Sunday, October 21, 2018

अभियांत्रिकी शिक्षण- दशा आणि दिशा ( भाग -1)

सध्या अभियांत्रिकी विद्यालयाची अवस्था खूपच गंभीर होत चालली आहे. अचानकपणे अभियांत्रिकी शिक्षणाला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामुळे आलेल्या सुगीत हात धुवून घेण्यासाठी वाढलेली महाविद्यालयांची संख्या, त्यामध्ये गुणवत्ता न राखल्याने आता मोठा प्रश्न बनून उभी ठाकली आहेत.
बाजारात मागणी नसल्याने झपाट्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कमी होणारा कल यामुळे आता अनेक महाविद्यालये बंद पडत आहे आणि बऱ्याच महाविद्यालयात आता पटसंख्या कमी करून घेतली जात आहे.
अभियांत्रिकी विद्यालय बंद पडणे अजूनही आपल्याकडे गांभीर्याने घेतला जात नाही कारण आपल्याकडे लोकांना अस वाटत की ह्यामुळे फक्त संस्थापक आणि त्याचे शिक्षक यांचेपूरताच हा प्रश्न आहे  त्याचा आपल्याला काय फरक पडणार आहे असं जनतेला वाटतं पण खरंच या प्रश्नांची व्याप्ती इतकीच आहे का?
हा प्रश्न फक्त वर उल्लेख केलेल्या बाबीपुरता मर्यादित नाही तर सर्वसामान्य लोकावरही त्याचा दूरगामी परिणाम होणार आहे. एक अभियांत्रिकी विद्यालयांमुळे आसपासच्या किमान दहा गावातील अर्थव्यवस्था बदलत असते . अनेक छोटे मोठे उद्योग त्यावर अवलंबुन असतात , शेकडो लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रकारे कामधंदा मिळतो . ही अभियांत्रिकी विद्यालये म्हणजे एक प्रकारची अर्थव्यवस्थेतील चक्र आहेत. आणि आता ह्या चाकांची गती कमी होत आहे आणि काही ठिकाणी तर ही चाकं बंद पडली आहेत. याचे दुष्परिणाम  आता बऱ्याच ठिकाणी दिसायला लागले आहेत.

सगळ्यात मोठा धोका तर अभियांत्रिकी शिक्षणावरून लोकांचा उडणारा विश्वास हा अतिशय घातक आहे. व्हाट्स अप आणि मोबाइल घुसून  फालतू विषयात गुंग झालेल्या बथ्थड डोक्याना या विषयावर बोलायला वेळच नाही किंबहुना हा विषय समजून घेण्याची कुवतही नाही.  पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या विषयाकडे कमी होणारा कल हा आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाला किमान 25 वर्ष मागे घेऊन जाणार आहे.

विद्यार्थी संख्या घटलेने संस्थापक पगार देऊ शकत नाहीत , त्यामुळे राज्यात  बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची आंदोलन होत आहेत,  अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत . गावोगावी अभियंते पडून आहेत त्यांचं आणि त्यांच्या बुद्धी च व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न  आहे. बऱ्याच ठिकाणी बांधलेल्या इमारतीच्या लाईटचे बिल भरण्याचीही कुवत संस्थापकाना राहिलेली नाही किंबहुना या अवाढव्य इन्फ्रास्ट्रक्चरच करायचं काय ह्याच कोडं पडलं आहे काही ठिकाणी इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा विचार चालू केला आहे आणि काही ठिकाणी सुरू झाल्याची आहेत.

आता याप्रश्नामध्ये सरकारही हतबल झालं आहे कारण या प्रश्नांची व्याप्ती खूपच वाढली आहे आणि गेल्या काही वर्षात अभियांत्रिकी शिक्षणात गुणवत्ता वाढवण्याचे केलेले प्रयत्न हे केवळ आणि केवळ कागदी घोडे नाचवण्याच्या वृत्तीमुळे वाया गेलेले आहेत.
आता करत असणारे उपाययोजना ह्या दूरगामी विचार न करता तात्पुरत्या उपचारासाठीचे आहेत त्यामुळे त्याचे फायदे न दिसता तोटेच दिसत आहे....खरं सांगायच तर आपल्याकडे कुठलीही योजना तयार करताना प्लॅन B हा तयार पाहिजे पण तो तयार केला जात नाही.
या प्रश्नाचा तिढा तसा खूपच मोठा आहे आणि तो सुटावा यासाठी काय करता येईल यासाठी डॉल्फिन लॅब्स प्रयत्नशील आहे. अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्रातील आणि उद्योग क्षेत्रातील बरीच मंडळींचा सहवास डॉल्फिन लॅब्समध्ये मिळत असतो .यावर चिंतन आणि विचारमंथन होत असत.बरेच प्रयोग होत असतात. यावरून बऱ्याच गोष्टी मनात येत असतात.अभियांत्रिकी शिक्षण हे वाचल पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे.प्रत्येक विषयाला दोन बाजू असतात आणि आपल्याला त्या दोन्ही बाजूला पाहिले पाहिजे.
या विषयावर तुमचे विचार जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
धन्यवाद.

चित्तरंजन महाजन
डॉल्फिन लॅब्स,पुणे.
9763714860


 

Saturday, October 31, 2015

आपण सारेच सर्किट (भाग १)



कधी कधी मला इलेक्ट्रॉनिक्स पार्टसचे गुणधर्म आसपासच्या लोकामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये  दिसतात. फक्त पार्ट्सच नाही तर वेगवेगळे लोकांचे ,विद्यार्थ्यांचे  ग्रुप पाहिले तर ते सुद्धा एखाद्या सर्किट प्रमाणेच काम करत असतात अस दिसतं त्यावेळी अस वाटत कि हि दुनियाच सर्किट आहे.
आता हेच पहाना आपल्या आसपास काही अशी मुले असतात जी सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात, अभ्यासातही हुशार असतात. गॅदरिंगमध्ये असतात. हि मुले कायम टोळक्यात असतात. टोळक्याचे नेतृत्व करत असतात. यांच्या मनात सतत नवनवीन कल्पना घोळत असतात. सतत काहीना काहीतरी नवीन करत असतात. ह्यांचे मित्र साऱ्या कॉलेजभर असतात.अर्थात यांची संख्या खुपच कमी असते आणि खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी इंजिनियरिंगला लायक असतात. हे एसी सोअर्स असतात.
काही मुले असतात ती फक्त अभ्यास करत असतात.फक्त पाठांतर करणे आणि मार्क्स पाडणे हेच याचं ध्येय असत. हि मुले थेअरी मध्ये हुशार असतात पण प्रॅक्टिकलमध्ये मार खातात. हि कुणात मिसळणार नाहीत. दंगा करणार नाहीत. मोजकी अशी मित्र मंडळी असतात. अभ्यासाशिवाय इतर गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो. पुढच पाठ आणि मागचं सपाट असा हा प्रकार असतो  हे डीसी सोअर्स असतात.
काही मुले अभ्यासात चालढकल करतात ,कुठलीही गोष्ट वेळेवर करत नाहीत, थोडी माठच असतात हि आणि गबाळी सुद्धा. पण हि कधी उलट बोलत नाहीत. जे आहे ते जमेल तेव्हढ करतात. हि रेझिस्टर असतात.
      काही मुले उद्दामपणे अभ्यास करत नाहीत ,कुणाच ऐकत नाहीत. भडक कपडे घालणे, गाडीवरून बोंबलत फिरणे याशिवाय दुसर काही करत नाही. अभ्यास सोडुन इतर गोष्टी मध्ये यांना इंटरेस्ट असतो. याचं शिक्षणात लक्ष्य नसत.कोनाविशावी कोमेंट पास करणे. उद्दामपणे बोलणे हे यांचे वैशिष्ट असते. बऱ्याचवेळा हि मुले स्वत:च्या इच्छेविरुद्ध इंजिनियरिंगला आलेली असतात.हि मुले इंडक्टर असतात
      सगळी काम वेळच्यावेळी करनारी मुले हि कॅपॅसिटर असता .हि अभ्यासात तशी हुशार नसतात पण सांगितलेले ऐकतात आणि आज्ञाधारक असतात.एखादी गोष्ट सांगितली तर त्यांना समजते लवकर आणि पटते सुध्दा. ठीकठाक कपडे घालतात.

काही मुले हि डायोड असतात त्यांचे एकच ध्येय असतात इतर कुठल्याही गोष्टी मध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो.त्यांना काहीतरी बनायचं असत आणि ते त्यासाठी अभ्यास मनापासून करतात. त्यांना त्यांचे ध्येयापासुन दुर केलं तर ती सैरभैर होतात. हळव्या मनाची हि मुले असतात.
काही मुले हि ट्रांझिस्टर असतात . बोटभर ऐकल कि ते हातभार करून सांगनेत त्यांचा हातखंडा असतो अर्थात त्यातहि दोन प्रकार असतात. एक जे चांगल असेल ते वाढवुन सांगेल. दुसरा चांगल असेल ते किती  वाईट  असे रंगवुन सांगेल.
आणखी एक महत्वाचा प्रकार म्हणजे काही कार्टी अशी असतात कि त्यांच्यामध्ये खुपच क्षमता असते  पण त्यांची त्यांना जाणीव नसते , त्यांना ती करून द्यावी लागते. हि एस. सी. आर. असतात . आता एस.सी.आर. हा ट्रिगर करायच्यासाठी दोन तंत्र वापरतात. एक तर व्ही.बी.ओ. वाढवा नाहीतर ट्रिगर द्या. मग अशा मुलाकडून एखादे काम करून घ्यायचे असेल तर त्यांना रागाचा डोस द्या नाहीतर त्याच्या जवळच्या एखाद्या मित्राला बोलवा आणि त्याचे कौतुक करा तो लगेच ते काम करेल. या मध्ये तो मित्र हा डायकची भूमिका पार पडेल. सबळ आणि दुर्बळ यांचा मिलाफ करून एखादे मोठे काम करता येते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

-    चित्तरंजन महाजन
-    डा. डॉल्फिन लब्स , पुणे
-    Dearengineers.blogspot.com

-     

Saturday, October 24, 2015

इलेक्ट्रोनिक्स आणि मानसशास्त्र

कोणत्याही बदलाला सामोरे जाताना माणसाच मन हे चार स्थिती मधुन जात असत. विरोध (oppose) , राग (anger), वाटाघाट (negotiation) आणि  स्वीकार (accept).
आपण शिक्षक आहोत म्हणुन आपल्या पेशासंबंधी उदाहरण घेऊ.
समजा एक शिक्षक  विद्यार्थ्यांना सांगतात कि रविवारी सकाळी जादा तास घ्यायचा आहे सर्वांनी आठ वाजता या. सगळे विद्यार्थी एका सुरात ओरडतात.नको. कारण कोणत्याही बदलाला विरोध करणे हा माणसाचा स्वभाव आहे. किबहुना विरोध करणे हे माणसाच्या रक्तातच  आहे. कारण या गुणधर्मामूळेच तर माणसाच्या रक्तात विषाणु घुसल्याबरोबर प्रतिकारशक्ती त्या विषाणुना  विरोध करते.
मग शिक्षक परत एकदा म्हणत यायलाच पाहिजे.  मग विद्यार्थी मनाच्या दुसऱ्या स्थितीत जातात .ते चिडतात मग मनातल्या मनात शिव्या घालतात. या शिक्षकांना काही काम नाही.....,फालतू मध्ये सेम वाया घालवतात आणि शेवटी जादा तास घेतात.......,वगैरे,वगैरे...मग विद्यार्थी तिसऱ्या स्थिती मध्ये जातात. ते म्हनु लागतात. सार मग अस करू या का? आठ ऐवजी नऊला येवूया का ? अथवा तीन तासाऐवजी दोन तास घ्या  
............अशा प्रकारे वाटाघाटी सुरु होतात . आणि शेवटी वेळ ठरते आणि सारे येतात.

आता याचा इलेक्ट्रोनिक्सशी संबध कसा? मित्रानो यासाठी आपण लक्षात घेउया सेरीज रेसोनंस सर्किट. या सर्किट मध्ये रेझिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे सेरीज मध्ये जोडलेले असतात. आता याठिकाणी आपण सोअर्स म्हणजे शिक्षकांची रविवारी येण्याची कल्पना. लगेच यामधील रेझिस्टर हा विरोध करतो. परत एकदा शिक्षक म्हणतात यायला पाहिजे.त्यावेळी कॅपॅसिटरच्या मुळे टोकाची भूमिका घेतली जाते म्हणजेच राग येतो तोपर्यंत कॅपॅसिटर हा चार्ज व्हायला लागतो. शिक्षक म्हणतात यायलाच पाहिजे,यायलाच पाहिजे म्हणजेच ते वारंवार सांगु लागतात  त्याबरोबर कॅपॅसिटर आणि इंडक्टर  मध्ये आंदोलन व्हयला लागत म्हणजेच वाटाघाटी सुरु होतात .शेवटी XL=XC होतो आणि काय हि कटकट आहे असा थोडासा विरोध मनात ठेवून शेवटी मुले रविवारी सकाळी क्लासला येतात. 




Saturday, October 17, 2015

इलेक्ट्रॉनिक्समधील ज्ञानामृत - १




  खरच इलेक्ट्रॉनिक्स हि केवळ अभियांत्रिकीची एक शाखा आहे का? केवळ याचा अभ्यास करून एखादी चांगली नोकरी मिळवायची हाच या शाखेचा उपयोग आहे का? चार वर्षे बी. इ.ची, किमान दोन अधिक कितीतरी वर्षे एम.इ.ची आणि त्यानंतरची कितीतरी वर्षे आपण पी.एच.डी.साठी घालवतो आणि तरी आपण फक्त माहिती मिळवतो आणि त्यावर आयुष्य घालवतो. म्हणजे आपण ज्ञानसागरात  उडी मारतो आणि मोती आणन्याऐवजी दगड आणतो आणि बाहेर पडतो कोरडेठाक.
ज्ञानाला ब्रँच नसते ते जगातील सर्व व्यक्त आणि अव्यक्त गोष्टीना ते सारखच लागु  होत. ज्यावेळी ते कळायला सुरुवात होते तेव्हा अखिल विश्वातील सर्व गोष्टीना एकाच नियमात बांधून ठेवणारी सूत्रे कळू लागतात आणि मग कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करावा लागत नाही त्या आपोआप समजायला लागतात.
चला आपण आपल्या विषयाकडे वळू या.



                                                              

चीनी तत्वज्ञानात यीन आणि यांग हि संकल्पना आहे.वरील चित्र हे या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पनेनुसार जगातील सर्व गोष्टी या दोन  सामावल्या आहेत. जसे कि चांगल आणि वाईट, पॉझीटीव्ह (धन) आणि निगेटिव्ह (ऋण). हे पॉझीटीव्ह हे  प्रभाव दर्शवते तर निगेटिव्ह अभाव. पण याचबरोबर या विश्वात कुठलीही गोष्ट परिपुर्ण नाही. एक गोष्टीचा अंत हा दुसरिचा प्रारंभ असतो.  वरील आकृतीमधील पांढरा भाग यीन आणि काळा भाग हा यांग प्रवृत्ती  दर्शवतो आणि त्यामधील अपरीपुर्णता ठीपक्याच्या रूपाने दाखवल्या आहेत. हि अपुर्णताच अखिल विश्वाच्या चलनवलनाला कारणीभुत आहे. ज्याक्षणी एखादी गोष्ट परिपुर्ण होते त्याच्या दुसऱ्या क्षणीच तिच्यामध्ये अपुर्णता यायला सुरुवात होते. आणि हेच या पुर्ण जगाला एकाच नियमात बांधुन ठेवणारे सूत्र आहे. आयुष्यभर चिंतन आणि मनन करायला हे पुरेसं आहे.


हे विश्व हे निरंतर आहे. एक उर्जा या विश्वाला नियंत्रित करत असते .त्या उर्जेलाच आपण चैतन्य म्हणतो आणि काही लोक देव, अल्लाह आणि गॉड  मानतात. उर्जा हि दोन प्रकारची आहे स्थिर  आणि अस्थिर.  तो सर् शक्तिमान परमेश्वर म्हणजेच अस्थिर उर्जा आहे आणि आपण चराचरामधील जो परमेश्वर आहे म्हणतो ती झाली स्थिर उर्जा. उर्जा हि निर्माण करता येत नाही किंवा ती  नष्ट करता येत नाही. तिला एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात बदलता येते आणि ती बदलत असते.
एसी सोअर्स हा अस्थिर उर्जेच तर डीसी सोअर्स हा स्थिर उर्जेच प्रतिनिधित्व करतो. डीसी उर्जा हि पॉझीटीव्ह (धन) आणि निगेटिव्ह (ऋण) या दोन प्रकारात मोडते तर एसी उर्जा हि  पॉझीटीव्ह (धन) आणि निगेटिव्ह (ऋण) या मध्ये  आंदोलित होत राहते.

स्थिर (डीसी) उर्जा हि आपल्याला साठवून ठेवता येते तर अस्थिर (एसी) उर्जा साठवता येत नाही. ती जर साठवून ठेवायची असेल तर तुम्हाला ती पहिल्यांदा  स्थिर करावी लागते. पण साठवलेली उर्जा वापरावयाची असेल तर ती तुम्हाला प्रवाहित करावी लागते. पाणी ज्याप्रमाणे वरून खालच्या दिशेने वाहते त्याप्रमाणे उर्जा सुद्धा वरच्या पातळीवरून खालच्या पातळीकडे प्रवाहित होत असते. दोन समान पातळीमध्ये प्रवाह वाहणार नाही.

आता पर्यंत आपण वैश्विक ऊर्जेबद्दल बोललं आणि तिच इलेक्ट्रॉनिक्समधील स्वरूप पाहिलं.
पुढच्या भागात तीच नियंत्रण कस होत आणि तिचे परिणाम काय? ते पाहु.
रेझिस्टर,कॅपॅसिटर आणि इंडक्तर जे इलेक्ट्रॉनिक्समधील कनिष्ट पार्टस आपण मानतो पण त्याची नव्याने ओळख करून घेउया.
तोपर्यंत तुमची मते स्वागतार्ह आहेत.


धन्यवाद. 

Monday, October 12, 2015

डॉल्फिन लब : रिसर्च प्रोग्राम

आपणा सर्वांनाच माहित आहे कि इलेक्ट्रॉनिक्स  ब्रँचला  सर्वच कॉलेजमध्ये अॅडमिशन कमी झाली आहेत. काही कॉलेजेसमध्ये तर दोन आकडी संख्या सुद्धा पुर्ण झाली नाही . ही खरच खुपच चिंताजनक बाब आहे. यामुळे शिक्षक  आणि  विद्यार्थी  सर्वांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजुन किती दिवस ही ब्रँच चालणार हे कळणं  मुश्कील झालं आहे.
      जुनी अनुभवी  माणसे सांगतात कि  हे असं होतं.  आणखी दोन वर्षाने इलेक्ट्रॉनिक्सला  परत चांगले दिवस येतील. पण कुणालाहि  माहित नाही की खरच असे  होईल  आणि समजा  झालं तर किती दिवस टिकेल हे कुणालाही माहित नाही.
      कारण आता पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाहीत, आता आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे जागतिक स्पर्धा उभी ठाकली आहे. फिलिपिन्स ,चायना आणि बरेच देशानी आता कमी पैशात काम करणारे  कुशल मनुष्य बळ निर्माण करण्यात मोठीच आघाडी घेतली आहे.
      आमची  सर्वात मोठी घोडचुक म्हणजे  आम्ही लाख निर्माण केले पण लाखाचे पोशिंदे तयार केले नाही. आमचे विद्यार्थी किती   उद्योजक झाले हे पाहण्याऐवजी  किती नोकर   झाले याची  टिमकी  वाजवण्यातच आम्ही धन्यता मानली. बरं आमचे  प्लेस झालेले विद्यार्थी हे  इलेक्ट्रॉनिक्समध्ये नाही झाले तर ते झाले सॉफ्टवेअर डोमेन मध्ये झाले. म्हणजेच चार वर्षे इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान घेण्यासाठी घालवली ती सर्व वाया गेली.
      गेली दहा ते बारा वर्ष हे चाललं आहे. त्यामुळे भारतीय उद्योग जगतात कुशल इलेक्ट्रनिक्स इंजिनियरची कमतरता  निर्माण झाली आहे. म्हणुन इलेक्ट्रॉनिक्सचे उद्योग फारसे उभे राहिलेच नाही , याचा परिणाम आज नवीन इंजिनियरना नोकऱ्या  उपलब्ध नाहीत आणि त्याच बरोबर  नवीन उद्योग उभा करण्यासाठी आत्मविश्वास नाही  कि योग्य मार्गदर्शक नाहीत.फक्त प्रॅक्टिकल आणि टर्म वर्कच्या आयत्या मिळालेल्या मार्कांच्या जीवावर मार्कशीटवर गुटगुटीत दिसणारी हि बाळे व्यवहारी जगासाठी अगदीच निरुपयोगी आहेत.
      मग आता पुढे कायया सगळ्याचा परिणाम असा झाला आहे कि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी झाला आहे जो उद्यासाठी घातक आहे .आता  जर त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर पुढच्या वर्षी अजुन कमी अॅडमिशन होतील ज्याचा परिणाम वाईट असेल.
      डॉल्फिन लॅब्सने मी अभियंता”  हा प्रकल्प हाती घेतला आहे. ज्यामध्ये  विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान देणे , त्यांचे प्रोजेक्ट त्यांनी स्वत: करावे यासाठी मार्गदर्शन करणे , त्यांना पेटंट घेणेसाठी मदत करणे ,त्यांचेमध्ये उद्योजकता वाढीस लावणे , त्यांना उद्योग चालु करण्यासाठी मदत  करणे यासाठी लॅब्सची सभासदत्व योजना चालू केली आहे ज्यामध्ये   विद्यार्थी तसेच कॉलेज  सभासद होऊ शकतात. सभासद होणाऱ्या विद्यार्थ्याला माफक दरात वेगवेगळे कोर्स उपलब्ध आहेत. तसेच सभासद होणाऱ्या कॉलेजना विद्यार्थ्याना प्रोजेक्टचे काम करणेसाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंट करणेसाठी  लॅब हि डॉल्फिन लॅब तर्फे मोफत देण्यात येणार आहे.या लॅब मध्ये डॉल्फिन लॅबने पेटंट फाईल केलेली किट्स दिली जातील.या किट्सच्या सहाय्याने 8051,ARM,AVR,PIC,Arduino,Raspberry Pi, Robotics  यावरचे प्रोजेक्टस करता येतील.. विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट नाहीतर प्रोजेक्ट्स हा यामागे उद्देश आहे.

अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क करा.

डॉल्फिन लॅब्स. पुणे, ०२०-६५२०८०५१,९७६३७१४८६०



सगळ्या ब्रँचला गरजेची असणारी माझी ब्रँच आज केविलवाणी झाली आहे. जी ब्रँच सगळ्या ब्रँन्चची खरतर महाराणी आहे आणि तिच्यावर आज भिकारणीसारखी अवस्था आली आहे. आणि तिला परत तिचे वैभव मिळावे यासाठी माझे हे प्रयत्न चालू आहेत. कुणीतरी यासाठी प्रयत्न करावेत मग मी का नाही असा विचार करून मी हि वाट चालतो आहे. तुम्हाला पटल तर शेअर करा. 



Friday, October 2, 2015

असे बनतात कागदी वाघ

ज्यावेळी सुबत्ता येते तेव्हा आळस, बेफिकिरी आणि तडजोड या गोष्टी माणसामध्ये प्रवेश करतात. सुखाची रेलेचेल असल्यावर आपोआपच आळस अंगात येतो. अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी होते, आजचा दिवस तर व्यवस्थित गेला मग उद्याचं उद्या बघु अशी बेफिकिरी वाढीस लागते. पुढे कष्ट करायची इच्छा कमी होते मग तडजोडीला सुरुवात होते. शेवटी एक दिवस असा येतो कि तडजोडीनेही प्रश्न सुटत नाही मग आपण जागे होतो .आता आपल्याजवळ कामाचे कौशल्य राहिलेले नसते आणि मधल्या वेळेत जग पुढे गेलेले असते आता सुरु होते धावाधाव, ताणतणाव आणि वैताग.
अशातुन सुटका करायचे तर अंगी येते चापलुसी आणि कागदी घोडे नाचवणेची प्रवृत्ती, खोटेपणा आणि लांडी लबाडी. हळुहळू या खोटेपणा, चमचेगिरी  याला प्रतिष्ठा मिळायला सुरुवात होते. हि प्रतिष्ठा अधिकृत करणेसाठी कागदपत्रे तयार केली जातात. रोज नवीन कागदे, नवीन नियम तयार करणेसाठी माणसांच्या झुंडी कामाला लागतात. कागदाला महत्व येते. कागदासाठी कागद ,कागदासाठी कागद. कागद जमायला लागतात, रद्दी वाढायला लागते. आता वेळ निघून गेलेली असते. हाती फक्त कागद उरतात. कौशल्याची किंमत कमी होते आणि कागद किती आहे ते पाहिले जाते. त्यामुळे आता फक्त कागदावरचे वाघ बनतात  आणि हे वाघ इतरांना कागदाची भीती घालण्यात आयुष्य घालवतात.