Sunday, March 15, 2020

***** स्वत: ओढवून घेतलेली गरिबी. *****“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “ (भाग ४)

***** स्वत: ओढवून घेतलेली गरिबी. *****
“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “ (भाग ४)
प्रसंग पहिला : अशाच एका कॉलेजाला भेट द्यायला गेलो होतो. संस्थेचे डायरेक्टर त्यावेळी संस्था ऑफिसला होते. आधीची थोडी ओळख होतीच .म्हटलं चला भेटावं. भेटायला गेलो डायरेक्टरसाहेबांच्या पुढे काही माणस उभी होती आणि समोर एक चेक पडला होता त्यावरून ते हुज्जत घालत होते कि इतकं बिल कस झालं . जवळपास सोळा मिनिटे यावर विचारमंथन झाल आणि त्या चेकवर नंतर सही करतो म्हणून त्या माणसाना बाहेर पाठवल. सहज चेकवर नजर पडली . चेक होता फक्त १६० रुपयाचा. खूपच वाईट वाटले . जवळजवळ बत्तीस वर्षाचा इतिहास असणाऱ्या संस्थेच्या डायरेक्टरवर १६० रुपयाचा चेकवर सही करायला लागणे आणि ती सही करताना सोळा मिनिट वाया घालवायला लागणे यासारखी वाईट गोष्ट नव्हती.
थोडा वेळ गेला मग डायरेक्टर साहेब बोलायला लागले. काय सांगू सर ,एके काळी आमच्या इथे डोनेशन चालत होत पण आता अॅडमिशन होत नाहीत. लोकांचे पगार सहा सात महिने झाले आहेत थकले आहेत. गेले चार पाच वर्ष झाले हे असेच चालले आहे. मी विचारले मग मॅनेजमेंटच पुढ काय प्लानिंग आहे. ते म्हणाले काय आता या वर्षी एक कोटी दहा लाख रुपये खर्चून नॅशनल लेव्हलच खेळाच मैदान तयार केल आहे. क्षणभर डोक भंडावलं. म्हटल विद्यार्थ्यासाठी मग ट्रेनिंग च कस काय ? लगेच रडायला सुरुवात … काय सांगायचं सर , हा सगळा खेड्याचा भाग . सगळे गरीब विद्यार्थी . पैसे देत नाहीत . आहो कॉलेजची फी भरत नाहीत. ते ट्रेनिंग काय करणार ?
*******
प्रसंग दुसरा : असच एका कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी बोलणी करायला बोलावल होत . कॉलेज तस शहरापासून दूरच होत. कॉलेज मधून डिपार्टमेंटकडे चाललो. लंच ब्रेक होता . कट्ट्यावर , जिन्यात ,पायऱ्यावर मुले निवांत बसली होती. प्रत्येकाच्या हातात अन्द्रोइड फोन होता . निवांतपणे whats app वर चाटिंग वगैरे चालू होत. कुणालाही कुणाकडे बघायला वेळ नव्हता, अगदी तंद्री लागली होती.
एच. ओ. डी. ना भेटलो . एच. ओ. डी. नी सागितलं कि त्यांना मुलांच्या प्रोजेक्टसाठी वर्कशोप पाहिजे. म्हटल काही काळजी करू नका आपल्या ट्रेनिंग नंतर त्यांना प्रोजेक्ट करायला नक्की जमेल . एच. ओ. डी. म्हणाले पण आमच्या मुलांना प्रोग्रामिंग येत नाही. मी म्हणालो हरकत नाही सर या वर्कशोप नंतर त्यांना प्रोग्रामिंग सुद्धा जमेल . एच. ओ. डी. ना त्यांच्या मुलाविषयी विश्वास होता त्यामुळे ते परत म्हणले आमच्या मुलांना अजून पार्टसची नावे पण माहित नाहित . आता आमचा आमच्या ट्रेनिंग वर विश्वास होता म्हणून मी म्हणालो काही काळजी नको मुल त्यांचा प्रोजेक्ट ते स्वत: करतील . मग म्हणाले ठीक आहे पण तुमची वर्कशॉपची फी जरा जास्तच आहे . आता मला यांच्यासमोर काय बोलाव कळेना. ते म्हणाले आहो आताच आमच्या मुलाकडून इंडस्ट्री व्हिजीट गोव्याला जाणार आहे चार दिवसासाठी म्हणून पैसे घेतले आहेत. आता पुढच्या आठवड्यात गॅदरिंग आहे त्याचा पण खर्च आहे सध्या त्यामध्ये पोर गुंतली असल्याने आपल्याला या आठवड्यात वर्कशॉप घेता येणार नाही . वास्तविक पाहता त्या मुलांनी इंडस्ट्री व्हिजीट साठी जितके पैसे भरले होते त्याच्या पंधरा टक्के इतकीच फी मी तीन दिवसाच्या वर्कशोप साठी मागितली होती.
काय करायचं ? आणि लगेच पुढच पेटंट वाक्य सुरु झाल आमची पोर गरीब आहेत .हा सगळा खेड्याचा भाग . सगळे गरीब विद्यार्थी . पैसे देत नाहीत . आहो कॉलेजची फी भरत नाहीत. ते ट्रेनिंग काय करणार ?
*****
आता मात्र माझी थोडी सटकली. आणि दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट घडली. मी म्हणलो सर, हि गरीब पोर तुम्ही कॉलेजला घेताच कशाला ? हि पोर खरीच गरीब आहेत का ? पंधरा हजार रुपयाचा मोबाईल फोन वापणारी मुले हि गरीब कशी म्हणायची. आणि असली हि दलीन्द्री पोर तुम्ही किती काळ सांभाळणार आहात . हि पोर गरीब नाहीत तर त्यांना माहित आहे कि आज तुम्हाला त्यांची गरज आहे . हे चित्र बनवलं कुणी.? हि पोर पण इतकी डोक्यावर बसली आहेत कि वर्गात लेक्चरला बसत नाहीत , प्रॅक्टिकलला येत नाहीत . सबमिशन करत नाहीत . इतकी माजली आहेत . आपल्याला हि किंमत पण देत नाहीत. कशीबशी पास होतात . प्रॅक्टिकल आणि टर्म वर्कला आपणच मार्क देतो ना . यांना ट्रेनिंगसाठी पैसे नाहीत मग यांची प्लेसमेंट कशी होणार ? प्लेसमेंट नाही तर कॉलेजच नाव कस उजळणार . त्याशिवाय पैसे देणारी चांगली मुले कशी येणार ? हि मुल गरीब नाहीत तर आपली मानसिकता गरीब झाली आहे. इंजिनियरिंगच्या मुलांना ज्याचं प्रॅक्टिकल ज्ञान चांगल आहे त्यांना जॉब हे आहेतच . भारतातच नव्हे तर जगभर जॉब आहेत. पण आम्ही आमची मानसिकता बदलली पाहिजे . आम्ही आता आमचे विचार बदलले पाहिजेत . आपल्याला या असल्या गरिबांची किळस आली पाहिजे . आपल्या कॉलेजला चांगले विद्यार्थी यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .
आता संस्थेन पण ठरवलं पाहिजे कि आपल्याकडे डोनेशन देणारी पोर आली पाहिजेत त्यासाठी काय कराव ? शिक्षकांनी पण विचार केला पाहिजे कि आपल्याला सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळाला पाहिजे आणि तो पण प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला. हे स्वप्न रंजन नाही हे शक्य आहे. आमच्या पुण्यातच एक कॉलेज अस होत कि २०१० पर्यंत त्या कॉलेजला टुकार मानण्यात येत होत पण त्यांनी ठरवलं आता बदलायचं, आता त्यांची जवळजवळ चार कॉलेज आहेत . डबल इनटेक , फुल अॅडमिशन विथ डोनेशन. अर्थातच हे करण्यासाठी चार ते पाच वर्षाचच प्लानिंग केल पाहिजे आणि त्याबरोबरच कष्ट करन्याबरोबरच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तयारी ठेवली पाहिजे .
आता गरज आहे ही गरीब विचारसरणी बदलण्याची कारण ही जर बदलली नाही तर अवघड आहे....खूपच अवघड आहे.
मॅनेजमेंटच पण आणि शिक्षकांचं पण.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

***** खानदानी शफाखाना आणि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र *****“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “- भाग १

***** खानदानी शफाखाना आणि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र *****
“अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र- बात तो करलो “- प्रस्तावना
दर शनिवारी बायको पोराला घेऊन घरातच टी. व्ही.वर पिक्चर बघायचा नेहमीचा प्रोग्राम . केबल किंवा डिश नाही . इंटरनेट कनेक्शन आहे आणि अमेझोन प्राईमची मेंबरशिप घेतली आहे . जवळ जवळ बऱ्यापैकी पिक्चर बघून झाले आहेत . आता काय बघायचं तेव्हढ्यात “खानदानी शफाखाना” दिसला म्हटल चला आज “खानदानी शफाखाना” बघू तर बायको म्हणाली चांगला नाही तो पिक्चर. म्हटलं काय झाल. म्हणाली रिव्यू वाचला आहे त्या विषयावरचा आहे. म्हटलं कुठल्या विषयावरचा आहे. आता मात्र बायकोने डोळे मोठे केले आणि मग आपण विचार बदलला आणि मस्तपैकी (गपगार ) कुंग फु पांडा पाहिला .
काल मात्र बायको आणि पोट्ट चार दिवसासाठी गावी गेलेची संधी साधली आणि बघून टाकला. खूप मोठा साक्षात्कार झाला. “गुप्तरोग” याला समाजाने बदनाम केल्यामुळे या विषयावर कुणीही बोलत नाही. त्याला चांगल मानल जात नाही . त्यामुळे त्यावर योग्य उपचार होत नाहीत . यावर उपचार करणेसाठी चांगली औषधे बाजारात उपलब्ध आहेत . तज्ञ लोक आहेत पण रोगाची लाज वाटल्याने लोक भोंदू बाबाकडे , रस्त्याकडच्या हकीमाकडे जातात . काहीजण इतरांचं ऐकून, किंवा काहीतरी वाचून स्वत: प्रयोग करत बसतात , काहीतर अंगावरच काढतात मग हळूहळू रोग गंभीर होत जातो. त्यावर एकाच उपाय म्हणजे या विषयावर बोलले पाहिजे . म्हणून चित्रपटाची नायिका “ बात तो कर लो “ हे अभियान सुरु करते . आणि त्यावर समाजात उमटणाऱ्या प्रतिक्रिया यावर बेतलेला अतिशय छान सिनेमा . खर तर सर्वांनी पाहिला पाहिजे पण काही विषय आम्ही बदनाम केलेले आहेत आणि त्यांचे तोटे आज समाज भोगत आहे .
आज आमची अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्राची पण अवस्था तशीच झाली आहे . लाखो कुटुंबाचा हा अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्ररुपी आधारपुरुष त्याला “गुप्तरोग” झालेला आहे . सध्या व्हेन्तिलेटरवर आहे पण याविषयावर कुणीही बोलायला तयार नाही. प्रत्येकजण त्याला लपवत आहे. तो खंगत चालला आहे . त्याला वाचवण अवघड नाही पण त्याच्यावर योग्य औषधोपचार झाले पाहिजे. त्याला केवळ जगवून चालणार नाही तर त्याला सक्षम बनवलं पाहिजे . तुम्ही त्याच्यावर जितकं बोलायचं टाळाल तितकं त्याची परीस्थिती गंभीर होत जाणार आहे . तरी याविषयावर सर्वांनी बोलल तरच यावर काहीतरी उपाय निघेल.
कुणीही काहीही बोलत नाही त्यामुळे सध्या इतके प्रयोग चालले आहेत कि हे क्षेत्र खिळखीळ होत चालल आहे . ए.आय.सी. टी.चे प्रयोग , डी.टी. ई. चे प्रयोग,आय. आय. टी. चे प्रयोग , संस्थापकांचे प्रयोग , त्यांनी नेमलेल्या स्पेशल डायरेक्टरचे प्रयोग , प्राचार्यांचे प्रयोग , एच. ओ. डी.चे प्रयोग , टी. आणि पी. चे प्रयोग , शिक्षकांचे प्रयोग . प्रयोग ,प्रयोग आंणी प्रयोग.
प्रत्येकाच्या मनात हा रोगी वाचावा हि सदभावना(?) आहे . पण या सगळ्याच्यामध्ये समन्वय नाही त्यामुळे देशी , विदेशी , परदेशी , हकिमी निम हकिमी , याचबरोबर यज्ञ कर्मे पण सुरु झाली आहेत . अजून काही काळाने वशीकरण ,विदवेषन ,उच्चाटन यासारखी लिंबू गंडादोराा या सारख्यया काळ्या जादूचे प्रयोग सुरु होतील . काही ठिकाणी सुरु झालेले पण आहेत . याविषयावर सविस्तर बोलेनच .
गेले दोन तीन महिने मी लिहिण बंद केल होत पण हा सिनेमा पाहून मला प्रेरणा मिळाली आहे आणि “अभियांत्रिकी शिक्षण- बात तो करलो “ हि नवीन लेखमाला सुरु करीत आहे . मागील “अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा” आणि “ अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटेवर “ या लेख मालीकाना दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाप्रमाणे या “अभियांत्रिकी शिक्षण- बात तो करलो “ मालीकेला पण तुमचे प्रेम मिळावे अशी . माझी प्रार्थना .
वाचा , प्रतिक्रिया अवश्य द्या .
शेअर करा .... हे सर्वासाठी आहे
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०.
या पूर्वीचे लेख वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या .

आर्डीनो प्रोग्रामिंगचे ज्ञान: काळाची गरज.

आर्डीनो प्रोग्रामिंगचे ज्ञान: काळाची गरज.
*********************************
आजकाल आर्डीनोची ओळख ही पाचवी ते अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्र या सर्वांना होत आहे.काही विद्यापीठानी तर अभियांत्रिकीच्या काही शाखांच्या अभ्यासक्रमात आर्डीनोचा समावेश केला आहे.
भारत सरकार पुरस्कृत अटल टिंकरिंग लॅब मूळे पाचवी सहावीची मुलेपण उत्कृष्टपणे आर्डीनोचा वापर करून छान प्रोजेक्ट्स बनवत आहेत.मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी आर्डीनोइतका सोपा प्लॅटफॉर्म नाही.
आर्डीनो काय आहे?
बऱ्याच जणांना वाटते त्याप्रमाणे आर्डीनो हा काही मायक्रोकंट्रोलर नाही. आर्डीनो म्हटलं की तीन गोष्टी येतात .
1. ऍटमेल कंपनीचे वेगवेगळे मायक्रोकंट्रोलर वापरून तयार केलेलं वेगवेगळे बोर्ड: यामध्ये आर्डीनो उनो, मायक्रो,नॅनो, लिलिपॅड असे अनेक बोर्ड आहेत.तुमच्या गरजेनुसार तुम्ही बोर्ड निवडू शकता.
2. आर्डीनो नावाचा प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्म:- मायक्रोकंट्रोलर प्रोग्राम लिहिण्यासाठी आर्डीनो इतका सोपा प्लॅटफॉर्म नाही. अजिबात क्लीष्टता नसलेला आणि कमीत कमी बटणं असलेला हा प्लॅटफॉर्म आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे यात असलेल्या लायब्ररी. यामध्ये असणाऱ्या लायब्ररीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर,मेमरी, अक्चुएटर,डिस्प्ले, कम्युनिकेशन प्रोटोकॉल यांच्या लायब्ररी चा वापर करून मोठमोठे प्रोजेक्ट अतिशय कमीत कमी वेळेत पूर्ण करता येतात.
3. आर्डीनोवर काम करणाऱ्या लोकांची कम्युनिटी- आर्डीनो वर काम करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.हे लोक हौशी असल्याने उत्साहाने काम करत असतात ,नवीन नवीन लायब्ररी तयार करतात,प्रोजेक्ट्स करून सर्वांना त्याचे कोड शेअर करतात त्याच बरोबर तुम्हाला कुठं अडलं तर मदत ही करतात.आज आर्डीनो बेस्ड प्रोजेक्ट टाकलं तर हजारो प्रोजेक्ट मिळतात.
आर्डीनो हा प्लॅटफॉर्म लहान मुलाना प्रोग्रामिंगचे ज्ञान देण्यासाठी बनवला होता पण त्याच्या सोपेपणा आणि सुटसुटीतपणा लोकांना इतका भावला की लोकांनी त्याला डोक्यावर घेतला. आजकाल बऱ्याच वेगवेगळ्या मायक्रोकंट्रोलरसाठी आर्डीनोमध्ये वापरले जाणाऱ्या तंत्रधारित प्रोग्रामिंग वापरायला सुरवात झाली आहे. ज्याप्रमाणे पायथॉन सर्वव्यापी झालं आहे त्याप्रमाणे भविष्यात आर्डीनो सदृश प्लॅटफॉर्म मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग साठी वापरले जाणार आहेत.त्यामुळे आर्डीनो प्रोग्रामिंगचे ज्ञान असणे आता गरजेचे झाले आहे.
या आर्डीनो विषयी खूपच गैरसमज पसरले आहेत त्याविषयी:-* आर्डीनो हा industry अप्लिकेशन साठी वापरता येत नाही-
-आर्डीनो बोर्ड हा जरी डायरेक्ट अप्लिकेशन मध्ये वापरता येत नसला तरी आर्डीनो बोर्ड आणि आय डी इ च्या साहाय्याने प्रोटो टाईप तयार केल्यावर तो प्रोग्राम केलेला आय सी आपण अँप्लिकेशन मध्ये वापरू शकतो.( आर्डीनो हा लहान मुलांचा प्लॅटफॉर्म आहे हे माझं स्वतः च मत होतं पण पेकेजिंग, आटोमेशन सारख्या काही इंडस्ट्री अप्लिकेशनमध्ये त्याचा वापर जसा च्या तसा केलेला जेव्हा मी पाहिले आहे त्यावेळेपासून आर्डीनो विषयी आदर माझ्या मनात निर्माण झाला)
* आर्डीनोचा उपयोग मेकॅनिकल, सिव्हिल या इलेक्ट्रॉनिकसतरेतर ब्रॅंचना काय उपयोग आहे?
- आर्डीनो हा मेकॅनिकल ,सिव्हिल,प्रोडवशन, आटोमोबाईल या सारख्या शाखेच्या विद्यार्थ्यांना एक प्रकारचे वरदान आहे.इलेक्ट्रॉनिकस आणि प्रोग्रामिंग याविषयी नावड निर्माण झालेने या शाखांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोजेक्ट चे आटोमेशन करता येत नाही.या शाखांच्या विद्यार्थ्यांना हा प्लॅटफॉर्म म्हणजे एक जादूची कांडीच आहे.
* आर्डीनोचा वापर खर्चिक आहे.
- अजिबात नाही.आर्डीनो हा ओपन सॉर्स प्लॅटफॉर्म आहे.याचे हार्डवेअर बोर्ड इतर बोर्डाच्या मानाने खूपच स्वस्त आहेत.आर्डीनो आय डी ई पण पूर्णपणे फुकट आहे,याच्या अपडेट्स पण फुकट मिळतात.
* आर्डीनो शिकून काय फायदा?
- आर्डीनो ने वापरलेली प्रोग्रामिंग तंत्र एकदम सोपे आहे आणि त्या तंत्राचा वापर आता बऱ्याच मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंग मध्ये करायला सुरुवात झाली आहे. जसा की pinguino हा PIC मायक्रोकंट्रोलर साठी, energia हा launch pad बोर्ड साठी, open plc हा plc प्रोग्रामिंग साठी असे बरेच प्लॅटफॉर्म बाजारात यायला लागले आहेत त्यामुळे आर्डीनो चा अभ्यास हा अभियांत्रिकी च्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना गरजेचा बनला आहे.
* अशा या आर्डीनो च्या ट्रेनिंग साठी डॉल्फिन लॅबसने ब्रँच निहाय वेगवेगळे प्रोग्राम तयार केलेले आहेत. हँडस ऑन प्रोग्रामिंग ही डॉल्फिन लॅबसचे खासियत आहे. डॉल्फिन लॅब्स कोणत्याही प्रकारचे रेडिमेड प्रोजेक्ट विकत नाही किंवा प्रोजेक्ट तयार करून देत नाही. ट्रेनिंग झालेवर त्यांच्या प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन लागले तर कोणताही आकार लावत नाही.
तरी तुमच्या शाखेच्या विद्यार्थ्यांना आर्डीनो चे ट्रेनिंग द्यायला अवश्य संपर्क करा.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स
9763714860

सॉरी शक्तिमान

आपण सगळ्यांनी शक्तिमान हि मालिका पाहिली असेलच. या शक्तिमान मालिकेने एक मंत्र दिला आणि वयाच्या चाळिशीनंतर सगळ्यांनी त्या मंत्राचा उपयोग करायलाच हवा आणि तो मंत्र आहे "सॉरी शक्तिमान ".
दैनंदिन जीवनात या मंत्राचा वापर करा आणि पहा आणि आपल्या आयुष्यात किती बदल होईल.सर्व साधारणपणे चाळीशी नंतर सर्वांनी एक पातळी गाठलेली असते. घरात, मित्र मंडळीत, समाजात एक स्थान निर्माण केलेले असते.आणि हे सर्व करत असताना बऱ्याच बऱ्यावाईट अनुभवाचा सामना केलेला असतो त्यामुळे थोडासा कडवटपणा आणि थोडासा अहंकार मनामध्ये आलेला असतोच शिवाय स्वतः विषयी एक रास्त अभिमान पण मनात जागृत झालेला असतो.
अशावेळी कधीकधी संभाषण करताना लहान मोठ्या चुका होतात,भांडणं होतात,अबोला वाढतो आपली जरी चूक असली तरी मन माफी मागायला तयार होत नाही आणि कधी कधी तुम्ही जरी बरोबर असला तरी पुढचा माफी मागत नाही.मग मनात राग राहतो , धुसफूस वाढते,चिडचिड वाढते.
मित्रानो अशावेळी "सॉरी शक्तिमान" हा मंत्र वापरा. हा मंत्र तुमची चूक असेल अशावेळी पण वापरा आणि पुढच्याची चूक असेल अशावेळी पण वापरा.हा मंत्र तुम्ही लहान मुलांपासून सर्वांच्या साठी वापरता येतो .फक्त हा मंत्र कसा वापरायचा याची पद्धत आहे.
समजा तुमच्या हातून चूक झाली लगेच चेहऱ्यावर हास्य आणा आणि म्हणा "सॉरी शक्तीमान" पुढचा नक्कीच हसुन तुम्हाला माफ करेल समजा जरी नाही हसला तरी आपल्याला काही फरक पडत नाही कारण चूक आपली असते.
समजा चूक पुढच्याची आहे आणि तो ऐकत नाही अशावेळी पण म्हणा " सॉरी शक्तिमान" आणि यावेळी मात्र पुढचं वाक्य मनातल्या मनात म्हणा "काशीत जा" आणि निघा तिथुन.
मित्रांनो ,आतापर्यंत तुम्हाला मनाच्या शांतीचे महत्व कळून चुकले असेल.आपण आयुष्य भर आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. कितीतरी पैसे घालवतो, कुठे कुठे फिरतो, पण आनंद हा फुकट असतो हेच आपल्याला लक्षात येत नाही. जर मन शांत असेल तर त्यावर आनंदाचे तरंग नक्कीच उमटतील. तरी हा मंत्र वापरायला सुरुवात करा आणि आपले आयुष्य आनंदी करा.
धन्यवाद.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

इंजिनियरिंग वरची हरवलेली श्रद्धा

नुकतंच लग्न झालं होतं. बायकोला घेऊन गेलो होतो शिखरशिंगणापूरला , कुलस्वामीच्या दर्शनाला. रांगेत उभा राहिलो तोपर्यंत काही पुजारी मागे लागले अभिषेक करा म्हणून. अभिषेक करण्या चा दर विचारल्यावर सांगितलं की ग्रुपमध्ये केल्यास 5१/- आणि स्पेशल केल्यास 501/-. खिशात पैसे खुळखुळत होते म्हणून 501 रुपयात स्पेशल करायचा ठरवलं. मनात जरा गर्वपण वाटत होता. गाभाऱ्यात उभा राहिलो. पुजाऱ्याने थोडी वाट पाहायला सांगितले. ग्रुपने अभिषेक चालू होता.कुठली कुठली गावाकडची माणसं ,बायका कलकल करत अभिषेक करत होते. भटजी काय मंत्र म्हणत होते काही कळत नव्हतं आणि व्यवस्थित ऐकू पण येत नव्हतं. भटजी मध्येच काय कळण्यासारखं सांगायचा लोक तसं करायचे .सगळा गोंधळ चालला होता .वाटलं माणसं काही सुधारणार नाहीत. मनातल्या मनात त्यांच्या गावंढळ पणाला हसत त्यांचे निरीक्षण करत होतो आणि अचानक मनात एक विचार आला आणि माझीच मला लाज वाटायला लागली. तो पुजारी काय मंत्र म्हणत होता हे त्यालातरी कळत होतं का हे माहिती नाही पण त्याने पाणी घाला, पिंड धुवा, फुले वाहा हे सांगत असताना तमाम सूचना लोकं ज्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने पाळत होते मला नक्की खात्री वाटली की तो पिंडीचा स्पर्श त्यांच्या मनात नक्कीच एक विश्वास निर्माण करत होता.त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील असं त्यांना विश्वास देत होता.त्यांना सांगत होता की तो त्यांच्या पाठीशी आहे.त्यांच्या डोळ्यात जी भक्ती दिसत होती असे वाटत होतं की तो पिंडीचा दगड साक्षात कैलासराणा बनला आहे आणि त्यांना आश्वस्त करत आहे.
मला लाज वाटली. भरपुर शिकलो, चांगला पैसा आहे. बायकोसोबत स्पेशल पूजा करतोय महागातला महाग हार घेतला आहे पण माझ्या मनात खरंच श्रद्धा आहे का? प्रामाणिकपणें मनातुन उत्तर आलं नाही.अभिषेक झाला पण मन शांत व्हायच्याऐवजी अशांत झालं.मनातून महादेवाची माफी मागून घरी आलो. दरवर्षी जातो पण एक कुलाचार म्हणून . श्रध्दा म्हणून नाही.खरच कितीतरी श्रद्धेची मोठी ताकद मी गमावुन बसलो होतो.
पण हीच श्रद्धा मात्र इंजिनियरिंगविषयी कायम आहे. आज जेव्हा मी काही इंजिनियरिंग विषयी करतो त्यावेळी लोक हसतात. पण मी त्याची फिकीर नाही करत कारण मला माझा महादेव त्यात दिसतो आणि त्यावर माझी अफाट श्रद्धा आहे.कधी कधी अस वाटत की इंजिनिअर हे पण महादेवाचच नाव आहे. "मी इंजिनिअर आहे" हे वाक्य तर मला गायत्री मंत्रासारखा वाटत.आयुष्यातल्या प्रत्येक संकटाच्या क्षणी मी इंजिनिअर आहे आणि मी काहीही करू शकतो हे वाक्य मनाशी उच्चारला की संकटांशी लढण्यासाठी हजार हत्तीचं बळ अंगात येत.
माझा विश्वास आहे जर विद्यार्थ्यांच्या मनात इंजिनियरिंग विषयी श्रद्धा निर्माण करता आली तर नक्कीच इंजिनियरिंगचे माहात्म्य परत वाढेल.
पण ही श्रद्धा निर्माण करायचं सामर्थ्य हे कुठल्याही संस्थेच्या इमारतीत नाही, त्या इमारतीभोवतीच्या रम्य परिसरात नाही, त्या संस्थेला भेटी देणाऱ्या सेलेब्रिटीत नाही, त्या इमारतीमध्ये असणाऱ्या वाय फाय मध्ये नाही,मोठं मोठ्या पदवी घेतलेल्या शिक्षकात नाही, मोठं मोठ्या नामांकित परदेशी विद्यापीठाबरोबर केलेल्या करारात नाही.
ही श्रध्दा निर्माण करण्याचा सामर्थ्य फक्त आणि फक्त इंजिनियरिंग वर श्रद्धा असणाऱ्या शिक्षकात आहे.मग त्याची पदवी कोणतीही असो.कारण देऊळ कितीही शोभिवंत बांधा, मूर्ती सोन्याची घडवा किंवा दगडाची ,अगदी मातीची जरी असली तरी पण त्यामध्ये देवपण आणण्याचं सामर्थ्य फक्त त्या देवावर अफाट श्रद्धा असणाऱ्या पुजाऱ्यातच असत. आता असे पुजारी शोधण्याची गरज आहे . हा लेख वाचणाऱ्यांनी स्वतः ला विचारण्याची गरज आहे की खरंच तुमची इंजिनिअरिंगवर श्रध्दा आहे का? तुमची जर श्रध्दा असेल तर तुम्हाला नक्कीच इंजिनियरिंगला स्कोप दिसेल.
* चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स , पुणे

शिकताय काय आणि नोकरी कशात करताय?

काल अचानकपणे एका खूपच जुन्या मित्राचा फोन आला. त्याची मुलगी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकत आहे .आता दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सत्राची परिक्षा दिली आहे आणि तिला कोर्स करायचा आहे म्हणून ती पुण्याला येत आहे . त्याला काही जास्त अभियांत्रिकी शिक्षणातल कळत नाही म्हणून त्यानं मला फोन केला आणि मुलीच्या हातात फोन ठेवला. मुलगी हुशार 8.5 cgpa(तस या cgpa तल आपल्याला काही कळत नाही तसं ते कुणालाच कळत नाही पण 10 पैकी 8.5 म्हणजे चांगलं असणार असा अंदाज).
मुलीला विचारलं की कोणता कोर्स करणार आहेस तर तीन सांगितलं की java, dot net चा करणार. थोडंस वैतागलोच. मुलगी दुसऱ्या वर्षाला , तीही मेकॅनिकलला आणि कोर्स करणार आहे java आणि dot net. बरं ,शिकतेय पण चांगल्या नामांकित संस्थेतून. स्वायत्तता मिरवणारी संस्था.दर वर्षी चांगल्या प्लेसमेंटची जाहीरात असते त्यांची. तीनं सरळ सांगितले की आमच्याकडे प्लेसमेन्ट होते चांगली पण ब्रँच कोणतीही असो प्लेसमेन्ट आय. टी मध्येच. मग आधीपासूनच java , dot net चा अभ्यास असला तर जॉब मिळतोच.
खूपच भडभडून आलं. आमच्या पुढच्या पिढीचा शिक्षणावरून किती विश्वास उडत चालला आहे ? हे भावी अराजकतेच लक्षण आहे असं वाटलं.कारण हळूहळू लोकांचा अभियांत्रिकी शिक्षणावरचा विश्वासच उडत चालला आहे.
आधी इलेक्ट्रॉनिक्स सारखी सोन्यासारखी ब्रँच ,तीच अवमूल्यन झालं आहे आणि आता मेकॅनिकल .आज आपल्या देशातील जवळ जवळ 95% मेकॅनिकल गोष्टी या रिप्लेसमेंट करण्याची गरज आहे आणि येत्या दहा वर्षात होणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि इतकं मोठं potential असणाऱ्या या शाखेच्या या विद्यार्थ्यांपुढे आपलं शिक्षण क्षेत्र संधी दाखवू शकत नाही ही खूपच दुर्दैवाची गोष्ट आहे.
मला त्या मुलीबरोबर त्या मला मित्राचं पण खूपच वाईट वाटलं.कुठून चार पैसे जमवून मुलीला मेकॅनिकल इंजिनिअरिंग ला घातलं आणि मुलगी IT चे कोर्स करणार आहे. माझ्या मित्रासारखीच अनेक पालकांची अवस्था आहे. मी काही जास्त बोललो नाही त्याला सांगितले की या आपण यावर डिस्कस करू. बघू या तिला तिच्या ब्रँच बद्दल विश्वास निर्माण करायला जमेल का?
इंजिनिअरला जॉब नाहीत ही खरच खुपच चुकीची समजूत आहे . ब्रँच कुठलीही असो खूपच संधी उपलब्ध आहेत. फक्त त्या शोधता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी मुलांनी पण स्वतः ला घडवलं पाहिजे.स्वतः चा आपल्या शाखेविषयाचा अभ्यास वाढवला पाहिजे.
चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
9763714860

*** इंजिनिअरिंग को स्कोप नही कहनेवाले तेरा मुहं काला.****

*** इंजिनिअरिंग को स्कोप नही कहनेवाले तेरा मुहं काला.****
इंजिनियरिंग करणं म्हणजे परीसाचा शोध घेणं असत,ज्यानी त्याला श्रद्धेनं शोधून स्पर्श केला त्यांचं आयुष्य सोनं झालं . पण त्याला स्पर्श करण एव्हढं सोपं नाही अफाट कष्ट करायला लागतात.पण हे कष्ट करायला नको म्हणून अंगावर गोल्डन कलर मारून जे परीस सापडला म्हणून मिरवतात ते काही काळानंतर आपोआपच उघढे पडतात आणि मग इंजिनिअरिंगला शिव्या देतात.
ज्या शिक्षणावर आपल्या आयुष्याची चाळीस वर्षे आनंदात जायची आहेत त्यांची तयारी चार वर्षात करायची आहे तर विचार करा की या चार वर्षात किती अभ्यास केला पाहिजे.आणि हो अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे प्रात्यक्षिक आणि अवांतर मिळवलेला अनुभव हेच असत . पण नुसती घोकंपट्टी करून मिळवलेले मार्क्स म्हणजे काही उपयोगाचे नसतात.
आजकाल या कलर मारलेल्या लोकांची संख्या जास्त झाली आहे आणि हेच लोकं इंजिनिअरिंग शिक्षणाला बदनाम करत आहेत. सर्वात वाईट एकाच गोष्टीच वाटतं, यातीलच काही शिक्षण क्षेत्रात पण आले आहेत ,शिक्षक बनले आहेत. ज्या अभियांत्रिकी पदवीच्या जीवावर आयुष्य भर पैसे कमवले, बंगले बांधले, स्वतः ची पोर इंजिनिअर बनवली त्यांना पुढील शिक्षणासाठी परदेशात MS (इंजिनिअरिंग चे पुढील शिक्षण) करायला पाठवली, हीच माणसे जेव्हा तोंड वाकडे करून इंजिनिअरिंगला स्कोप नाही म्हणतात त्यावेळी खूपच राग येतो.केवळ याच लोकांच्या मुळे नवीन शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खूप भोगाव लागत आहे.
मित्रानो ,आता वेळ आली आहे हे नकारात्मक विचार झटकून टाकण्याची.ही वेळ आहे इंजिनिअरिंग विषयी लोकांमध्ये सकारात्मकता जागवण्याची. सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
आज वेडयासारखी इंजिनिअरिंग ला नावं ठेवत मुलं इतर शाखांना जात आहेत पण त्यांना हे कळत नाही की इंजिनिअरिंग नाही तर उद्योग नाहीत आणि उद्योग नाही तर नोकऱ्या नाहीत. आता इंजिनिअरिंगविषयी लोकांमध्ये आणि आपल्या विध्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. यापुढे नकारात्मक विचार व्यक्त करू नका.
जे नकारात्मक विचार प्रसारित करतात त्यांना समजावा, समज द्या.
डॉल्फिन लॅब्स आता लवकर या विषयी कॅम्पेनिंग सुरू करणार आहे.
माझी एकच इच्छा आहे आपण इंजिनिअर आपल्या गाडीवर, फेसबुक च्या प्रोफाइल पिक्चर वर, व्हाट्सएपच्या डी.पी.वर इंजिनिअर असल्याचे टाकू शकतो." मी इंजिनिअर आहे याचा मला अभिमान आहे ", या सारखे स्लोगन टाकू शकतो.आपल्या संस्थेच्या प्रवेशद्वारात चांगले स्लोगन टाकू शकतो. यामुळे हळूहळू सकारत्मक विचार जर वाचायला मिळाले तर हळूहळू नकारात्मकता कमी होण्यास नक्किच मदत होईल.
मला अभिमान आहे इंजिनिअर असल्याचा, तुमचं काय?
मी सुरुवात केली आहे ,तुम्ही पण करा.
इंजिनिअर आहात तर शेअर करा.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
9763714860.

अर्जुन आठवावा , अर्जुन साठवावा , मनी बाळगावा , सदा चिंतावा .....

आयुष्यात कधीतरी बिकट अवस्था येते. सगळ काही असून नसल्यासारखं होत . नोकरी जाते , व्यवसायात मार बसतो, नातेवाईक दुरावतात, ज्यांची लायकी नाही अशांचे पाय धरायची वेळ येते. मन अगदी खचून जात . काय करावं हेच कळत नाही अशावेळी मी एकच गोष्ट करतो. डोळे मिटतो आणि अर्जुनाचा वनवासाचा काळ आठवतो. मनाला खूपच धीर येतो. आज मी आजूबाजूला जेव्हा पाहतो तेव्हा अभियांत्रिकी शिक्षणाला आलेल्या मंदीमुळे सैरभैर झालेले शिक्षक मित्र पाहतो , नोकऱ्या नसल्यामुळे फिरणारे विद्यार्थी पाहतो त्यावेळी खुपच वाईट वाटत. म्हणून महाभारतातील एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट ज्यावर जास्त कोण बोलत नाही आणि जी मला नित्य प्रेरणा देते ती सांगतो.
युधिष्टिर द्यूतात हारलेमुळे पांडवांना वनवास भोगावा लागला. पांडव वनवासात असतानाच्या काळाचा विचार केला तर असं दिसून येत कि वनवासात असताना अर्जुन टिवल्या बावल्या करत बसला नाही. त्याच्या भावाच्यामुळे हि परिस्थिती आली म्हणून तो त्याला दुषणे देत बसला नाही किंवा दैवाला दोष देत रडत किंवा कुढत बसला नाही . सार संपल म्हणून रडत बसला नाही . या वनवासाच्या काळात त्याने स्वत:ला सतत काहीतरी शिकण्यात गुंतवून ठेवले. . नित्य नवीन साधना करीत राहिला. स्वत:च्या कौशल्यात तो नित्य वाढ करत राहिला. या काळात तो त्याचे वडील इंद्र याच्याकडून शस्त्रविद्या शिकला त्यांच्याकडून त्याने वज्र मिळवले , ब्रहस्पती ऋषीकडून त्याने युध्दशास्त्राचे धडे त्याने गिरवले. शिवाकडून त्याने पाशुपती अस्त्र शिकून घेतले. त्याने कुबेर, यम आणि वरूण यांना त्याने प्रसन्न करून घेतले आणि त्यांचेकडून त्यांची अस्त्रे मिळवली. चित्रसेन गन्धर्व जो संगीत आणि नृत्यात निपुण होता त्याचेकडून तो नाच सुद्धा शिकला.
अज्ञातवासाचा एक वर्षाचा काळ अर्जुनासाठीचा सर्वात दु:खद होता , त्याची सर्वात कठिण आणि कठोर मानसिक परीक्षा परीक्षा बघणारा होता. विचार करा, हा अर्जुन जो देवांच्या राजाचा मुलगा ,साक्षात भगवान कृष्णाचा अतिशय जिवलग मित्र. ज्याच्या धनुष्याच्या केवळ टणत्काराने शत्रूचे धाबे दणाणले जायचे. ज्याला पूर्ण पुरुष मानले जायचे अशा अर्जुनाला स्वत:ची ओळख लपवून साडी नेसून , केसं वाढवून , हातात काकणे घालून , राजकुमारी उत्तरेला नाच शिकावण्यासाठी ब्रहन्नडा बनून रहायला लागले. अशा या अवस्थेत ज्या ज्या वेळी त्याच्या पुढे द्रौपदी येत असणार त्या त्या वेळी त्याच्या मनाला काय यातना होत याची कल्पना सुद्धा करवत नाही. विराट पुत्राच्या बढाया ऐकताना आणि त्याच्याकडून अपमान होत असताना त्याला काय वाटले असेल? आयुष्य संपवून टाकावे अशी इच्छा त्याच्याही मनात त्यावेळी कित्येक वेळा आली असेल.
कसे काढले असतील त्याने ते दिवस? तेही त्याची काहीही चूक नसताना. कधी याचा विचार केला का ? पण अर्जुनाने सगळे भोगले कारण त्याचा स्वत:वर विश्वास होता. स्वत:च्या कर्तुत्वावर विश्वास होता.त्याला माहित होते हे वनवासाचे दिवस पाहता पाहता संपतील आणि परत त्याला संधी मिळणार आहे. त्याला त्याच्या धनुष्यावर विश्वास होता . त्यामुळे तो वनवासाच्या दिवसात सुद्धा भावी लढाईची तयारी करत होता. आणि पुढचा इतिहास सर्वाना ज्ञातच आहे.
मित्रानो, सध्या अभियांत्रिकी शिक्षणावर हि जी ओढवून घेतलेली मंदी आलेली आहे.( हि ओढवून घेतलेली मंदी म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी माझा यापूर्वीचा अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील मंदी हा लेख वाचावा) त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच काही गोष्टी घडायला लागल्या आहेत. अशावेळी मन स्थिर ठेवण्याची गरज आहे. कुणालाही दुषणे न देता स्वत:ला आणि विद्यार्थ्यांना घडवणेसाठी झोकून द्यायला हवं आहे . बऱ्याच शाखांना विद्यार्थी संख्या खूपच कमी झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा तणाव निर्माण होत आहे. त्यांचेपुढेही मंदीचे भूत नाचू लागले आहे. त्यामुळे त्यांनाही मानसिक आधार देण्याची खूपच गरज आहे. हि मंदी आहे हि कौशल्य कमी झालेमुळेची आहे. त्यामुळे रोज वेळ काढून नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हि वेळ काही अजून जास्त राहणार नाही . पण पुढच्या येणाऱ्या काळासाठी स्वत:ला तयार केल पाहिजे. अंधारानंतर परत पहाट हि होतच असते हे विसरून चालणार नाही .
म्हणून म्हणतो ....
अर्जुन आठवावा , अर्जुन साठवावा ,
मनी बाळगावा , सदा चिंतावा ......
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
www.dolphinlabs.in
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०