Sunday, May 24, 2020

***** अभियांत्रिकी शिक्षण परत उजळू दे *****

गेल्या आठवड्यात विनानुदानीत अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संस्थापकांची एक फेसबुकवर मिटिंग झाली. बऱ्याच जणांनी त्याची लिंक मला पाठवली आणि माझे मत विचारले. तशी हि शिक्षणक्षेत्रातील मोठी दिग्गज असताना माझ मत काय मांडायचं ? पण बराच विचार केला म्हटलं मंथन सुरु झाल पण सगळ्यांनी सापाच शेपूट पकडलं आहे आणि सापाच तोंड पकडायला कोणीही तयार नाही. मग हे मंथन पूर कस होणार ? शेवटी विचार केला कि कोणीतरी ते टोक पकडलंच पाहिजे. मंथन चालू राहीलच पाहिजे.
अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राची गेल्या पाच वर्षापासून उतरत्या दिशेने वाटचाल सुरु झालीच होती. या किंवा पुढच्या वर्षी हे मान टाकणार होतच, पण माझ्या मते हा कोविड योग्य वेळी देवासारखा धावून आला आहे .या कोविडच्या निमित्ताने या क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्याची मोठी संधी या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राला मिळालेली आहे पण या संधीच सोन करायचा दृष्टीकोन कुणाकडेही नाही. शांतपणे दूरगामी विचार करून खंबीर निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक जण परत अंग लपवायचा प्रयत्न करत आहे . या परिस्थिती बरोबर दोन हात करायचे सोडून पळवाट शोधत आहे.
जेव्हा पेशंट आय सी यु मध्ये मरणासन्न असतो त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी निष्णात डॉक्टर लागतो, त्याचबरोबर योग्य आहार ,औषधे वगैरे पेशंटला देण्यासाठी पैसा पाण्यासारखा घालवायला लागतो पण आपण पैसे वाचविण्यासाठी खर्चात कपात करायला लागलो तर काय होईल, गुण यायची शक्यता किती? मग पैसे वाचवणे साठी अंगारे धुपारे करायचे का?
ही अशीच परिस्थिती आलेली आहे. पैसे घालून हे क्षेत्र वाचविण्यासाठी गरज असताना त्यात कपात करून आणि नकारात्मक भूमिका घेऊन हे क्षेत्र वाचणार तर नाहीच पण याला जगविण्यासाठी जास्त प्रयास करावे लागणार आहेत.
आपल्याकडे स्वायत्त विद्यापीठ आणि इतर विद्यापीठातील विद्यार्थी यांचा प्रश्न हा एकाच पद्धतीने सुटणारा नाही. त्यामुळे ते जे करतात ते इतरावर थोपवण्यात काहीही अर्थ नाही. पूर्ण फी भरून येणारे विद्यार्थी आणि निव्वळ जागा भरण्यासाठी बाबा पुता करून आणलेले विद्यार्थी याच्या मध्ये आर्थीक, शैक्षणिक, मानसिक आणि कौटुंबिक असा टोकांचा फरक आहे तो ध्यानात घेतला पाहिजे.
बरीच जण AICTE ,DTE च्या नावे खडे फोडतात पण हे फोडण्यापूर्वी सगळे नियम कसे साम , दाम , दंड , भेद वापरून फाट्यावर बसवले हे सोयीस्कर रित्या विसरतात. या यंत्रणेला सवयी तुम्ही लावल्या. NBA, NAAC सारख्या चांगल्या मूल्यमापनाच्या पद्धतीला कागदावर व्यवस्थित बसवलं आणि मिळालेल्या ग्रेड मिरवल्या पण आता पितळ उघडे पडत आहे म्हणून त्यांच्या नावाने शंख फुंकण्यात काहीही अर्थ नाही. त्यामधील निकष योग्य पद्धतीने पाळले असते तर ही वेळ आलीच नसती.
अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांनी निव्वळ मुलांच्या फी आणि समाजकल्याणच्या भरोशावर राहण्यात काहीही अर्थ नव्हता. आपल्याकडे असणाऱ्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा वापर करून संस्थेचे उत्पन्न वाढवणे गरजेचे होते पण याचा कधीही विचार केला नाही. आपल्या संस्थेमधील उपलब्ध जागेचा आणि उपकरणांचा वापर करून उद्योगजगतासाठी संशोधन आणि उत्पादन विकासासाठी कार्य करायला पाहिजे होत पण ते करायला जमल नाही. लाखामध्ये पैसे घालून उभ्या केलेल्या लॅबचा उपयोग फक्त दिखाव्यासाठी केला गेला त्या लॅबमधील उपकरणाचा वापर करून पैसे मिळवता नाही आले. एव्हढंच काय बऱ्याच ठिकाणी उद्योगांनी लॅब उभा करून दिल्या आहेत त्याचा वापर करायला पण जमलेलं नाही. मध्यंतरी बऱ्याच महाविद्यालयांना वाहन उद्योगांनी इंजिन भेट दिली आहेत. त्या महाविद्यालयांनी त्याचा उपयोग शो पीस म्हणून केला, काही ठीकाणी तर त्याचवर धूळ मावत नाही. कुणाच्याही मनात आल नाही कि विद्यार्थ्यांना घेऊन ते खोलून बघाव आत कस आहे हे आपणपण बघावं आणि विद्यार्थ्यांना पण शिकवावं?
परदेशामध्ये नवीन तंत्रज्ञान हे विद्यापीठात तयार होत आणि मग ते उद्योगात वापरलं जात . ते नवीन तंत्रज्ञान घेऊन विद्यापीठे उद्योगाकडे जातात .आपल्याकडे शिक्षण संस्था उद्योगातील लोकांना बोलावून घेतात नवीन तंत्र विद्यार्थ्यांना समजावून सांगायला आणि तेही फुकट सांगावे अशी अपेक्षा ही करतात हा एव्हढाच फरक पुरेसा आहे कि आपण कुठे आहोत ते समजून घेण्याचा..
ज्यावेळी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र भरात होते त्यावेळी संस्थापकांनी आपल्या संस्थेसाठी pillar निवडण्याच्या ऐवजी feeler चा भरणा केला. निव्वळ कागदपत्रे रंगवण्यासाठी नगाला नग भरला . हा नग भरताना त्याची खरंच काय गुणवत्ता आहे याची पारख केली नाही किंबहुना अशी पारख करणारी माणसेच सध्या कुठल्याही संस्थेकडे नाही.
संस्था सुरुवात केली तेव्हा संस्थापकांनी पारख करून माणसे भरली होती, टिकवली होती पण नंतर त्याचा व्याप वाढल्यानंतर त्यांही हे काम दुसऱ्याच्या गळ्यात ज्यांना या क्षेत्राची माहिती नाही आणि चांगली माणसांची पारख करता न येणाऱ्या जवळच्या लोकांकडे सोपवले आणि पण याच जवळच्या लोकानी वैयक्तिक स्वार्थासाठी त्या अधिकाराचा दुरुपयोग केला आणि शेवटी सैनिकाऐवजी बाजारबुनग्याचा भरणा झाल्यामुळे सध्याची हि स्थिती आलेल्ली आहे.
शैक्षणिक पात्रता वाढली कि पगार वाढतो पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढत असते याच भान काही लोकांना राहिलेलं नाही किबहुना बऱ्याच जणांनी मी पी. एच. डी. केली आहे आणि मला इतकाच लोड पाहिजे असे भांडण काढण्यातच आणि काम टाळण्यातच यांनी धन्यता मानली. एव्हढंच काय दुसर्ऱ्याचे पाय ओढण्यासाठी यांनी कुरापत्या सुरुवात केली . आज या लोकांचा पगार वाढलेला आहे आणि त्यामानाने याची कार्यक्षमता कमी झालेली आहे .याच्या पगाराचा भार वाढत चालला आहे आणि बऱ्याच संस्था याखाली दबून गेल्या आहेत.बऱ्याच ठिकाणी ज्या विषयाला विद्यार्थी येत नाहीत त्या विषयाचा लोड हे घेत असतात. यांच्या कामगिरीचे पुनर्मुल्यांकन करण्याची गरज आहे. संस्थापकांनी आता पगार आता पदासाठी ना देता लायक माणसाना निवडून त्याच्या कार्यक्षमता पारखून त्यांना द्यायला पाहिजे. भले तो कुठल्याही पदावर असो.
हे जे ऑन लाईनच फॅड जे आणल आहे त्याला व्यवस्थित आणि विचारपूर्वक वापरायला पाहिजे होत. पण पुढ पुढ करण्याच्या नादात त्याच नाविन्य आणि त्याच्यातील रस घालवून बसलो आहोत. शिक्षणक्षेत्रात प्रयोग करताना खूप विचार करायला लागतो कारण त्याचा परिणाम खूप लांबपर्यंत टिकतो. आपल्याकडे सरसकट आठवीपर्यंत पोर पुढे ढकलली याचे दुष्परिणाम अजूनही सगळे भोगत आहेत.
प्रॅक्टिकलचे ऐवजी सिम्युलेशन करा किंवा त्याचे व्हिडीओ दाखवा म्हणानाऱ्याचे तर चरणतीर्थ प्राशन केले पाहिजे. आपली मुले मार्क्स मिळवण्यात कमी पडत नाहीत तर प्रक्टिकल ज्ञानात कमी पडतात हे उद्योग क्षेत्र ओरडुन सांगते . आतापर्यंत यावर कित्येक वेळा चर्चा झाडल्या आहेत तरीही हे गांभीर्याने घ्यायचा कुणीही विचार करत नाही.
आपण मेकॅलेच्या नावाने बोंब ठोकतो आणि नोकर घडवतो. पण उद्योजक किंवा संशोधक का घडत नाही याचा विचार आपण का करत नाही? आम्ही प्लेसमेंट दाखवतो पण किती विद्यार्थ्याची प्लेसमेंट त्याने ज्या शाखेत शिक्षण घेतले त्या संबधित क्षेत्रात झाले आहे? त्याने पैसे भरून घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग त्याच्या नोकरीत होतो का ? हे पाहतच नाही.
काही महाविध्यालये त्यांचे काही विद्यार्थी उद्योजक /स्पर्धा प्ररीक्षा पास करून सध्या या मोठ्या पदावर आहे असं कौतुकाने सांगतात आहेत पण तो विद्यार्थी शिकत असताना त्याला व्यवसाय अथवा स्पर्धा परीक्षा करण्याविषयी आपण काय मदत केली हे कुणी सांगेल का?
आपली मुले मास्टर करायला परदेशात जातात कारण तिथ शिकल्यावर त्यांना चांगला जॉब मिळतो कारण तिकडे प्रॅक्टीकल ज्ञानावर भर दिला जातो शिवाय विकसित झालेलं उद्योग क्षेत्र आहे आणि ज्यामुळं त्यांच्या कर्तुत्वाला वाव आहे. आमच्याकडे मास्टर केलेल्या विद्यार्थ्याला नोकरी मिळत नाही इतका आम्ही विश्वास घालवून बसलो आहोत. पी एच डी झालेल्याला स्वतःच्या पायावर उभा राहता येत नाही . आत्मनिर्भर होता येत नाही मग काय बोलायलाच नको. हे विचारात घेतलं पाहिजे.
मध्यंतरी अभियांत्रिकी क्षेत्राला आलेल्या भरतीच्या लाटेवर अनेक स्वार झालेले आमचे सो कॉल्ड शिक्षण सल्लागार / मार्गदर्शक आता का चालत नाहीत? त्यांची जादू संपली का ? त्याच्यात कधीच काही अर्थ नव्हता. त्यांचेजवळ होत ते फक्त कागद रंगवायच कसब. आता त्यांनी शांतपणे विश्रांती घ्यायला पाहिजे . पुढच्या पिढीतील योग्य अशा माणसाकडे कार्यभाग सोपवला पाहिजे.
आपल्या संस्थेचे माजी विध्यार्थी हे एक मोठा अॅसेट असतात पण त्याचे महत्व कुणीच ध्यानात घेतलेलं नाही. त्यांच्याकडे हात पसरण्याऐवजी त्यांनी स्वतःहून मदत केली पाहिजे पण इतके जिव्हाळ्याचे संबंध जपता आले का? एक रुपयासाठी परीक्षेतून उठवून ऑफिसमध्ये बोलावणाऱ्या संस्था आहेत त्यांचे विद्यार्थी कसे मदत करतील? आणि विद्यार्थ्याकडून पैसे का मागायचे ? विद्यार्थी ऐवजी त्यांना ग्राहक या भूमिकेत त्याला पाहिले आहे मग त्याच्याकडून काय मिळेल ही अपेक्षाच करण्यात अर्थ नाही. त्या ऐवजी इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्या सहाय्याने संस्थेचा उत्कर्ष करून घेता येईल पण काय मागायचे हेच कळत नाही.
ऑन लाईनसाठी आपण उदेमी , कोर्सेरा ,खान अकेडमी यांची उदाहरणे देतो पण त्या कोर्सचा सगळ्याच शाखांना उपयोग होत नाही शिवाय यांचा उपयोग हा स्कील अप ग्रेडेशनसाठी केला जातो. आपल्याला महाविद्यालयात मुळात स्कील निर्माण करायच मोठं अवघड काम करावं लागते हि महत्वाची गोष्ट आहे.
आपल्याकडे दूर शिक्षण हा प्रकार अभियांत्रिकीसाठी होताच . पण काहीतरी खुसपटे काढून त्याला बंद करायला लावले. आपल्याकडे IETE मध्ये पण एक चांगली कल्पना राबवली होती कमी पैशात इंजिनियर होता येत होत. फक्त आठवड्यातून एकदा प्रक्टिकल करायला सेंटरला जाव लागायचं. एक चांगली कल्पना होती त्याच पुनर्जीवन करायला पाहिजे. सध्याच्या परीस्ठीतिला तोंड देण्याची क्षमता त्या संकल्पनेत आहे.
अजून बरच काही आहे ……
फक्त एक लक्षात घ्या इंजिनियरिंग हे आपण योग्य रीतीने चालवत नाही म्हणून नाहीतर इंजिनियरला कधीही मंदी नसते. तर त्याला अशा मंदीतपण संधी दिसते.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

***** अभ्यास अभ्यास क्रमाचा - भाग 2 *****

विद्यापिठात शिकवला जाणार अभ्यासक्रम, स्वायत्त अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये आणि सर्वसाधारण महाविद्यालये सगळीकडे शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचे स्वरूप जवळपास एक सारखेच आहे.
विद्यापीठामध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा संशोधनाला चालना देणारा , स्वायत्त महाविद्यालयातील अभ्यासक्रम हा उत्पादन विकसनासाठी मदत करणारा आणि सर्व साधारण महाविद्यालयात शिकवलं जाणारा अभ्यासक्रम हा 20 टक्के संशोधन,30 टक्के विकसन आणि 50 टक्के हा सेवा क्षेत्रांना धरून बनवायला हवा.
गेल्या वीस वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात खूपच प्रगती झाली आहे त्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक्स संबंधी वेगवेगळ्या शाखा निर्माण व्हायला पाहिजे होत्या. तशा काही शाखा आहेत पण त्यांनी त्याचं वेगळेपण जपले नाही आणि शेवटी सगळं एकमेकांत गुंतून कुठली शाखा कुठला उद्देश ठेऊन बनवली आहे ते समजायचं बंद झालं आहे आणि केवळ याच कारणामुळे कित्येक शाखा बंद करण्यात आल्या आहेत पण हे धोरण चुकले आहे. इलेक्ट्रॉनिक्स साठी अजून किमान दहा वेगवेगळ्या शाखा सुरू करण्यास संधी आहे .
एका विषयाचे दोन सेक्शन आणि एका सेक्शनमध्ये तीन युनिट हा जो पॅटर्न आहे तो अतिशय चुकीचा आहे. काही काही ठिकाणी या एका विषयात दोन दोन विषय मिसळले आहेत. यामुळे कुठल्याही विषयाचा अभ्यास परिपूर्ण होत नाही.हे असा अभ्यासक्रम असलेल्या ठिकाणी तो तयार करणाऱ्याच्या बुद्धीची दया येते.खरच त्याला त्याविषयाची खोली माहिती आहे की नाही याची शंका येते.
काही ठिकाणी तर एक विषयासाठी असणाऱ्या सहा युनिटचा सुध्दा एकमेकाशी संबंध नाही.
जवळपास बऱ्यापैकी प्रात्यक्षिके ही जुनाट पद्धतीची आहेत . आता प्रात्यक्षिक शिकवण्याच्या पद्धतीत मध्ये बदल केला पाहिजे. एखाद्या गोष्टीचे तत्व शिकल्यावर लगेच त्याच्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या उपयोगाचा पण प्रात्यक्षिकात अंतर्भाव करण्याची गरज आहे.
सगळ्यात मोठीं मजा आहे ती ओरल आणि टर्म वर्क असणाऱ्या विषयाची . कुठल्या विषयाला ओरल आणि कुठल्या विषयाचे टर्म वर्क ठेवायचे याच भानच ठेवलेले नाही. अक्षरशः मनाला येईल तुला विषयाला ओरल आणि टर्म वर्कला टाकले आहे.
विद्यार्थी इंजिनिअरिंग केल्यानंतर जे बाहेर कोर्स करतात आणि नोकरी मिळवतात ते विषय अभ्यासक्रमात घ्यायला पाहिजे हे सोपं अभ्यासक्रम करताना लक्षात घ्यायला पाहिजे ते लक्षात घेतलेले नाही.हे विषयाचा अभ्यासक्रमात केवळ तोंड ओळख होण्यासाठी अंतर्भाव केलेला आहे.
आपले विचार जरूर मांडा.

अभ्यास .... अभ्यासक्रमाचा भाग -१

बऱ्याच दिवसाची इच्छा होती ती लॉक डाउन मुळे सफल झाली . गेले पंधरा दिवस एकच काम केल ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामधील इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग संबंधित कोर्सच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास. मग त्यात Government of Maharashtra's Engineering Colleges , Government of Maharashtra's-Aided Engineering Colleges, University Department Institutes, University Managed Institutes, Deemed University या सर्व आल्या . याच बरोबर डिप्लोमा , आय टी आय आणि HSC MCVC हे पण आले . काही प्रमाणात इतर शाखांमध्ये अंतर्भूत केलेल्या इलेक्ट्रोनिक संबधित विषयांचा केलेला अंतर्भाव पण त्यातच आले.
यामध्ये आय आय टी चा अभ्यासक्रम अंतर्भूत नाही.
अजूनही अभ्यास चालूच आहे . कदाचित अजूनही एक महिना लागेल. बघू अजून किती काल इंटरेस्ट टिकतो.
हा अभ्यास करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या त्यातील काही मी नमूद करतो.
१. आय टी आय अभ्यासक्रम इलेक्ट्रॅनिक मेकॅनिक हा बऱ्यापैकी काळाला धरून चालला आहे . अजून २० टक्के त्यात बदल करता येईल .
२. HSC MCVC च्या अभ्यासक्रमासाठी जवळजवळ २७ पुस्तके संदर्भ म्हणून वापरलेली आहेत . डिप्लोमा साठी १४२ पुस्तकांचा संदर्भ दिला आहे त्या मानाने इंजिनियरिंगसाठी कमी पुस्तकांचा संदर्भ दिला आहे.(अर्थात हि नावे जरी दिली असली तरी खरंच त्यातील कुठल्या पुस्तकातील संदर्भ कुठे घेतला आहे देवाक माहित ).
३. ITI चा अभ्यासक्रम हा त्यांच्या विद्यार्थ्यांना नोकरी लागण्याचा उद्देश ठेउन तयार केलेला आहे आणि तो उद्देश त्या अभ्यासक्रमात पुरेपूर रित्या प्रतिबिंबित होतो. पण डिप्लोमा आणि त्यापेक्षाही डिग्रीचा अभ्यासक्रम हा उद्देश विहीन वाटतो कारण त्यामध्ये एकसंधता नाही.
4. दुसऱ्या शाखेच्या अभ्यासक्रमात जसे कि मेकॅनिकल , ऑटोमोबील केलेला इलेक्ट्रोनिक संबधित असणाऱ्या विषयांची अवस्था बऱ्यापैकी शेंडा आणि बुडखा नसल्यासारखी आहे. उगीच चिटकवावे असे असे आहेत .
५. बायोमेडिकल आणि एरोनोटीकलमध्ये जितका वाव इलेक्ट्रोनिकला द्यायला पाहिजे तितका दिलेला नाही.
५. फूड इंजिनियरिंग आणि अग्रीकल्चरलं इंजिनीरिंगमध्येपण इलेक्ट्रोनिक्स विषय आहेत पण ते केवळ माहितीपर आहेत त्यांचा योग्य उपयोग केलेला नाही.
६. इंजिनियरिंग आणि पोलीटेक्निक मधील इलेक्ट्रोनिक्स विषयात बरेच बदल करण्याची गरज आहे , त्यामध्ये आलेला विस्कळीत पणा काढून टाकण्याची गरज आहे .
7. बऱ्यापैकी अभ्यासक्रम हा केवळ माहितीप्रधान झाला आहे त्यात कार्यानुभावाला अजिबात वाव नाही.
8. इंजिनियरिंगमध्ये स्पेशलायझेशन जे आहे ते हास्यास्पद आहे , नावापुरत आहे.
9. बऱ्यापैकी विषय आणि त्यांचे अभ्यासक्रम कॉपी पेस्ट आहेत.
१०. बऱ्याच विषयातील तंत्रज्ञान हे काल बाह्य झाल आहे पण अजूनही ते अभ्यासक्रमात आहेत .
11. एका विषयाची नाळ दुसऱ्याशी जुळवलेली नाही त्यामुळे सगळा अभ्यासक्रम तुकद्याड्या तुकड्यात विभागाला आहे.
.
.
.
बरच काही.
एक मात्र खर आहे कि हा अभ्यासक्रम लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे . सध्या वेळ मिळालेला आहे त्याचा योग्य वापर संबधित करून घेतीलच.
-चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

असा हा सूंदर ऑन लाईन क्लास,

असा हा सूंदर ऑन लाईन क्लास,
ऑन लाईनच्या क्लासला मजा येते खास.
ऑन लाईन क्लासची मजाच न्यारी,
गादीवर लोळत पाहता येतो घरी.
नाही सकाळी लवकर उठायची घाई,
नाही गडबड पळत जाऊन बस पकडायची.
नाही आता ओझे जड जड दप्तराचे,
नाही आता भीती पुस्तक किंवा वही विसरायचे,
हवे तेव्हा मित्राबरोबर करू शकतो चॅट.
बोअर करणाऱ्या टीचरना करू शकतो म्युट ,
आली जरी डुलकी मी कॅमेरा ऑफ करतो,
कानाला हेडफोन लावून हळूच मी झोपतो.
सगळ्यात आवडे मला एक गोष्ट या क्लासची,
हवे तेव्हा मला गायब होता येते याची.

** करोनाची आँधी आणि मॅकलेचे भूत गाडण्याची उत्तम संधी ***

------------------------------------------------------------------------------
आम्हाला तिसरीच्या वर्गात असताना एक धडा होता - माकडाचे घर. माकड असत ते दर वेळी पावसाळ्यात भिजत असताना एकच विचार करत असत की यंदा पाऊस संपला की आपण घर बांधायचंच.पण पाऊस संपला की परत त्याच्या लक्षात राहायचं नाही , असाच हिवाळा जायचा, मग उन्हाळा जायचा आणि परत पावसाळ्यात पावसात भिजत माकड विचार करायचे की यंदा पावसाळा संपला की नक्की घर बांधायचे.
आजतागायत त्या माकडाने घर बांधलंच नाही.आता माकड म्हातारं झालंय आता त्याला विचारलं तर ते पूर्वजांना शिव्या घालत बसतं.
-----------------------------------------------------------------------------
परवा बातमी वाचली की यंदा महाविद्यालये सप्टेंबरमध्ये सुरू करायचा यु.जी. सी .चा विचार आहे. ही बातमी वाचली आणि एक विचार आला की जवळपास चार महिने अजून अवकाश आहे कॉलेजेस चालू करायला .इतका मोठा वेळ म्हणजे खूपच मोठा बोनस मिळाला आहे शिक्षण क्षेत्राला. मॅकलेने घातलेल्या पायावर जवळपास दोनशे वर्ष आपलं शिक्षण क्षेत्राची इमारत अवलंबून आहे. त्याच्या नावाने बोंब ठोकत प्रत्येक जण आपल कर्तृत्व लपवत होत. जमल तशी मोडतोड आणि बांधकाम चालू होतं त्यामुळे भक्कम अस काही झालं नाही. आणि ही इमारत आता मोडकळीस आली आहे.तीच सोंदर्य तर कधीच गेलंय. वेगवेगळ्या प्रयत्नाचा कामचलाऊ मेडक्यांनी कसंबसं छत आतापर्यंत तोलून धरलं पण आता ते अंगावर पडायची वेळ आली आहे.
सध्या लॉक डाऊन मुळे जग थांबलं आहे. महाविद्यालये बराच काळ बंद राहणार आहेत,पुढच्या वर्षीच ऍडमिशन कशी होतील हे काही सांगता येत नाही. शिक्षकांच्या नोकऱ्याच काही सांगता येत नाही.
तर आपण जर पुढच्या जर एक वर्षाचा प्लॅनिंग करून जर ही इमारत परत बांधयाला घेतली तर.अगदी पाया खणून.
सप्टेंबरपर्यंत जो वेळ आहे त्याचा उपयोग पाया घालणेसाठी होईल त्यानंतर आपल्याकडे किती शिक्षक कामाशिवाय राहतात त्यांचा अंदाज घेऊन पुढची बांधणी करता येईल.
अगदी अंगणवाडीपासून ते पार पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याची ही उत्तम संधी आहे.आता आलेल्या नाविन्यपूर्ण साधनांचा परिपूर्ण वापर या शिक्षण पद्धतीत करता येईल. नवीन शैक्षणिक उपकरणे , शास्त्रीय पुस्तके तयार करता येतील. शिक्षकांना खऱ्या अर्थाने उपग्रेड करायला हे वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता येईल.गेल्या काही वर्षात ज्ञानाचा झराच आटला आहे.सगळी विहीर आम्ही संपवली आहे. आता त्यात परत भर घातली पाहिजे.यासाठी आपल्याकडील शिक्षकांचा वापर करू शकतो.
मी मागे एकदा 1880 सालच पुस्तक वाचलं होतं त्यात मॅकले च्या शिक्षण पद्धतीवर टिका केली होती . म्हणजे त्याच्या शिक्षण पद्धतीचे दोष 140 वर्षांपूर्वीच लक्षात आले होते तरीपण अजूनही आम्ही त्याच्या नावाने बोंब ठोकत आहे.तर आता आपल्याकडे हे मॅकलेचे भूत गाडून टाकण्याची परिपूर्ण संधी आली आहे त्यांचा अवश्य उपयोग व्हावा.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स,पुणे

****** चायना माल, आणि मानसिकता******

1998-99 चा काळ असावा. मेड इन चायनाची गजरची घड्याळं पार खेडोपाडी पोहोचायला लागली होती आणि आमच्या देशाची वेळ बदलायला सुरुवात झाली. 50 रु ला मिळणाऱ्या त्या गजराच्या घड्याळान देशाची अभिरुची आणि दूरदृष्टी बदलायला सुरुवात केली होती. आजोबांन त्याच्या तरुणपणात त्यांच्यासाठी घड्याळ घ्यावं आणि नातवाने ते त्याच्या तरुणपणात हातात कौतुकाने मिरवाव ह्या अपेक्षा संपायला सुरुवात झाली .
गुणवत्ता आणि टिकाऊपणाला किंमत देण्याची मानसिकतेचे बारा वाजले .कोईभी चीज 49,99 रु अशा कचऱ्याच्या भावात मिळणाऱ्या वस्तूंमुळे कचरा जमायला सुरुवात झाली. हळुहळु माणसाची मानसिकताच कचरा झाली.
USE and THROW एक नवीन संकल्पना या चायना मार्केट मुळे रुजू लागली. प्रत्येक जण आताचा विचार करू लागला. प्रत्येक प्रश्नाच्या मुळात न जाता वरून मलमपट्टी करू लागला.आतापुरत काम होतंय ना भविष्याचा विचार कशाला अस प्रत्येकाला वाटू लागलं. वस्तू सोडा लोकं लोकांना use अँड throw करायला लागला. याचा तोटा म्हणजे सामाजिक बांधिलकी कमी व्हायला लागली.लोकांच्यात इर्षा वाढू लागली, जागा टिकवून ठेवण्यासाठी चाटुगिरी वाढू लागली. इथेच कागद वाढायला सुरुवात झाली.
चायनाने आणलेल्या वस्तू दिसायला देखण्या होत्या .दिसायला मस्त आणि किमतीला स्वस्त. लोक बाह्यरूपावर भाळायला लागली. वस्तू खराब झाली तर स्वस्त आहे काय फरक पडतोय ही मानसिकता झाली.चांगल्या वस्तूची डिमांड कमी व्हायला लागली. हाच पॅटर्न सर्व क्षेत्रात वापरला जाऊ लागला.चकाचक ऑफिस, गुळगुळीत कागदपत्रं वाढायला लागली. फळं देणारी झाडं लावायच्या ऐवजी शोबाज नखरेल झाडं सगळीकडे मिरवू लागली. या झाडांच महत्व सर्व क्षेत्रात वाढू लागल. असल्या या परिसराच प्रतिबिंब माणसांच्या वर्तनात पण पडु लागला. सगळीकडे नपूसंक वातावरणाची निर्मिती होऊ लागली .माल कसाही असो पॅकींग चांगलं पाहिजे.पुढं पुढं तर लोक पॅकिंगच्याच इतकं प्रेमात पडू लागले की ते पॅकिंगच शोसाठी ठेऊ लागले. पॅकिंगच्या आतला माल काय आहे ते बघायला विसरू लागले आणि हळूहळू वस्तुपेक्षा पॅकिंगच्या भाव आला.
एखादा माणूस किती काम करतो याच कौतुक मागे पडून काही काम नाही हो फक्त दोन सह्या करतो आणि एव्हढा मोठा पगार घेतो याच कौतुक वाढायला लागलं किंबहुना लोकांना कमी काम करून जास्त पैसा मिळवणं हे स्टेटस सिम्बॉल वाटू लागलं. त्याचाच परिणाम या नवीन पिढीवर होत आहे. कष्ट आणि मेहनत करून पैसा कमविणे हे दुय्यम समजले जाऊ लागले.
आपल्याकडे मिळणार चायनीज खाणं खऱ्या अर्थाने चायनीज नाही तरी पण या चायनीज खाण्याने आमच्या जिभेला नवीन चवी दिल्या . अन्ना मध्ये पोषक द्रव्य किती आहे , ते शरीरासाठी घातक आहे का यापेक्षा ते किती चटपटीत लागत यावर जास्त भर दिला जाऊ लागला.त्याचे परिणाम आरोग्यावर होऊ लागले आहेत.
चायनाने इतक्या प्रकारचये प्रोडक्ट बाजारात आणले आहेत की त्यामुळे चालू पिढीला नवनिर्मिती ची ओढच वाटत नाही. ज्वारीच्या कडव्याच्या थाटापासून वस्तू बनवायची कला संपली. स्वतः पतंग करून उडवायचा जमाना गेला.तयार बॅटरी वर चालणारी आधुनिक खेळणी त्यांच्यामधील जिज्ञासा कमी करू लागली. खेळण्याचा उपयोग शिक्षणासाठी करायच्या ऐवजी शिक्षणाचंच खेळणं झालं.
चायनाच्या प्रोडक्टने केवळ आमचं अर्थशास्त्रच नाही तर समाज शास्त्र, राज्य शास्त्र, आरोग्यशास्त्र , शिक्षण शास्त्र सगळं बघता बघता कधी बदलून टाकलं हे कळलंच नाही.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे

**** ऑस्ट्रीच अल्गोरिदम*****

अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र: बात तो कर लो. (भाग 9)
ऑपरेटिंग सिस्टीमचा अभ्यास करताना एक अल्गोरिदम होता "ऑस्ट्रीच अल्गोरिदम" . हा अल्गोरिदम डेड लॉक संबंधी होता.
ऑस्ट्रीच हा पक्षी आहे ज्याला मराठीत आपण शहामृग म्हणतो.
तर शहामृगचा धावण्याचा वेग हा 70 किलोमीटर/ तास असतो.
याच्या पायात इतकी ताकद असते की एका फटक्यात सिंहाला गारद करू शकतो पण या ताकदीचा त्यालाच अंदाज नसतो . त्याच्यावर एखादं संकट येत म्हणजे कुठलाही प्राणी त्याच्या मागे लागला की तो संकटाचा सामना करणे अथवा पळण्याचे ऐवजी स्वतः च डोकं जमिनीत खुपसतो आणि कल्पना करतो की संकट टळलं. आणि त्याच्या यावृत्ती मुळेच तो मारला जातो.
ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ऑस्ट्रीच अल्गोरिदम तेव्हाच फायद्याचा असतो जेव्हा सिस्टीमचे आयुष्य डेड लॉक येण्याच्या पूर्वीच संपणार असते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले तर चालते.
आमच्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गेली कित्येक वर्षे हाच अल्गोरिदम वापरला गेला आहे. असू दे, चालू दे अस म्हणत आम्ही प्रत्येक प्रश्नाला बगल दिली . कागदावर निव्वल आकडे वाढवून प्रत्येक प्रश्न झाकून टाकले.एखाद्या प्रश्नाला लढा द्यायच्या ऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष्य केलं. कागदी घोडी नाचवींत फायलीच्ढि चे ढिगारेच्या ढिगारे बनवले आनि त्याच्याखाली तोंड लपवल.
काय होणार? कशाला होणार? याचा विचार मीच का करू ? मलाच काय पडलंय? जाऊ दे तिकडं जे सगळ्यांचे होईल तेच आपलं होईल अस म्हणून कुठलाही प्रॉब्लेम आला की आम्ही सोयीस्कर पाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.आम्ही मान खुपसून बसलो कागदात आणि मनाला समजावत बसलो की काहीही प्रॉब्लेम नाही...
पण आता वेळ आली आहे.संकट पुढ्यात आहे आणि आता आम्हाला जाणीव झाली पाहिजे आपल्यातील ताकदीची. हे मंदीच संकट केवळ आपण ठाम पणे उभं राहिलं तरच जाणार आहे .
आता लढण्याशिवाय पर्याय नाही. आता पळण्याच्या साऱ्या वाटा संपल्या आहेत.पगार मिळायचे तर बऱ्याच ठिकाणी थांबले आहेत. इथून पुढं काय होईल कोणीही सांगू शकत नाही.बाहेर मार्केटला उतरून स्वत:ला अजमावण्याच धाडस आता संपलेलं आहे.ज्यांच्यात धाडस होत ते आधीच सोडून गेलेले आहेत.
अशावेळी राजकारण सगळं बाजूला ठेवून शांतपणे विचार केला पाहिजे. एक तर पळलं पाहिजे नाहीतर लढल पाहिजे.
...आता मान बाहेर काढलीच पाहिजे नाहीतर सगळंच अवघड आहे.

ओन लाईन ...बिन लाईन

रवा पोस्ट टाकली होती, " केवळ ऑन लाइन लेक्चर घेऊन निव्वळ विद्यापीठाच्या परीक्षेसाठी तयार करून आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करत नाही का?
बऱ्याच जणांनी रिप्लाय दिले , धन्यवाद.
ही पोस्ट टाकण्यामागे माझी एक इच्छा होती की यावर विचार मंथन व्हावे आणि त्यामधून काही तरी नवीन मार्ग निघावा.
आपण नेहमी म्हणतो की मुलांचे प्रॅक्टिकल ज्ञान कमी आहे. इंडस्ट्रीच पण तेच मत आहे.आपल्याकडे मार्कस मिळवायला मुले कमी पडत नाहीत. कमी पडतात ते प्रॅक्टिकल ज्ञानाला. हे सर्वांनाच माहिती आहे.अस असताना देखील आपण नेहमीच थेअरीवर भर देऊन मोकळे होतो. कारण प्रॅक्टिकलचे मार्क्स हे आपल्या हातांत असतात. इंजिनिअरिंगमध्ये सध्या प्रॅक्टिकलचा संबंध हा शंकरपाळीतल्या शंकरसारखा झाला आहे . ही एक प्रकारची फसवणूकच नाही का?
आता ही सगळ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची दुसरी सेमिस्टर आहे. यानंतर BE ची मुले डायरेक्ट बाहेर पडणार आहेत. ही वेळ आहे ती खूपच संवेदनशील आहे. या करोनामुळे जूननंतर मार्केट कसे असणार आहे ते सांगता येत नाही किंबहुना पुढची दोन वर्ष कशी असतील हे कुणीही सांगू शकत नाही.त्यामुळे आता भले थेअरीला मार्क्स कमी पडली तर चालतील पण प्रॅक्टिकल त्यांना जमण गरजेचं आहे.
बऱ्याच लोकांना वाटत की आम्ही सिम्युलेशन करून दाखवू. सिम्युलेशन करून पाहायला मर्यादा असतात. इंजिनिअरिंग हे पंचेंद्रियाने शिकायचं असते. जस जशे खडू फळा शिक्षण पद्धतीचे अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रातून मह्त्व कमी व्हायला लागले तसतसे शिक्षण शिक्षकाच्या हातून आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जायला सुरुवात झाली आहे.
प्रत्येक वेळी आपण पाश्चात्य पध्दतीचा विचार आपल्या शिक्षणात करायला पाहतो पण आपल्या विद्यार्थ्यांची जडणघडण ही वेगळी आहे.स्वतः शिकणे आणि त्याची जबाबदारी घेणे हे त्यांना जमत नाही. आपल्या मुलांना प्रत्येक गोष्ट ही हाताने शिकवायला लागते हे सत्य आहे.
आज जर आम्ही ई लर्निंगचा उदो उदो करायला लागलो तर उद्याची अवस्था वाईट होईल .450 रु ला कोर्स मिळतात ऑन लाईन . आजकाल कंपन्या शैक्षणिक पात्रता पाहण्या ऐवजी काय येत हे पाहतात .जर प्रॅक्टिकल मिळणार नसेल आणि जर सिम्युलेशनच करायची तर इंजिनिअररिंग कॉलेजला जायचं कशाला? उद्या लोकं त्याचाही विचार करायला लागतील. या विषयात मला खोलात जायची इच्छा नाही.
बऱ्याच ठिकाणी इंटरनेटची रेंज मुलाना मिळत नाही. बऱ्याच कॉलेजना ऑन line ट्रेनिंग देणं जमत नाही . मुलं मानसिक सैरभैर झाली आहेत. त्यांना आता गरज असणार आहे शिक्षकांची. त्यांना प्रॅक्टिकली कस स्ट्रॉंग करता येईल हे पाहिलं पाहिजे.
शेवटी किती झालं तरी विद्यापीठला ऑन line लेक्चर मुलांनी केलं आणि त्यांचा अभ्यासक्रम संपला अस आपण सांगू शकत नाही आणि ते विद्यापीठ पण म्हणू शकत नाही. लेक्चर ही घ्यावीच लागणार आहेत.मग ही कुतर ओढ कशाला करायची .
सध्या करोनाच्या साथीमुळे सारं जग थांबलं आहे.सर्वाना हा खरच छान वेळ मिळाला आहे त्यांनी तो knowledge अपग्रेड करण्यासाठी वापरावा.आपल्या स्वतः साठी विद्यार्थ्यासाठी ,संस्थेसाठी आपण इतर काय शिकू शकतो, काय माहिती मिळवू शकतो ते पाहावं अस मला वाटतं. इतका काळ आपण एका चाकोरीबद्ध आयुष्यात जगलो आता वेळ मिळाला आहे तर सर्वांनी स्वतः ला अपग्रेड करावं असं मला वाटत.
जर त्यातूनही लेक्चर घ्यायची तर विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रात काय संधी आहेत. सध्याच नवीन तंत्रज्ञान काय आहे आणि आपण शिकवत असलेल्या विषयाची त्यासाठी काय गरज आहे याची माहिती द्या.
तुमची मते अवश्य मांडा.

करोना..... कुछ तो करो ना.

ज्यावेळी संकटे येतात त्यावेळीसच केवळ माणसाचीच नाही तर समाजाची खरी परीक्षा होते. कठीण परिस्थितीत समाज कसा सामोरा जातो त्यावरून त्याची सामाजिक , मानसिक , वैचारिक पातळी दिसून येते.
प्रसंग १ :गेल्या पावसाळ्यात महाराष्ट्रात पुराने थैमान घातले होते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात खूपच अवस्था बिकट झाली होती. गावेच्या गावे पुराच्या पाण्याच्या विळख्यात सापडली होती. लोक बाहेर पडायला काही नाही म्हणून घरातच आणि काहीतर घरावर अडकली होती. काय करायचं हेच कळत नव्हत , नावा ,होड्या अपुर्या होत्या त्यामुळे लोकांना बाहेर काढता येत नव्हत. सगळीकडे हतबलता आली होती. कधी कधी विचार करतो कि हतबलता कशानं आली होती तर आम्ही शिकलेली लोक विचार करायाची क्षमता गमावून बसलो आहोत आणि आम्हाला काहीही स्वत: करायची इच्छा नाही आम्ही फक्त बघे झालो आहोत. इतक पाणी आल असताना आम्ही आमच डोक गमावून बसलो . एक दोन कमी शिकलेल्या माणसांनी अक्षरशः मोठ्या काहीलीचा वापर करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले पण आम्ही आमची बुद्धी लावू शकलो नाही. सांगली आणि कोल्हापूर भागात डझनाने इंजिनियरिंग कॉलेजेस आहेत आणि त्यात शिकणारी हजारो पोर . प्रत्येक कोलेजला वर्कशोप आहे पण आमची बुद्धी चालली नाही कि मुलांचा वापर करून पत्रे वगैरे जोडून पटकन काही नावा बनवाव्या. किंवा मुलांच्या लक्षात आल नाही कि आपल्या आसपास हजारो प्लास्टिकच्या बाटल्या असतात त्यांचा वापर करून एखादा तराफा बनवावा. त्यावेळी मी दोन इंजीनियारिग कोलेजला संपर्क केला पण त्याचं म्हणन पडल कि हे आपल काम काम नाही. खर तर जाहिरात करायची मोठी संधीपण होती.
प्रसंग २: सध्या करोनाने धुमाकूळ घातला आहे आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी लागणारी सुरक्षाप्रणाली खूपच तुटपुंजी आहे. त्यात चीनमधून आम्हाला आयात करायची इतकी सवय लागली आहे कि आम्ही आमच्या देशात पर्यायच उभे करू दिले नाही . चीनची वस्तू स्वस्त आणि आमची वस्तू महाग का ? यावर कधी पर्यायच शोधला नाही. नोकर बनवण्याच्या नादात आम्ही मुलांच्या विचारशक्तीला वावच दिला नाही . आज आमच्याकडे वेनटीलेटरचा तुटवडा पडू शकतो त्याला पर्याय शोधण्याची गरज आहे .आजच लोकसत्ताला आल आहे त्याप्रमाणे बऱ्याच वैद्यकीय गोष्टींचा तुटवडा आहे त्यावर विचार मंथन व्हायची गरज आहे पण यावर कोणीही चर्चा करताना दिसत नाही. यावेळीपण काही ठिकाणी संपर्क केला पण काहीही रिस्पोंस नाही.
आज आपल्या इंजिनियरनी भरलेल्या देशात आपत्तींना कस तोंड द्यायचं हेच कळत नाही . प्रत्येक गोष्टीसाठी हाय टेक पर्याय शिकवल्यामुळे या मुलांना आसपासच्या गोष्टीपासून एखादी गोष्ट कशी बनवायची हेच कळत नाही. आपले विद्यार्थी हेच आपल भविष्य आहे हे कुणी लक्ष्यातच घेत नाही. नशीब अजून करोना आटोक्यात आहे पण पुढच्या क्षणाला काय वाढुन ठेवलं आहे हे सांगता येत नाही . तरी ज्यांना मनापासून वाटत कि आपण आपल्या देशासाठी कांही करू शकतो त्यांनी आपल्याकडे असणाऱ्या साधनाचा वापर करून काय करता येईल हे शोधल पाहिजे. अनलिमिटेड इंटरनेट पॅकचा खऱ्या अर्थाने वापर करायची वेळ आली आहे .
नक्कीच कुणाला काहीतरी सापडेल . उगा अफवा फोरवर्ड करण्यापेक्षा आणि अफवा वाचत बसण्यापेक्षा , चघळत बसण्यापेक्षा काहीतरी धीराच्या गोष्टी शोधा आणि त्या पसरवा. लोक अखेर आशेवरच जगतात. कालच परभणीच्या एका मुलाने केलेलं व्हेन्तिलेटरच मॉडेल पाहिलं . तस ते मॉडेल खूपच प्राथमीक अवस्थेत आहे पण तरीही त्याला सलाम केला पाहिजे . त्याने केलेल्या मॉडेल मुळे कितीतरी लोकांना उत्साह आला. सध्या मी एका ग्रुपच्या सोबत आहे त्यांनी पण त्याचं डिझाईन पूर्ण करत आणल आहे. दोन तीन दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
माझी सर्व अभियंत्याना विनंती आहे. कुणीतरी काहीतरी करील यावर बसू नका .प्रत्येकाने काहीतरी हातभार लावावा . कुठेतरी सुरुवात केलींच पाहिजे कदाचित यातून नवीन संधी तयार होतो.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे