Monday, February 25, 2019

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग 35 )

*** शिक्षण संस्थाची समाजाशी तुटलेली नाळ ***
तुम्हाला एक वर्षाची करायची तजवीज करायची असेल तर बी पेरा, दहा वर्षाची करायची असेल तर पैसे पेरा आणि कायम स्वरुपाची करायची असेल तर माणसे पेरा – अनामिक लेखक.
जानेवारी महिना सुरु झाला कि सगळी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्र निकेतनं खडबडून जागी होतात. सर्वाना वेध लागतात अॅडमिशनचे. मग काय नवनवीन कल्पनांना ऊत येतो . कुणी मेळावे घेतो, कुणी शिबिरे घेतो, कुणी स्पर्धा घेतो तर कुणी कसली कसली ऑलिम्पियाड घेतो. या सर्वामागे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयाची जाहिरात करणे हाच हेतू असतो. मग यासाठी वेगवेगळे क्लास , शिक्षण संस्था यांना हाताशी धरले जाते . क्लास वाले , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्था पण आता हुशार झाले आहेत . वाहणाऱ्या गंगेत हात कसा धुवुन घ्यायचा हे त्यांना पण कळल आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि महाविद्यालयात असणाऱ्या शिक्षकाविषयी असणारा त्यांच्या मनातील आदर कमी झाला आहे . यामध्येपण सेटिंग, कमिशन वगैरेसारख्या गोष्टी आता यायला लागल्या आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयांची आणि तंत्र निकेतनांची संख्या वाढली आहे त्यामुळे या गोष्टी आता नाकारता येत नाहीत. पण एक नवीन आणि चुकीचा पायंडा पडत चालला आहे जो घातक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे म्हणून त्यांचेपुढे जे चित्र रंगवले जाते किंवा त्यांचेपुढे जे वायदे केले जातात त्यावर भुलून जे अॅडमिशन घेतात त्यांचा नंतर अनुभव चांगला नसतो. यामुळे काही महाविद्यालयांना ज्या ठिकाणाहून अॅडमिशन झाली होती त्या भागात परत तोंड दाखवता येत नाही .
अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तंत्रनिकेतन मालकीची असणाऱ्या बऱ्याच शिक्षण संस्थांची माध्यमिक , उच्च माध्यमिक विद्यालयेपण आहेत . पण हि विद्यालयात शिकणारी मुले संस्थेच्याच तंत्रनिकेतन मध्ये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश करत नसतील तर त्या संस्थेच कुठेतरी नक्कीच चुकत आहे . सातारामधील एका बलाढ्य अशा शिक्षण संस्थेला त्यांच्या तंत्रनिकेतनला किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाला पुरेसे विद्यार्थी मिळत नसतील आणि त्यांना जण विद्यार्थी मिळवण्यासाठी भटकायला लागत असेल तर परिस्थिती खरीच विचार करण्यासारखी आहे. त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे जर संस्थेच्याच तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी जर संस्थेच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात येत नाहीत याचा अर्थ काय काढायचा हे प्रत्येकांनी ठरवलं पाहिजे.
आपला विद्यार्थी हीच मोठी जाहिरात आहे हेच सगळे जण विसरून गेले आहेत . विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्याचं सामाजिक भान जागृत करून त्यांना समाजाशी जोडणं हेही महत्वाचं आहे याची जाणीव कुणालाही नाही . जर या विद्यार्थ्यांना समाजाशी जोडत गेलो तरच एक अखंड साखळी तयार होईल आणि त्या महाविद्यालयाची समाजात किंमत वाढेल हे सोपं गणित आहे. पंचवीस वर्षापेक्षाही जास्त अनुभव असणाऱ्या महाविद्यालयांची अवस्था हि आज खूपच वाईट आहे. त्यांचा अभ्यास केला तर असे दिसून येईल कि मध्यंतरीच्या काळात ते समाजापासून तुटले गेलेले आहेत.
आता परत महाविद्यालयांनी विचार केला पाहिजे आणि आहेत त्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून असे कार्यक्रम राबवले पाहिजे कि ज्यामध्ये समाजाचा फायदा होईल . एक निरंतन अशी ज्ञानदानाची प्रक्रिया राबवली पाहिजे ज्यामुळे विद्यार्थ्यामध्ये त्या महाविद्यालयाची छाप पडली पाहिजे. कुठ रक्तदान शिबिरे घेणे, वाहतूक नियंत्रण करणे हि कामे महाविद्यालयाच्या जाहिरातीसाठी करणेपेक्षा शेती, शिक्षण, संरक्षण आणि आरोग्य यासाठी उपयोगी अस कमीत कमी खर्चाच्या तंत्रज्ञान निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण संस्थांनी आता समाजाशी जुळवून घेतलं पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ४१ )


*** आता ज्ञानाच्या पेटवू मशाली   ***
एकदा एका शेतकऱ्याच्या हातून मोठी चूक झाली म्हणून त्याच्यावर देव रागावला आणि त्याने शेतकऱ्याला शाप दिला कि पुढची बारा वर्ष त्याच्या शेतात पाऊस पडणार नाही. त्याच्या घरातील सगळी दु:खी झाली, सगळ्यांच्या  डोक्यात उद्यापासून काय करायचं  हा प्रश्न पडला . पण दुसऱ्या दिवशी शेतकरी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठला आणि बैल जुपून शेताकडे जायला निघाला . घरातले सगळे आश्चर्य चकित झाले. त्यांनी शेतकऱ्याला समजावले कशाला जायचे शेताला ? आता कशाला करायची मशागत आणि पेरणी ? जर प्रत्यक्ष देवानेच सांगितले आहे कि पाउस पाडणार नाही मग कशाला वेळ, पैसा आणि मेहनत वाया घालवायची? शेतकरी म्हणाला कि मलाही माहित आहे कि आता इथून पुढे बारा वर्ष आपल्या शेतात पाउस पडणार नाही पण म्हणून जर या बारा वर्षात आपण मेहनत केली नाही तर आपण सगळेच मेहनत करायचेच विसरून जाऊ. हि आपल्या घरातील नवीन पोरं जी आता आठ दहा  वर्षाची आहेत त्यांना  बारा वर्षांनी माहितीही होणार नाही शेतात काय करायचं असत. जमीन ओसाड माळरान बनून जाईल, जमीन  नापीक बनेल, सगळी हत्यारे गंजून जातील , ती हत्यारे  वापरायची कशी हे पण आपली पुढची पिढी विसरून जाईल आणि ज्यावेळी पाऊस पडायला सुरवात होईल त्यावेळी आपल्यामध्ये शेतीविषयक ज्ञान काहीही राहणार नाही आणि बारा वर्षानंतर पुढे कायमची शेती हा विषय  आपल्या खानदानातून कायमस्वरूपी निघून जाईल. म्हणून म्हणतो चला उठा सगळे आणि नेहमीप्रमाणे कामाला जाउया आणि आपल्यातील शेतकरी जिवंत ठेऊयात.
गोष्ट तशी लहानच आहे पण यामध्ये अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रासाठी खूपच मोठा संदेश लपला आहे . हि वरची गोष्ट आता अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने पुनःपुन्हा वाचली पाहिजे आणि त्यातील मतीतार्थ मनावर बिंबवला पाहिजे .
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रावर तसा गेल्या दोन वर्षापासून एका प्रकारचा दुष्काळच सुरु झाला आहे. त्यामुळे  अशी भीती वाटायला लागली आहे कि हा अभियांत्रिकी शिक्षणाचा वटवृक्ष वटायला  सुरुवात झाली आहे त्याच्या सगळ्या शाखा कोमेजून जायला सुरुवात झाली आहे. सगळे सैरभैर झालेले आहेत. सगळीकडे मंदीरुपी दुष्काळ पसरायला सुरुवात झाली आहे.
तंत्रनिकेतने आणि अभियांत्रिकी महाविद्यालये ओस पडायला लागली आहेत , बंद व्हायला लागली आहेत. सगळीकडे चिंतेच वातावरण निर्माण व्हायला लागल आहे. सगळ्यांचा अभियांत्रिकी शिक्षणावरचा विश्वास उडायला लागला आहे .सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी म्हणजे शिक्षक त्याचाही आत्मविश्वास डळमळायला लागला आहे. वेळचेवर पगार होणे बंद झालं आहे .नोकरीची पण शाश्वती राहिली नाही. त्यामुळे त्यांचाही अभ्यास कमी व्हायला लागला आहे. पगार होत नाही तरीपण लाचारासारख नोकरीला चिकटून बसायची त्याच्यावर वेळ आली आहे. खूपच वाईट परिस्थिती आलेली आहे .
काय करायचं हा यक्षप्रश्न सर्व शिक्षकासमोर उभा राहिला आहे.माहिती नाही हि परिस्थिती कधीपर्यंत राहणार आहे पण जोपर्यंत हि परिस्थिती आहे तोपर्यंत माझी सर्व शिक्षक समुदायाला विनंती आहे कि धैर्य सोडू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास सोडू नका. उद्योग क्षेत्रामध्ये जेव्हा मंदी येते तेव्हा संशोधनाच काम जोमात सुरु होत. आता हिच करी वेळ आहे स्वत:ला  बदलण्याची . मध्यंतरीच्या कालावधीत स्वत:ला अॅकेडेमिक कामात पूर्णपणे गुंतवून घेतल्याने बऱ्याच जणांना स्वत:ला अपग्रेड करता आलेलं नाही त्यांनी हि वेळ साधून घ्यावी. मनात नैराश्येची भुते थैमान घालण्यास सुरुवात करणेपुर्वीच मनाला नवीन अभ्यासात झोकून द्या.
हि जी मंदी आली आहे ती कायम राहणार नाही पण ज्यावेळी तेजी येईल त्यासाठी सर्वांनी स्वतःला तयार केलं पाहिजे . भोवतालाच तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर्जाही ढासळत चालला आहे हे गृहीत धरूनच त्यांना नवीन तंत्रज्ञानाची आवड कशी लागेल , हे तंत्रज्ञान त्यांना कसे समजेल त्यासाठी काय केलं पाहिजे हे शोधलं पाहिजे आणि त्यावर अभ्यास केला पाहिजे . कुठलीही परिस्थिती जास्त काळ राहत नाही जर मंदी आहे तर तेजी नक्कीच येणार आहे पण जर तेजी आली तर ती नवीन आव्हाने घेऊन येईल आणि आपण जर त्यासाठी तयार नसेल तर परत हे क्षेत्र उभं राहण अवघड होईल.
चला उठा मित्रानो , काढून टाका मनातील नैराश्येची जळमटे. आपण अभियंते तर आहोतच पण त्यापेक्षाही महत्वाच म्हणजे आपण शिक्षक आहोत. देशाच भविष्य घडवणारे अभियंते घडवण्याचे पवित्र काम आपल्यावर आहे . जर आपण मनातून हारलो तर आपण अभियंते घडवू शकणार नाही. हे शिक्षण क्षेत्र बदलायची  धमक हि कुठल्याही सरकारमध्ये ,कुठल्याही संस्थापकात नाही. हि अवस्था बदलण्यासाठी कुठलाही मसीहा येणार नाही. हि परिस्थिती केवळ आणि केवळ शिक्षकच बदलू शकतो. आता गरज आहे स्वत:ला बदलण्याची. परत जोमाने अभ्यास करण्याची. हे शिक्षण क्षेत्र अगदी नापीक झालं आहे त्यामध्ये ज्ञानरुपी खत घालण्याची गरज आहे . आता क्रांती होण्याची गरज आहे “ शिक्षण क्रांती”. 

आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .

या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

९७६३७१४८६०

Monday, February 4, 2019

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ४० )



*** उद्देश हरवत चाललेली अभियांत्रिकी शिक्षण पद्धती    ***

आपल्या भारतातील अभियांत्रिकी  शिक्षण पद्धतीची उतरंड हि  चढत्या भाजणीने दहावीनंतर आय. टी. आय. /डिप्लोमा , बारावीनंतर  बी. ई., बी. ई. नंतर एम. ई. त्यानंतर पी. एच. डी. अशी आहे. या उतरंडीतील प्रत्येक शिक्षण पायरीचा स्वत:चा एक उद्देश ठरविलेला आहे.
आय. टी. आय. शिक्षणाचा उद्देश हा कुशल कामगार घडवणे असतो . तसा  डिप्लोमाचा विद्यार्थी हा कुशल कामगारांवर देखरेख करण्यासाठी सुपर वायजर म्हणून काम करण्यासाठी  असतो . डिग्रीच्या विद्यार्थी कडून एखाद प्रोडक्ट बनवण्याची अपेक्षा केली पाहिजे तर संशोधनाच्या कामासाठी एम. ई. चा विद्यार्थी  घडवले पाहिजे.
मध्यंतरीच्या काळात एक मोठी गडबड झाली. बाजारात मागणी वाढली तशी भरमसाठ महाविद्यालये निघाली.स्पर्धा वाढली तसा घोळ व्हायला सुरुवात झाली. मध्येच प्रोजेक्ट विके बाजारात आले त्यांचीही संख्या वाढायला लागली  तशी  त्यांचेमध्ये पण स्पर्धा वाढली.  नवनवीन प्रोजेक्ट तयार बाजारात यायला  लागले . नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रोजेक्ट विक्यांनी करायला सुरुवात केली. सुरुवातीला शिक्षकानाही जाणवत होत कि तयार प्रोजेक्ट आणला आहे पण कागदपत्रात गुंग झालेमुळे त्यांनी त्याचेकडे दुर्लक्ष करायला सुरुवात झाली . नंतर या तयार प्रोजेक्टनी स्पर्धेत बक्षीस मिळवायला सुरुवात केली त्याच श्रेय पण शिक्षकांना मिळायला लागले मग काय ? तयार प्रोजेक्टला उत यायला सुरुवात झाली .
अशातच आठवी पर्यंत ढकललेली मुल अभियांत्रिकीला यायला सुरुवात झाली. महाविद्यालयांची संख्या वाढलेमुळे कमी गुणवत्तेची मुलेपण अभियांत्रिकी शिक्षणाला पसंती देउ लागली. या मुलांच्या बुद्धीचा वकूब ध्यानात न घेता त्यांचेवर प्रोजेक्ट लादायला सुरुवात झाली . त्यांना जमत कि नाही याचा विचार न करता नवीन कल्पना  आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या प्रोजेक्टची शिक्षकांनी मागणी करायला सुरुवात झाली. आता तर शिक्षक म्हणतात नामांकित जर्नल बघा आणि त्यातील कल्पनेवर प्रोजेक्ट करा .पेटंट करा. नामंकित जर्नल कुठून  मिळवायचं आणि ते कसं वाचायचं याबद्दल शिक्षकांनापण  माहिती नाही . विद्यार्थ्यांना विकत घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.
अशा रीतीने मग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट डिग्री लेव्हलचा व्हायला लागला. डिग्रीच्या मुलाचा प्रोजेक्ट एम. इ. लेव्हलचा व्हायला लागला. मुलांच्याकडून अपेक्षा वाढू लागल्या. मग प्रत्येक शिक्षण पद्धती आपल्या ध्येयापासून हळूहळू ढळू लागली आणि गोंधळ व्हायला सुरुवात झाली . सुदैवाने आय. टी. आय.ने अजून ध्येयापासून फारकत घेतली नाही. त्यांनी आधीच आखून दिलेल्या सीमारेषेतच सर्व कार्य सीमित ठेवले. त्यामुळे आय. टी. आय. चे महत्व अजूनही कायम राहिले आहे . पण तंत्र शिक्षण आणि अभियांत्रिकी शिक्षणाचा पार बोऱ्या वाढायला सुरुवात झाली आहे.
आता गरज आहे शिक्षण तज्ञानी परत एकत्र येण्याची आणि या सगळ्या गोष्टीची पुनःर्रचना करण्याची...परत सीमारेषा आखण्याची ... हि ढासळत चाललेली उतरंड परत व्यवस्थित करणेची ..... शक्य तितक्या लवकर हे केलेच पाहिजे अजूनही वेळ निघून गेलेली नाही. नाहीतर .......

आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .

या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

भियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३७ )


*** विद्यार्थ्यासाठी मुल्यवर्धित प्रशिक्षणे ***
सध्या तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत आहेत . नवीन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जाणे गरजेचे आहे . ज्यामुळे त्यांना त्या विषयातील तज्ञाचे मार्गदर्शन व त्याचबरोबर प्रत्यक्ष कार्यानुभव मिळेल अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मुल्यवर्धित प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे आता निकडीचे झाले आहे . पण बऱ्याच ठिकाणी संस्थापाकानांच आणि व्यवस्थापन समितीलाच अशा प्रशिक्षणाचे महत्व माहीत नाही त्यामुळे आहे करी कुलममध्ये तर घ्यायलाच पाहिजे म्हणून वेगवेगळी एक दिवसीय, दोन दिवसीय मुल्यवर्धित प्रशिक्षणे कार्यक्रम आखले जातात.
केवळ घ्यायचे म्हणून गेली चारपाच वर्षात अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी जेव्हडे मुल्यवर्धित प्रशिक्षणे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले गेले त्यापैकी बरेच कार्यक्रम चांगल्या प्रतीचे नव्हते. निव्वळ कागदपत्र रंगवण्यासाठी घेतले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला नाही . हा फीडबॅक एका बॅचकडून दुसऱ्या बॅचकडे गेला त्यामुळे आता विद्यार्थीच या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तयार नसतात . बऱ्याच ठिकाणी या प्रशिक्षणासाठी पैसेही हे विद्यार्थ्यांकडून घ्यायचे असतात पण वाईट पुर्वानुभावामुळे विद्यार्थी जास्त पैसे द्यायला तयार होत नाहीत .
चांगल्या प्रतीच्या प्रशिक्षक लोकांना त्यांचे मानधन देता येत नाही त्यामुळे स्वस्तामध्ये प्रशिक्षण देणारे शोधावे लागतात. स्वस्तात म्हणजे किती स्वस्तात तर दोन तासाचे करमणुकीचे कार्यक्रम घेणाऱ्या गावठी कलाकाराला सुद्धा जेव्हढ मानधन मिळत त्यापेक्षाही कमी पैशात यांना दोन दिवसाचे पूर्ण कार्यक्रम प्रात्यक्षिकासहित हवे असतात.
स्वस्तात प्रशिक्षण देणारे स्वत: हून शोधतच येत असतात . स्वस्तामध्ये प्रशिक्षण देणाऱ्यामध्ये बरेच जण तयार प्रोजेक्ट विकणारे प्रोजेक्ट विके असतात. त्यापैकी काहीजण तर त्याच महाविद्यालयातीलच हुशार माजी विद्यार्थी म्हणजे ज्यांना प्रात्यक्षिक ज्ञान चांगले आहे पण कुठे जॉब मिळाला नाही म्हणून तयार प्रोजेक्ट विकणारे प्रोजेक्ट विके बनलेले असतात . मग या लोकांना जर पैसे घेउन जर आपल्या उद्योगाची जाहिरात करायला मिळत असेल तर ते हसत तयार होतात. मग सुरु होते नवीन दुष्ट चक्र. या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला विद्यार्थ्यांना जास्त हुशार करायचे नसतेच मुळी आणि त्यांना कामाचा अनुभव जरी असला तरी विद्यार्थ्यांना विषय समजून सांगण्याची जी हातोटी आणि अनुभव नसतो. त्यामुळे थेअरीवर टाईम पास केला जातो. प्रात्यक्षिक घेतली जात नाहीत. जी घेतली जातात त्यामध्ये साहित्य अपुरे असते , हात लावायला मिळाले तरी भाग्य अशी अवस्था असते. अशा कार्यक्रमामुळे मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ऐवजी भीती निर्माण होते. या मुलामध्ये रेडीमेड प्रोजेक्टची जाहिरात केली जाते आणि यातून प्रोजेक्ट ग्रूप मिळवले जातात आणि त्यांना प्रोजेक्ट विकले जातात.
NAAC किंवा NBA साठी व्यावसायिक करार करण्यासाठी व्यावसायिकांची गरज असते पण असे व्यावसायिक प्रत्येक शिक्षकाच्या ओळखीचे नसतात मग अशा प्रोजेक्टविक्या माजी विद्यार्थ्यापुढे आपोआपच पायघड्या घातल्या जातात. बऱ्याच महाविद्यालयात हि परिस्थिती अनुभवास येते .
पैशाबरोबरोबरच मोठा प्रश्न येतो तो म्हणजे वेळेचा. पुस्तकी अभ्यासावर अॅकेडेमिक कॅलेंडर आणि रोजच टाईमटेबलमध्ये इतका भर दिला जातो कि अशा कार्यक्रमासाठी वेळच बाजूला काढून ठेवेलेला नसतो किंवा एक दोन दिवस इतकाच वेळ ठेवलेला असतो जो खुपच अपुरा असतो. चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेणेसाठी किमान पाच दिवस बाजूला काढले पाहिजेत. पहिला दिवस तंत्रज्ञानाची परीपूर्ण माहिती , दोन दिवस त्यावर प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण आणि परत दोन दिवस केस स्टडी जी विद्यार्थ्याकडून करून घेणेसाठी असा कार्यक्रम आखला तरच त्या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. अजूनही आपल्याकडे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बाबतीत वर्कशॉप, सेमिनार यातला फरक लक्षात घेतला जात नाही . वर्कशॉपच्या नावाखाली सेमिनार घेतले जातात. स्लाईड शो केला जातो. बऱ्याचदा पाच दिवसाचे कार्यक्रम आखले जातात त्यात सुसूत्रता नसते. तीन चार वेगवेगळे टॉपिक एकत्र घुसडले जातात. तज्ञ व्याख्यात्यांची गर्दी केली जाते. भले हे व्याखाते त्या विषयातील नामांकित तज्ञ असतील पण त्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने ते त्या विषयाला न्याय देऊ शकत नाहीत.
मुल्यवर्धित प्रशिक्षण हे रोजच जेवणाबरोबर शारीरिक क्षमता वाढीस लागणेकरिता जसा पौष्टिक खुराक घ्यावा लागतो त्या प्रमाणे असतात . त्याची गुणवत्ता हि राखावीच लागते पण ज्याप्रमाणे खुराकाला खर्च जास्त येतो तसाच या मुल्यवर्धित प्रशिक्षणाबाबत असतं. या मुल्यवर्धित प्रशिक्षणाच महत्व आता लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यासाठी गुणवत्तापूर्ण मुल्यवर्धित प्रशिक्षण कार्यक्रम आखले पाहिजेत त्यासाठी पुरेशा खर्चाची आणि पुरेसा वेळ बाजूला काढून ठेवण्याची तयारी ठेवली पाहिजे.
या पूर्वीचे भाग वाचनेसाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०