Friday, September 6, 2019

**** पायथॉन प्रोग्रामिंग ****

**** पायथॉन प्रोग्रामिंग ****
गेल्या महिन्यात एका असेच एक सर भेटले होते. सर सांगत होते कि त्यांचेकडे स्वायत्त अभ्यासक्रम आल्यामुळे त्यांनी आता अभ्यासक्रम काळानुसार बदलला आहे. अगदी पहिल्याच वर्षी पायथॉन प्रोग्रामिंग टाकले आहे आणि आता दुसऱ्या वर्षी मशीन लर्निंग टाकणार आहेत. ज्यामुळे मुलांना आधुनिक ज्ञान मिळेल . असं बरच काही मोठ्या उत्साहाने सांगत होते.
घरी आलो आणि सहज विचार मनात आला कि खरच असा अभ्यासक्रमात विषय टाकून काय फायदा होईल का ? आतापर्यंत असे कितीतरी प्रयत्न झाले आहेत. आपल्याकडे अभ्यासक्रमात विषय टाकला कि काम झाल अस होत पण तो विषय कसा घेतला पाहिजे याविषयी व्यवस्थितपणे मार्गदर्शन केले जात नाही. मुळात तो अभ्यासक्रम ज्याने तयार केला आहे त्याला त्या तंत्रज्ञानावर काम केलेचा अनुभव नसतो . तीन चार विदेशी विद्यापीठातील अभ्यासक्रम त्यांच्या वेबसाईटवर पाहून त्याच्यातील प्रत्येकातील काही भाग घेउन आपला अभ्यासक्रम तयार केला जातो.
हा अभ्यासक्रम तयार केल्यावर त्याच्या प्रयोगशाळा बनविण्याबाबत तर आनंदी आनंदच असतो.
ती लॅब विकसित करताना बजेटमध्ये कपात केली जाते . जेव्हढ कॉम्पुटरवर करता येईल आणि ज्याला खर्च येणार नाही अशी प्रात्यक्षिके घेतली जातात . ज्याला पैसे लागतील ती अभ्यासासाठी बाजूला ठेवलं जात .आणि हेच प्रात्यक्षिक महत्वाची असतात . म्हणजे स्वप्न वाघाच बघायचं , तयार करताना मांजर बनवायचं आणि शेवटी उंदीर दाखवायचा आणि त्याला पाहून वाघ इमॅजीन करायचा ... आहे कि नाही मज्जा .
१९९२ ते २००२ पर्यंतचा काळ आठवा . अगदी आर्ट्स आणि कॉमर्सचे विद्यार्थी पण सी ,सी ++ शिकायचे त्यांना त्याचा काहीही उपयोग झाला नाही . अगदी इंजिनियरिंग मध्ये सुद्धा सी,सी ++ शिकवून काहीही उपयोग होत नाही. कारण मुलांना अप्लिकेशन वर काम करायला मिळतच नाही. अगदी तीच अवस्था या पायथॉन ची येत्या दोनचार वर्षात होणार आहे.
पायथॉन प्रोग्रामिंग हे शिकवत असताना वेगवेगळ्या शाखातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. कॉम्पुटरच्या विद्यार्थ्यासाठी त्यांची अॅप्लिकेशन वेगळी असतील इलेक्ट्रॉनिक्ससाठी वेगळी असतील हेच लक्षात घेतलं जात नाही . इलेक्ट्रॉनिकच्या विद्यार्थ्यांना जर शिकवायचं तर हार्डवेअरवर शिकवलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात घेउनच अभ्यासक्रम बनवून तो शिकवला पाहिजे नाहीतर कॉम्पुटरच्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे शिकवतात तसाच जर इलेक्ट्रोनिक्सच्या विद्यार्थ्यांना शिकवला तर त्याच महत्व राहाणार नाही.
जर आतापासून जर खबरदारी घेतली नाही तर आज ज्या पायथॉन आणि मशीन लर्निंगचा हे उदो उदो करतात बघा अजून चार वर्षात त्याची किंमत शून्य होते कि नाही. कारण ज्या गोष्टीचा उपयोग नाही ती गोष्ट कचरा होते आणि एकदा कचरा झाली कि ती शून्य होते. हे जागतिक सत्य आहे .
आपले विचार ऐकायला नक्कीच आवडेल .
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,
शॉप नं. १०, केक स्टोरीच्या मागे , वेताळबुवा चौक , नऱ्हे, पुणे. ४११०४१ .
फोन – ९७६३७१४८६०
कृपया शेअर करा

*अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग ३ * **** अभियांत्रिकी शिक्षणाची ओळख आणि पालकांनी घ्यायची काळजी *****

**** अभियांत्रिकी शिक्षणाची ओळख आणि पालकांनी घ्यायची काळजी *****
*अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग ३ *
अभियांत्रिकी शिक्षण हा चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे. प्रत्येक वर्ष हे दोन सत्रात (सेमिस्टरमध्ये) विभागलेले असते म्हणजेच हा आठ सत्राचा अभ्यासक्रम आहे.
प्रत्येक सत्रामध्ये पाच विषय असतात आणि या पाच विषयातील काही विषयांना प्रात्यक्षिक,,, घेतली जातात. प्रत्येक विषयाची लेखी परीक्षा घेतली जाते आणि ज्याविषयाची प्रात्यक्षिक घेतली जातात त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. काही विषयाची तोंडी परीक्षा घेतली जाते.
याच बरोबर अधिकचा अभ्यास म्हणून विध्यार्थ्यांना स्वाध्याय (असाईनमेंट्स) दिला जातो. काही ठिकाणी वरचेवर क्लास टेस्ट घेतल्या जातात.
विद्यार्थ्यांचे पूर्ण सत्रातील त्याची कार्यक्षमता पाहून त्यावर टर्मवर्कसचे मार्क्स दिले जातात. टर्म वर्कसचे मार्क्स देताना विद्यार्थ्याची वर्गातील अटेंडंन्स, प्रॅक्टिकलची अटेंडंस , त्याला मिळलेल्या क्लास टेस्ट मधील मार्क्स आणि त्याची एकूण वर्तणूक हि ध्यानात घेतली जाते.
याच बरोबर पदवीच्या दुसऱ्या वर्षी एक लहान, तिसऱ्या वर्षी मध्यम आणि शेवटच्या वर्षी एक मोठा प्रकल्प (प्रोजेक्ट ) करायचा असतो . सर्वसाधारणत: या प्रकल्पावरच सेमिनार घेतले जातात.
म्हणजेच एका सत्रात खालील प्रकारे परीक्षा असतात :-
पाच विषयांचे पेपर : ५
दोन/चार विषयाच्या प्रक्टिकल परीक्षा :२
एक किंवा दोन विषयाच्या तोंडी परीक्षा (ओरल ) : १
एक / दोन विषय टर्म वर्क : १
टेस्ट १ : ५
टेस्ट २ : ५
प्रिलीयम: ५
असाइनमेंटस( प्रत्येक विषयाच्या सहा ): एकूण ३६
म्हणजेच अभियांत्रिकीच्या चार वर्षात एक विद्यार्थी इतक्या परीक्षा देत असतो .
पाच विषयांचे पेपर : ५ * ८ =४०
दोन/चार विषयाच्या प्रक्टिकल परीक्षा :२ *८ = १६
एक किंवा दोन विषयाच्या तोंडी परीक्षा (ओरल ) : १*८ =८
एक / दोन विषय टर्म वर्क : १ *८= ८
टेस्ट १ : ५*८ = ४०
टेस्ट २ : ५ *८ =४०
प्रिलीयम: ५*८ = ४०
असाइनमेंटस( प्रत्येक विषयाच्या सहा ): एकूण ३६ * ८= २८८
याशिवाय सेमिनारस , मायक्रो /मिनी/मेगा प्रोजेक्ट्स ,सर्व्हे रिपोर्ट , इंटर्नशिप रिपोर्ट्स इतकं सार असत. भारतातील अभियांत्रिकीच शिक्षण तसं पाहिलं तर जगातील सगळ्यात अवघड शिक्षण मानल पाहिजे .
अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना मुलाला परीक्षेला विद्यापीठाच्या परीक्षेला बसण्यासाठी ७५ टक्के अटेंडंस हि गरजेची असते. काहीवेळा मुलं नाही पूर्ण करत अशावेळी महाविद्यालये पण सहानुभूतीपूर्वक विचार करतात . पण काही मुलांना तो हक्क वाटतो. प्रॅक्टिकलला कधीही येत नाहीत . डायरेक्ट प्रॅक्टिकल परीक्षेला येतात तिथंही प्रॅक्टिकल व्यवस्थित करत नाहीत . मग नापास होतात. पण थेअरी परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतात मग बोंब मारत सुटतात कि शिक्षकांनी मुद्दाम नापास केल आणि मग पालक पण त्यांची बाजू घेउन भांडायला येतात अशावेळी त्यांची कीव येते. शिकली सावरलेली हि पालक मंडळी ज्यावेळी मुलानी केलेली चूक जाणून घेउन त्याला चार शब्द सुनावण्याऐवजी शिक्षकांना दोष देतात अशावेळी खूपच वाईट वाटत . आपण आपल्या मुलाची बाजू घेउन स्व:ताच नुकसान किती करून घेतलंय नंतर त्या मुलांनं महाविद्यालय बुडवून केलेले पराक्रम बघितल्यावरच कळतंय. माझी पालकांना एक नम्र विनंती आहे कि मुलाची बाजू घेउन स्वत:च नुकसान करून घेउ नका.
मी बऱ्याच वेळा म्हणत असतो कि शेतकरी दादा तू एकदा बी पेरल्यावर दररोज मशागतीला शेतात जातोस . पोराच्या बरोबरीन त्याची काळजी घेतोस . त्यासाठी त्याच पान आणि पान तपासून बघतोस त्याला काही कीड लागली का? मग स्वत :च्या पोराची प्रगती बघायला जायला तुंला महिन्यातून एकदा तरी का सवड मिळत नाही?. पोरग अभियांत्रिकीला घातलं असेल बघ विचार कर . महिन्यातून एकदा तरी त्याच्या कॉलेजला भेट दे , त्याच्या शिक्षकांशी बोल , त्याची प्रगती कशी आहे हे विचार , त्याला पुढे जाण्यासाठी काय कराव लागेल यांच्याविषयी त्यांच्याशी बोल. मग बघ ते शिक्षकही त्याची व्यवस्थित काळजी घेतील. उगाच मार्कांनी सुजवलेली ग्रेड तुझ्या पोरांच्या पदरात टाकण्याऐवजी प्रात्यक्षिक ज्ञानातून तावून सुलाखून मिळवलेल्या खऱ्या इंजिनीयरिंगची पदवी मिळेल . तुझ पोर पण अस घडलेल असेल कि त्याच्यासाठी संधीची दारेच काय तर संधीच हात जोडून उभी राहील .
बघ दादा , यावेळी एव्हढ करच. महिन्यातून एकदातरी पोरांच्या शिक्षकांना भेटच ..................
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
*मुल इंजिनियरिंग शिकतात तर डॉल्फिन लॅब्सचा नंबर तुमच्या मोबाईलवर अवश्य सेव्ह करा आणि काही माहिती पाहिजे असेल तर अवश्य फोन करा*
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग २. **** अभियांत्रिकी शिक्षणाचे अर्थशास्त्र ****

**** अभियांत्रिकी शिक्षणाचे अर्थशास्त्र ****
अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग २.
चर्चा करत असताना बरेचजण मला माझे मत विचारत असतात कि अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता कशामुळे ढासळली तर त्याला कारणे भरपूर आहेत पण सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे पालक आणि त्यांचे लाडावलेले पाल्य . पालकांना या शिक्षणाचे गांभीर्य राहिलेले नाही. पाल्याच्या सगळ्या चुकांना पाठीशी घालत असताना, त्यांची वकिली करत असताना त्यांना आपण स्वत: स्वतःचच नुकसान करून घेतोय हेच कळत नाही . पाल्य कॉलेजला आला नाही म्हणून त्याला जाब विचारणेऐवजी त्याच्या शिक्षकांना तो गैरहजर का राहिला याची काहीतरी केविलवाणी कारणे देत असतात . विद्यार्थ्यांना पण शिक्षणाचं गांभीर्य नाही . अभियांत्रिकी शिक्षण आणि कला, वाणिज्य शाखेतील शिक्षण यामध्ये असणारा फरक त्यांच्या लक्षात येत नाही. ते अभियांत्रिकी शिक्षणाकडे त्याच दृष्टीने पाहत असतात. अभियांत्रिकी शिक्षणाचा भर हा प्रॅक्टिकल आणि चालू मार्केट यावर जास्त असतो . इथ विषयांच्या अभ्यासाची खोली हि झपाट्याने बदलत असते. पुस्तकातल्या विषयाबरोबरच इतर अवांतर गोष्टींचा अभ्यास लागतो . कलेच्या शाखेच्या विद्यार्थ्याला कलेचा अभ्यास करावा लागतो ,वाणीज्यच्या विद्यार्थ्याला वाणिज्य पण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासासोबत कला , वाणिज्य आणि विज्ञान या सगळ्यांची माहिती असणे चांगल असत. त्याच्यासाठी पुस्तकात किंवा अभ्यासक्रमात जितक असत त्यापेक्षा जास्त माहिती त्याला इतर लागत असते हे त्याला कळतच नाही . मग तोही त्यांच्या प्रमाणे लेक्चर , प्रॅक्टिकलला बंक मारायला लागतो . वर्ग आणि प्रयोगशाळेपेक्षा त्याचा वेळ कँटीन, कट्टा आणि इतर गोष्टीतच जास्त जातो.
आता पालकांनी आणि पाल्यांनी अभियांत्रिकी शिक्षण गांभीर्याने घेतलं पाहिजे . हे शिक्षण म्हणजे एक गुंतवणूक आहे हे त्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे . त्यांनी त्यांच्या पाल्यांच्या खर्चाचा नव्याने हिशोब लावायला सुरुवात केली पाहिजे आणि या गुंतवणुकीचे नियम आणि जोखमी ध्यानात घेतल्या पाहिजेत. आता पालकांनीच विचार करावा .
एका मुलाची एका वर्षाची फी :- ९०,०००/- रु.
जेवणाचा खर्च जवजवळ :- २४,०००/- रु.
राहण्याचा खर्च जवळजवळ :- २४,०००/- रु.
पॉकेटमनी आणि इतर खर्च :- २४,०००/- रु.
एक वर्षाचा खर्च जवळजवळ :- १,६२,०००/- रु.
म्हणजे पाल्याचा एका वर्षाचा खर्च जवळजवळ १,६२,०००/- रु. ( एक लाख बासष्ट हजार रुपये मात्र ) होतो. ज्यांना शिष्यवृत्ती मिळते त्यांचा बराचसा खर्च हे करदाते करत असतात.
आता या खर्चाची विभागणी पाहू या ...
एका सत्र शिकवण्याचे दिवस : ९०
एका वर्षातले शिकवण्याचे दिवस : ९०+९० = १८०
म्हणजेच एक दिवसाची शिकण्याची किंमत : १,६२,०००/ १८० = ९००
एका दिवसात असणारे तास :६
एका तासाची किंमत :९००/६ = १५०
एका मिनिटाची किंमत : २ रु. ५० पैसे
पालकांना आणि पाल्यांनाही हे कळणे गरजेचे आहे कि एक तास बुडतो म्हणजे १५० रु. बुडले आणि एक दिवस कॉलेजला दांडी म्हणजे जवळजवळ ९०० रु. वाया गेले . ज्यावेळी पालकांना हि जाणीव होईल कि आपल्या पाल्यांने कॉलेजला एक दिवस दांडी मारली तर ९०० रुपये बुडाले,त्यावेळी तो आपल्या पाल्यांला एक दिवस काय एक तासही शाळेला दांडी मारून देणार नाही. मुलाने कॉलेजला दांडी मारली म्हणजे कॉलेजचे नुकसान नाही तर त्यांचेच नुकसान आहे . वर काही मुल तर कॉलेजला दांडी मारतातच आणि क्लास पण लावतात म्हणजे हा अधिकचा भुर्दंड. या मुलानापण अक्कल पाहिजे कि आपण दांडी मारतो म्हणजे आपण आपल्या आई वडिलाची दोन तीन दिवसाची कमाई वाया घालवतो. एक एक रुपया वाचवून पाल्याच्या भविष्यासाठी पैसे लावायचे आणि हे महाराज दांड्या मारून हजाराने उडवणार .
ज्यावेळी हे अर्थशास्त्र पालकांना कळेल त्यावेळी खऱ्या अर्थाने अभियांत्रिकी शिक्षणाच्या बदलायला सुरुवात होईल .
कृपया शेअर करा ......
धन्यवाद .
या पूर्वीचे लेख आणि लेखमाला वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
चित्तरंजन महाजन .
९७६३७१४८६०
www.dolphinlabs.in