पाहिजे ज्यामध्ये हळूहळू विध्यार्थ्याचा फोकस वाढत गेला पाहिजे . ज्यावेळी तो शिकून बाहेर पडेल त्यावेळी त्याला संधीच संधी दिसल्या पाहिजेत .
लेख थोडासा अपूर्णच आहे .मुद्दाम विचारमंथन व्हावं यासाठी अपुरा ठेवला आहे ...
तुमच्या विचारांचे स्वागत .......
चित्तरंजन महाजन
९७६३७१४८६०
डॉल्फिन लॅब्स

**** आकाशी झेप घे रे पाखरा ********


सर्व साधारणपणे २०१५ -१६ ची गोष्ट असेल . एक दिवस अचानकपणे इंगळे सरांचा फोन आला . त्यांचे एक मित्र होते वानखेडे म्हणून त्यांच्या मुलासाठी सल्ला पाहिजे होता . मग मी वानखेडेना मुलाला शुभमला घेउन डॉल्फिन लॅब्स मध्ये बोलावल.
अक्खी फॅमिलीच आली . विचारपूस करताना कळल कि वानखेडे साहेब हे महावितरण मध्ये मोठ्या पोस्टवर काम करत होते आणि त्यांचा मोठा मुलगा सिंहगड कॉलेज वडगाव मध्ये इलेक्ट्रोनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन शिकत होता . पहिल वर्ष झाल आणि अचानक पणे काय झाल दुसर वर्ष शिकताना त्याचा अभ्यासातुन इंटरेस्ट गेला होता. त्याच वर्ष डाउन झाल होत . नंतरही त्याची अभ्यास करायची इच्छा उडून गेली होती . त्यामुळे विषय सुटत नव्हते . घरात बसून निव्वळ एका मोठ्या स्क्रीन च्या संगणकावर बसून रात्र रात्र फक्त व्हीडीओ गेम खेळत बसायचा . अजिबात अभ्यास करत नव्हता . पुढ शिकायची इच्छाच संपली होती .त्यामुळे दोघ नवरा बायको पण जाम टेन्शन मध्ये होते .
बोलत असताना माझ लक्ष्य शुभम कडे होत . कशीतरी दाढी वाढली होती , चुळबुळ चालू होती आणि डोळे पण अस्थिर होते . कदाचित व्हीडीओ गेम जास्त खेळत असल्याचा परिणाम होता . चार शब्द बोललो तर त्यामध्ये आत्मविश्वास नव्हता . हे लोक पार करियर कौन्सिलरचा सल्ला घेउन आले होते . पार ब्रँच बदलून आर्ट्स किंवा कॉमर्सला अॅडमिशन घेण्यापर्यंत विचार चालू होता . अगदी शेवटचा पर्याय म्हणून माझेकडे आले होते .
मी मग पालकांना थोड चहाच्या निमित्ताने बाहेर पाठवलं आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात केली . सुरुवातीला त्याच्या बोलण्यात काहीही सुसंगतपणा नव्हता काहीही उडवाउडवीची उत्तरं देत होता . मग मीच थोडस झापलं. आणि त्याला जाणीव करून दिली कि त्याला शेवटची संधी आहे विचार करण्याची . मग तो सांगू लागला कि कॉलेजमध्ये फक्त थेअरी होते आणि प्रॅक्टिकल जास्त डिस्कस केलं जात नाही त्यामुळे त्याचा इंटरेस्ट संपला होता. नेमकी कळ सापडली .
मग पुढ बोलन चालू झाल . जर त्याला सर्व प्रक्टिकली शिकवलं तर शिकशील का ? तो होय म्हणाला .
लगेच त्याच्या आई वडिलांना आत बोलावलं आणि प्लानिंग सुरु केल. त्याचे बरेच विषय राहिले होते . दुसऱ्या सेमची इनसेम पण जवळच आली होती . मग त्याला डॉल्फिन लॅब्स जॉईन करायला सांगितली . त्याचबरोबर मी माझे सहकारी सीमा राजपूत मॅडम , नचिकेत गायकवाड सर , भरते सर , यावले सर यांच्यासोबत चर्चा करून त्याला थोड शिकवण्यासाठी विनंती केली . हे शिक्षक म्हणजे विषय अगदी कोळून पिलेले असल्याने मला खात्री होती . त्यांनीपण माझ्या विंनतीला मान देउन त्याला शिकवायची तयारी दाखवली .
मग त्याचा दिनक्रम ठरवला. दिवसातील काही वेळ कॉलेजमध्ये येउन विषयाचा अभ्यास . त्यानंतर डॉल्फिन लॅब्सला प्रॅक्टिकल हँड्सॉन सुरु झाल .इन सेम झाली .पेपर चांगले गेले . मग त्यालापण हुरूप आला . अभ्यास करू लागला . शिक्षकांच्या उत्तम मार्गदर्शनामुळे तिसऱ्या वर्षाला गेला . आता गाडी रुळावर आली होती .
पुढे त्यान एम एस केलं आणि सध्या अमेरिकेत एक चांगल्या कंपनीत काम करत आहे ...
डॉल्फिन लॅब्सच्या मुळे अजुन एक आयुष्य मार्गाला लागलं...