Tuesday, July 23, 2019

अभियांन्त्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग १. **** अभियांत्रिकी शिक्षण चिरायु होवो ****

**** अभियांत्रिकी शिक्षण चिरायु होवो ****
अभियांन्त्रिकी शिक्षणाच्या वाटेवर – भाग १.
आजची अभियांत्रिकी शिक्षणाला प्रवेश घेतलेली मुले हि खरच आहेत. या अभियांत्रिकी शिक्षणाला प्रवेश घेऊन अभियांत्रिकीची पदवी मिळवण्यासाठी कुणी कुणी काय दिव्य केल असेल हे सांगितल तर आजच्या या पिढीला कळणार पण नाही कदाचित विश्वास पण वाटणार नाही .
कित्येकाच्या बापांनी जमिनी गहाण टाकल्या,विकल्या. कित्येक आयांनी आपले अंगावर एक मणी ठेउन उरलेलं सगळ सोन मोडून टाकल , कित्येक बहिणींनी आपल्या भावाच्या शिक्षणासाठी स्वत:च्या शिक्षणाला मुरड घातली कधीकधी सासरचा मार खावून भावाच्या शिक्षणासाठी चोरून दागिने मोडले आणि त्याचबरोबर हे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्यानी पण ते शिक्षण घ्यायच्या साठी किती दिव्य केल असेल. कित्येकांनी दिवस रात्र मजुरी केली , कित्येकजण उपाशीपोटी , अर्धपोटी झोपली. यांच्या कथा सांगितल्या तरी त्यावर अफाट सिनेमे आणि कितीतरी मालिका होतील.
हे सगळ करत असताना त्यांचा एकच विश्वास होता कि केवळ हे शिक्षणच आपलं आयुष्य बदलणार आहे , हे शिक्षणच आपल्याला गरिबीतून बाहेर काढणार आहे , हे शिक्षणच आपल्याला मानसन्मान मिळवून देणार आहे. त्यामुळे या अभियांत्रिकी शिक्षणाला खूपच सन्मान होता. लोकांना त्त्याची किंमत होती. त्यामुळे हे शिक्षण घ्यायच्यासाठी खूपच ढोर मेहनत करायला लागते हे सर्वांनाच मान्य होत आणि ती मेहनत प्रत्येकजण घ्यायचा.
याउलट आजच चित्र . शिक्षण अगदी दारात आलंय , घरची परिस्थिती सुधारली आहे. मागितलेली वस्तूच नाव घ्या बाप लगेच आणून देतय, हे जेव्हा नजरेसमोर येत तेव्हा आजची हि पिढी खूपच भाग्यवान समजली पाहिजे. घराजवळच कॉलेज, कॉलेजमध्ये गेल्यानंतर लगेच मिळालेली गाडी , हातात अँड्रोइड फोन आणि बरंच .काही पालक म्हणजे अल्लाउद्दीनचा जीन झाले आहेत.
मग आज या अभियांत्रिकी शिक्षणाचं का हसं होतय? याला कारण एकच आहे कि पालकाकडे पैसे आले पण विद्यार्थ्याकडे मेहनत, जिद्द ,स्वप्न आणि विश्वास हे नाही. त्याच्या मनात या शिक्षणाचे महत्व राहिलेलं नाही. या शिक्षणाविषयी आदर राहिलेला नाही. पालक कराव म्हणून पोराला इंजिनियर करायला लागले आहे आणि पोर पण बाप घालतय म्हणून अभियांत्रिकी शिक्षण करत आहे. अभियांत्रिकी शिक्षण का घेतोय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना काय शिकायचं ? त्या विषयाच महत्व काय या विषयी विद्यार्थी आणि त्यांचे पालक बेफिकीर आहेत. केवळ हेच कारण आहे अभियांत्रिकी शिक्षण तळाला जायचं.
अभियांत्रिकी शिक्षण हि एक गुंतवणूक आहे हेच लोकांना कळत नाही .या गुंतवणूकीची जोपासना कशी करायची याची जाणीव नाही. ज्यावेळी व्यावसायीकरण होत त्यावेळी गुणवत्ता वाढीस लागते पण ती केव्हा? जर ग्राहक जागरूक असेल तर अन्यथा नाही. आपल्याकडे तसच झाल आहे . जर हा ग्राहक जागरूक झाला तर अभियांत्रिकी शिक्षणाला परत महत्व नक्कीच येईल हा मला विश्वास आहे.
त्यामुळे हि लेखमाला हि अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यासाठी नाही तर त्यांच्या पालकासाठी पण आहे. विद्यार्थी कुठल्याही महाविद्यालयात शिकत असु दे , आजकाल कुठलही अगदी गाव पातळीवरच जरी अभियांत्रिकी महाविद्यालय घेतलं तरी त्याच्यामध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पुरेपूर सोयी असतात पण त्या विद्यार्थांनी व्यवस्थितपणे कशा वापराव्या आणि चार वर्षात कस वागावं , राहावं कस शिकाव या बद्दल या लेखमालिकेतून मार्गदर्शन केल जाईल . कधी मी कठोर शब्द वापरले आणि कुणाला राग आला तर केवळ मी हे अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रेमापोटी लिहित आहे हे समजून घ्या.
अभियांत्रिकी शिक्षण चिरायु होवो हि प्रार्थना.
कृपया शेअर करा ......
धन्यवाद .
या पूर्वीची लेखमाला वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
चित्तरंजन महाजन .
९७६३७१४८६
www.dolphinlabs.in

Monday, February 25, 2019

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग 35 )

*** शिक्षण संस्थाची समाजाशी तुटलेली नाळ ***
तुम्हाला एक वर्षाची करायची तजवीज करायची असेल तर बी पेरा, दहा वर्षाची करायची असेल तर पैसे पेरा आणि कायम स्वरुपाची करायची असेल तर माणसे पेरा – अनामिक लेखक.
जानेवारी महिना सुरु झाला कि सगळी अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्र निकेतनं खडबडून जागी होतात. सर्वाना वेध लागतात अॅडमिशनचे. मग काय नवनवीन कल्पनांना ऊत येतो . कुणी मेळावे घेतो, कुणी शिबिरे घेतो, कुणी स्पर्धा घेतो तर कुणी कसली कसली ऑलिम्पियाड घेतो. या सर्वामागे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयाची जाहिरात करणे हाच हेतू असतो. मग यासाठी वेगवेगळे क्लास , शिक्षण संस्था यांना हाताशी धरले जाते . क्लास वाले , माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संस्था पण आता हुशार झाले आहेत . वाहणाऱ्या गंगेत हात कसा धुवुन घ्यायचा हे त्यांना पण कळल आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि महाविद्यालयात असणाऱ्या शिक्षकाविषयी असणारा त्यांच्या मनातील आदर कमी झाला आहे . यामध्येपण सेटिंग, कमिशन वगैरेसारख्या गोष्टी आता यायला लागल्या आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयांची आणि तंत्र निकेतनांची संख्या वाढली आहे त्यामुळे या गोष्टी आता नाकारता येत नाहीत. पण एक नवीन आणि चुकीचा पायंडा पडत चालला आहे जो घातक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे म्हणून त्यांचेपुढे जे चित्र रंगवले जाते किंवा त्यांचेपुढे जे वायदे केले जातात त्यावर भुलून जे अॅडमिशन घेतात त्यांचा नंतर अनुभव चांगला नसतो. यामुळे काही महाविद्यालयांना ज्या ठिकाणाहून अॅडमिशन झाली होती त्या भागात परत तोंड दाखवता येत नाही .
अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तंत्रनिकेतन मालकीची असणाऱ्या बऱ्याच शिक्षण संस्थांची माध्यमिक , उच्च माध्यमिक विद्यालयेपण आहेत . पण हि विद्यालयात शिकणारी मुले संस्थेच्याच तंत्रनिकेतन मध्ये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश करत नसतील तर त्या संस्थेच कुठेतरी नक्कीच चुकत आहे . सातारामधील एका बलाढ्य अशा शिक्षण संस्थेला त्यांच्या तंत्रनिकेतनला किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाला पुरेसे विद्यार्थी मिळत नसतील आणि त्यांना जण विद्यार्थी मिळवण्यासाठी भटकायला लागत असेल तर परिस्थिती खरीच विचार करण्यासारखी आहे. त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे जर संस्थेच्याच तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी जर संस्थेच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात येत नाहीत याचा अर्थ काय काढायचा हे प्रत्येकांनी ठरवलं पाहिजे.
आपला विद्यार्थी हीच मोठी जाहिरात आहे हेच सगळे जण विसरून गेले आहेत . विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्याचं सामाजिक भान जागृत करून त्यांना समाजाशी जोडणं हेही महत्वाचं आहे याची जाणीव कुणालाही नाही . जर या विद्यार्थ्यांना समाजाशी जोडत गेलो तरच एक अखंड साखळी तयार होईल आणि त्या महाविद्यालयाची समाजात किंमत वाढेल हे सोपं गणित आहे. पंचवीस वर्षापेक्षाही जास्त अनुभव असणाऱ्या महाविद्यालयांची अवस्था हि आज खूपच वाईट आहे. त्यांचा अभ्यास केला तर असे दिसून येईल कि मध्यंतरीच्या काळात ते समाजापासून तुटले गेलेले आहेत.
आता परत महाविद्यालयांनी विचार केला पाहिजे आणि आहेत त्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून असे कार्यक्रम राबवले पाहिजे कि ज्यामध्ये समाजाचा फायदा होईल . एक निरंतन अशी ज्ञानदानाची प्रक्रिया राबवली पाहिजे ज्यामुळे विद्यार्थ्यामध्ये त्या महाविद्यालयाची छाप पडली पाहिजे. कुठ रक्तदान शिबिरे घेणे, वाहतूक नियंत्रण करणे हि कामे महाविद्यालयाच्या जाहिरातीसाठी करणेपेक्षा शेती, शिक्षण, संरक्षण आणि आरोग्य यासाठी उपयोगी अस कमीत कमी खर्चाच्या तंत्रज्ञान निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. शिक्षण संस्थांनी आता समाजाशी जुळवून घेतलं पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ४१ )


*** आता ज्ञानाच्या पेटवू मशाली   ***
एकदा एका शेतकऱ्याच्या हातून मोठी चूक झाली म्हणून त्याच्यावर देव रागावला आणि त्याने शेतकऱ्याला शाप दिला कि पुढची बारा वर्ष त्याच्या शेतात पाऊस पडणार नाही. त्याच्या घरातील सगळी दु:खी झाली, सगळ्यांच्या  डोक्यात उद्यापासून काय करायचं  हा प्रश्न पडला . पण दुसऱ्या दिवशी शेतकरी सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठला आणि बैल जुपून शेताकडे जायला निघाला . घरातले सगळे आश्चर्य चकित झाले. त्यांनी शेतकऱ्याला समजावले कशाला जायचे शेताला ? आता कशाला करायची मशागत आणि पेरणी ? जर प्रत्यक्ष देवानेच सांगितले आहे कि पाउस पाडणार नाही मग कशाला वेळ, पैसा आणि मेहनत वाया घालवायची? शेतकरी म्हणाला कि मलाही माहित आहे कि आता इथून पुढे बारा वर्ष आपल्या शेतात पाउस पडणार नाही पण म्हणून जर या बारा वर्षात आपण मेहनत केली नाही तर आपण सगळेच मेहनत करायचेच विसरून जाऊ. हि आपल्या घरातील नवीन पोरं जी आता आठ दहा  वर्षाची आहेत त्यांना  बारा वर्षांनी माहितीही होणार नाही शेतात काय करायचं असत. जमीन ओसाड माळरान बनून जाईल, जमीन  नापीक बनेल, सगळी हत्यारे गंजून जातील , ती हत्यारे  वापरायची कशी हे पण आपली पुढची पिढी विसरून जाईल आणि ज्यावेळी पाऊस पडायला सुरवात होईल त्यावेळी आपल्यामध्ये शेतीविषयक ज्ञान काहीही राहणार नाही आणि बारा वर्षानंतर पुढे कायमची शेती हा विषय  आपल्या खानदानातून कायमस्वरूपी निघून जाईल. म्हणून म्हणतो चला उठा सगळे आणि नेहमीप्रमाणे कामाला जाउया आणि आपल्यातील शेतकरी जिवंत ठेऊयात.
गोष्ट तशी लहानच आहे पण यामध्ये अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रासाठी खूपच मोठा संदेश लपला आहे . हि वरची गोष्ट आता अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने पुनःपुन्हा वाचली पाहिजे आणि त्यातील मतीतार्थ मनावर बिंबवला पाहिजे .
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रावर तसा गेल्या दोन वर्षापासून एका प्रकारचा दुष्काळच सुरु झाला आहे. त्यामुळे  अशी भीती वाटायला लागली आहे कि हा अभियांत्रिकी शिक्षणाचा वटवृक्ष वटायला  सुरुवात झाली आहे त्याच्या सगळ्या शाखा कोमेजून जायला सुरुवात झाली आहे. सगळे सैरभैर झालेले आहेत. सगळीकडे मंदीरुपी दुष्काळ पसरायला सुरुवात झाली आहे.
तंत्रनिकेतने आणि अभियांत्रिकी महाविद्यालये ओस पडायला लागली आहेत , बंद व्हायला लागली आहेत. सगळीकडे चिंतेच वातावरण निर्माण व्हायला लागल आहे. सगळ्यांचा अभियांत्रिकी शिक्षणावरचा विश्वास उडायला लागला आहे .सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी म्हणजे शिक्षक त्याचाही आत्मविश्वास डळमळायला लागला आहे. वेळचेवर पगार होणे बंद झालं आहे .नोकरीची पण शाश्वती राहिली नाही. त्यामुळे त्यांचाही अभ्यास कमी व्हायला लागला आहे. पगार होत नाही तरीपण लाचारासारख नोकरीला चिकटून बसायची त्याच्यावर वेळ आली आहे. खूपच वाईट परिस्थिती आलेली आहे .
काय करायचं हा यक्षप्रश्न सर्व शिक्षकासमोर उभा राहिला आहे.माहिती नाही हि परिस्थिती कधीपर्यंत राहणार आहे पण जोपर्यंत हि परिस्थिती आहे तोपर्यंत माझी सर्व शिक्षक समुदायाला विनंती आहे कि धैर्य सोडू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यास सोडू नका. उद्योग क्षेत्रामध्ये जेव्हा मंदी येते तेव्हा संशोधनाच काम जोमात सुरु होत. आता हिच करी वेळ आहे स्वत:ला  बदलण्याची . मध्यंतरीच्या कालावधीत स्वत:ला अॅकेडेमिक कामात पूर्णपणे गुंतवून घेतल्याने बऱ्याच जणांना स्वत:ला अपग्रेड करता आलेलं नाही त्यांनी हि वेळ साधून घ्यावी. मनात नैराश्येची भुते थैमान घालण्यास सुरुवात करणेपुर्वीच मनाला नवीन अभ्यासात झोकून द्या.
हि जी मंदी आली आहे ती कायम राहणार नाही पण ज्यावेळी तेजी येईल त्यासाठी सर्वांनी स्वतःला तयार केलं पाहिजे . भोवतालाच तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर्जाही ढासळत चालला आहे हे गृहीत धरूनच त्यांना नवीन तंत्रज्ञानाची आवड कशी लागेल , हे तंत्रज्ञान त्यांना कसे समजेल त्यासाठी काय केलं पाहिजे हे शोधलं पाहिजे आणि त्यावर अभ्यास केला पाहिजे . कुठलीही परिस्थिती जास्त काळ राहत नाही जर मंदी आहे तर तेजी नक्कीच येणार आहे पण जर तेजी आली तर ती नवीन आव्हाने घेऊन येईल आणि आपण जर त्यासाठी तयार नसेल तर परत हे क्षेत्र उभं राहण अवघड होईल.
चला उठा मित्रानो , काढून टाका मनातील नैराश्येची जळमटे. आपण अभियंते तर आहोतच पण त्यापेक्षाही महत्वाच म्हणजे आपण शिक्षक आहोत. देशाच भविष्य घडवणारे अभियंते घडवण्याचे पवित्र काम आपल्यावर आहे . जर आपण मनातून हारलो तर आपण अभियंते घडवू शकणार नाही. हे शिक्षण क्षेत्र बदलायची  धमक हि कुठल्याही सरकारमध्ये ,कुठल्याही संस्थापकात नाही. हि अवस्था बदलण्यासाठी कुठलाही मसीहा येणार नाही. हि परिस्थिती केवळ आणि केवळ शिक्षकच बदलू शकतो. आता गरज आहे स्वत:ला बदलण्याची. परत जोमाने अभ्यास करण्याची. हे शिक्षण क्षेत्र अगदी नापीक झालं आहे त्यामध्ये ज्ञानरुपी खत घालण्याची गरज आहे . आता क्रांती होण्याची गरज आहे “ शिक्षण क्रांती”. 

आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .

या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे

९७६३७१४८६०

Monday, February 4, 2019

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ४० )



*** उद्देश हरवत चाललेली अभियांत्रिकी शिक्षण पद्धती    ***

आपल्या भारतातील अभियांत्रिकी  शिक्षण पद्धतीची उतरंड हि  चढत्या भाजणीने दहावीनंतर आय. टी. आय. /डिप्लोमा , बारावीनंतर  बी. ई., बी. ई. नंतर एम. ई. त्यानंतर पी. एच. डी. अशी आहे. या उतरंडीतील प्रत्येक शिक्षण पायरीचा स्वत:चा एक उद्देश ठरविलेला आहे.
आय. टी. आय. शिक्षणाचा उद्देश हा कुशल कामगार घडवणे असतो . तसा  डिप्लोमाचा विद्यार्थी हा कुशल कामगारांवर देखरेख करण्यासाठी सुपर वायजर म्हणून काम करण्यासाठी  असतो . डिग्रीच्या विद्यार्थी कडून एखाद प्रोडक्ट बनवण्याची अपेक्षा केली पाहिजे तर संशोधनाच्या कामासाठी एम. ई. चा विद्यार्थी  घडवले पाहिजे.
मध्यंतरीच्या काळात एक मोठी गडबड झाली. बाजारात मागणी वाढली तशी भरमसाठ महाविद्यालये निघाली.स्पर्धा वाढली तसा घोळ व्हायला सुरुवात झाली. मध्येच प्रोजेक्ट विके बाजारात आले त्यांचीही संख्या वाढायला लागली  तशी  त्यांचेमध्ये पण स्पर्धा वाढली.  नवनवीन प्रोजेक्ट तयार बाजारात यायला  लागले . नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रोजेक्ट विक्यांनी करायला सुरुवात केली. सुरुवातीला शिक्षकानाही जाणवत होत कि तयार प्रोजेक्ट आणला आहे पण कागदपत्रात गुंग झालेमुळे त्यांनी त्याचेकडे दुर्लक्ष करायला सुरुवात झाली . नंतर या तयार प्रोजेक्टनी स्पर्धेत बक्षीस मिळवायला सुरुवात केली त्याच श्रेय पण शिक्षकांना मिळायला लागले मग काय ? तयार प्रोजेक्टला उत यायला सुरुवात झाली .
अशातच आठवी पर्यंत ढकललेली मुल अभियांत्रिकीला यायला सुरुवात झाली. महाविद्यालयांची संख्या वाढलेमुळे कमी गुणवत्तेची मुलेपण अभियांत्रिकी शिक्षणाला पसंती देउ लागली. या मुलांच्या बुद्धीचा वकूब ध्यानात न घेता त्यांचेवर प्रोजेक्ट लादायला सुरुवात झाली . त्यांना जमत कि नाही याचा विचार न करता नवीन कल्पना  आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या प्रोजेक्टची शिक्षकांनी मागणी करायला सुरुवात झाली. आता तर शिक्षक म्हणतात नामांकित जर्नल बघा आणि त्यातील कल्पनेवर प्रोजेक्ट करा .पेटंट करा. नामंकित जर्नल कुठून  मिळवायचं आणि ते कसं वाचायचं याबद्दल शिक्षकांनापण  माहिती नाही . विद्यार्थ्यांना विकत घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही.
अशा रीतीने मग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट डिग्री लेव्हलचा व्हायला लागला. डिग्रीच्या मुलाचा प्रोजेक्ट एम. इ. लेव्हलचा व्हायला लागला. मुलांच्याकडून अपेक्षा वाढू लागल्या. मग प्रत्येक शिक्षण पद्धती आपल्या ध्येयापासून हळूहळू ढळू लागली आणि गोंधळ व्हायला सुरुवात झाली . सुदैवाने आय. टी. आय.ने अजून ध्येयापासून फारकत घेतली नाही. त्यांनी आधीच आखून दिलेल्या सीमारेषेतच सर्व कार्य सीमित ठेवले. त्यामुळे आय. टी. आय. चे महत्व अजूनही कायम राहिले आहे . पण तंत्र शिक्षण आणि अभियांत्रिकी शिक्षणाचा पार बोऱ्या वाढायला सुरुवात झाली आहे.
आता गरज आहे शिक्षण तज्ञानी परत एकत्र येण्याची आणि या सगळ्या गोष्टीची पुनःर्रचना करण्याची...परत सीमारेषा आखण्याची ... हि ढासळत चाललेली उतरंड परत व्यवस्थित करणेची ..... शक्य तितक्या लवकर हे केलेच पाहिजे अजूनही वेळ निघून गेलेली नाही. नाहीतर .......

आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .

या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

भियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३७ )


*** विद्यार्थ्यासाठी मुल्यवर्धित प्रशिक्षणे ***
सध्या तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत आहेत . नवीन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जाणे गरजेचे आहे . ज्यामुळे त्यांना त्या विषयातील तज्ञाचे मार्गदर्शन व त्याचबरोबर प्रत्यक्ष कार्यानुभव मिळेल अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मुल्यवर्धित प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे आता निकडीचे झाले आहे . पण बऱ्याच ठिकाणी संस्थापाकानांच आणि व्यवस्थापन समितीलाच अशा प्रशिक्षणाचे महत्व माहीत नाही त्यामुळे आहे करी कुलममध्ये तर घ्यायलाच पाहिजे म्हणून वेगवेगळी एक दिवसीय, दोन दिवसीय मुल्यवर्धित प्रशिक्षणे कार्यक्रम आखले जातात.
केवळ घ्यायचे म्हणून गेली चारपाच वर्षात अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी जेव्हडे मुल्यवर्धित प्रशिक्षणे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले गेले त्यापैकी बरेच कार्यक्रम चांगल्या प्रतीचे नव्हते. निव्वळ कागदपत्र रंगवण्यासाठी घेतले होते त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला नाही . हा फीडबॅक एका बॅचकडून दुसऱ्या बॅचकडे गेला त्यामुळे आता विद्यार्थीच या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तयार नसतात . बऱ्याच ठिकाणी या प्रशिक्षणासाठी पैसेही हे विद्यार्थ्यांकडून घ्यायचे असतात पण वाईट पुर्वानुभावामुळे विद्यार्थी जास्त पैसे द्यायला तयार होत नाहीत .
चांगल्या प्रतीच्या प्रशिक्षक लोकांना त्यांचे मानधन देता येत नाही त्यामुळे स्वस्तामध्ये प्रशिक्षण देणारे शोधावे लागतात. स्वस्तात म्हणजे किती स्वस्तात तर दोन तासाचे करमणुकीचे कार्यक्रम घेणाऱ्या गावठी कलाकाराला सुद्धा जेव्हढ मानधन मिळत त्यापेक्षाही कमी पैशात यांना दोन दिवसाचे पूर्ण कार्यक्रम प्रात्यक्षिकासहित हवे असतात.
स्वस्तात प्रशिक्षण देणारे स्वत: हून शोधतच येत असतात . स्वस्तामध्ये प्रशिक्षण देणाऱ्यामध्ये बरेच जण तयार प्रोजेक्ट विकणारे प्रोजेक्ट विके असतात. त्यापैकी काहीजण तर त्याच महाविद्यालयातीलच हुशार माजी विद्यार्थी म्हणजे ज्यांना प्रात्यक्षिक ज्ञान चांगले आहे पण कुठे जॉब मिळाला नाही म्हणून तयार प्रोजेक्ट विकणारे प्रोजेक्ट विके बनलेले असतात . मग या लोकांना जर पैसे घेउन जर आपल्या उद्योगाची जाहिरात करायला मिळत असेल तर ते हसत तयार होतात. मग सुरु होते नवीन दुष्ट चक्र. या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला विद्यार्थ्यांना जास्त हुशार करायचे नसतेच मुळी आणि त्यांना कामाचा अनुभव जरी असला तरी विद्यार्थ्यांना विषय समजून सांगण्याची जी हातोटी आणि अनुभव नसतो. त्यामुळे थेअरीवर टाईम पास केला जातो. प्रात्यक्षिक घेतली जात नाहीत. जी घेतली जातात त्यामध्ये साहित्य अपुरे असते , हात लावायला मिळाले तरी भाग्य अशी अवस्था असते. अशा कार्यक्रमामुळे मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे ऐवजी भीती निर्माण होते. या मुलामध्ये रेडीमेड प्रोजेक्टची जाहिरात केली जाते आणि यातून प्रोजेक्ट ग्रूप मिळवले जातात आणि त्यांना प्रोजेक्ट विकले जातात.
NAAC किंवा NBA साठी व्यावसायिक करार करण्यासाठी व्यावसायिकांची गरज असते पण असे व्यावसायिक प्रत्येक शिक्षकाच्या ओळखीचे नसतात मग अशा प्रोजेक्टविक्या माजी विद्यार्थ्यापुढे आपोआपच पायघड्या घातल्या जातात. बऱ्याच महाविद्यालयात हि परिस्थिती अनुभवास येते .
पैशाबरोबरोबरच मोठा प्रश्न येतो तो म्हणजे वेळेचा. पुस्तकी अभ्यासावर अॅकेडेमिक कॅलेंडर आणि रोजच टाईमटेबलमध्ये इतका भर दिला जातो कि अशा कार्यक्रमासाठी वेळच बाजूला काढून ठेवेलेला नसतो किंवा एक दोन दिवस इतकाच वेळ ठेवलेला असतो जो खुपच अपुरा असतो. चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेणेसाठी किमान पाच दिवस बाजूला काढले पाहिजेत. पहिला दिवस तंत्रज्ञानाची परीपूर्ण माहिती , दोन दिवस त्यावर प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण आणि परत दोन दिवस केस स्टडी जी विद्यार्थ्याकडून करून घेणेसाठी असा कार्यक्रम आखला तरच त्या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. अजूनही आपल्याकडे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बाबतीत वर्कशॉप, सेमिनार यातला फरक लक्षात घेतला जात नाही . वर्कशॉपच्या नावाखाली सेमिनार घेतले जातात. स्लाईड शो केला जातो. बऱ्याचदा पाच दिवसाचे कार्यक्रम आखले जातात त्यात सुसूत्रता नसते. तीन चार वेगवेगळे टॉपिक एकत्र घुसडले जातात. तज्ञ व्याख्यात्यांची गर्दी केली जाते. भले हे व्याखाते त्या विषयातील नामांकित तज्ञ असतील पण त्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने ते त्या विषयाला न्याय देऊ शकत नाहीत.
मुल्यवर्धित प्रशिक्षण हे रोजच जेवणाबरोबर शारीरिक क्षमता वाढीस लागणेकरिता जसा पौष्टिक खुराक घ्यावा लागतो त्या प्रमाणे असतात . त्याची गुणवत्ता हि राखावीच लागते पण ज्याप्रमाणे खुराकाला खर्च जास्त येतो तसाच या मुल्यवर्धित प्रशिक्षणाबाबत असतं. या मुल्यवर्धित प्रशिक्षणाच महत्व आता लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यासाठी गुणवत्तापूर्ण मुल्यवर्धित प्रशिक्षण कार्यक्रम आखले पाहिजेत त्यासाठी पुरेशा खर्चाची आणि पुरेसा वेळ बाजूला काढून ठेवण्याची तयारी ठेवली पाहिजे.
या पूर्वीचे भाग वाचनेसाठी माझ्या dearengineers.blogspot.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Thursday, January 10, 2019

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३६ )

*** मान गमावून बसलेली मानांकने ***

एखादी गोष्ट एका वेळेनंतर जितकी चांगली करायला जाल तितकी ती जास्तच बिघडत जाते.
- मर्फीचा नियम
आजकाल बऱ्याच महाविद्यालयात गेलो कि NAAC, NBA हे शब्द ऐकू येतात. हि मानांकने असल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या सवलती मिळणार नाही अशी मेख मारल्यामुळे हे मिळवण्यासाठी सगळीकडे पळापळ सुरु आहे.
अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा राखणेसाठी किमान काय सोयी , सुविधा असाव्यात याचा विचार करून या मानांकना च्या नियम आणि अटी ठेवल्या आहेत आणि यावरच गुणदान/ श्रेणी ठरवले जाते.एक प्रकारची महाविद्यालयाचीच परीक्षा असते हि. पण तमाम परीक्षा पद्धतींना व्यवस्थितरित्या फाट्यावर मारायच्या मनोवृत्तीमुळे हि परीक्षा पण दिखावूपणा आणि कागदी घोड्याच्या जीवावर चांगल्या गुणानी (?) उत्तीर्ण केली जाते.
खोटी कागद जमा करण्यापेक्षा खरोखर काम केलेलं कधीही सोपं आहे पण संस्थाना त्या प्रोसेस मध्ये राहाण आवडत नाही मग सुरु होतो खोट्यांचा खेळ. मग हे खोटं खऱ्यामध्ये बदलण्यासाठी कॉलेजमध्ये उशीर पर्यंत थांबणे, सुट्टीच्या दिवशी कॉलेजमध्ये बोलावणे. व्हेकेशन बुडवणे हे उद्योग सुरु होतात आणि यामध्येही परत राजकारण सुरु होत.
मानांकन संस्थांच्या भेटीचा दिवस जवळ येत जातो तसतशी धावपळीला ऊत येतो. कोण कोण काय सल्ले देईल याचा काहींही नेम नसतो . अचानक फाईल बदलतात . मग परत पळापळ सुरु होते. शेवटच्या कालावधीमध्ये ज्या कॉलेजमध्ये मानांकन समिती येउन गेलं त्यांची कमिटी मार्गदर्शनासाठी बोलावली जाते . त्यांचे सल्ले घेतले जातात. आतातर या विषयावर मार्गदर्शन करणेसाठी बाजारात विशेष सल्लागार उपलब्ध आहेत . बजेट असेल त्यांनापण बोलावलं जात .ते पण पण सल्ले देत सुटतात आणि शेवटच्या क्षणी परत कागदे बदलायला लागतात. हि लोकं एव्हढा विचार का करत नाहीत कि त्या कॉलेजमध्ये जे परीक्षक येउन गेले आहेत तेच तुमच्या महाविद्यालयात येतील याची काय खात्री. त्यांची कॉपी मारत बसण्यात वेळ वाया घालवत बसण्याऐवजी आपण स्वत:चा वेगळा पॅटर्न का घडवत नाही.
आपल्याला परीक्षेशी मतलब . चांगली तयारी असेल तर पेपर कसाही निघो आणि परीक्षक कसाही तपासो मार्क्स मिळतातच हे शिक्षकांना समजत नाही याचं खूप मोठ दु:ख वाटत. इथं तर प्रश्न माहिती आहेत आणि त्याच उत्तरही काय असाव हे पण माहिती आहे मग ते उत्तर चांगल्याप्रकारे देता येईल याचा विचार कुणी करतच नाहीत.
एक मजेची बाब या कमिट्या येणार म्हणून जी महाविद्यालयाची रंग रंगोटी होते आणि जी अनावश्यक विचार न करता उधळपट्टी केली जाते. फालतू खरेदी होते तेव्हढा खर्च किंवा त्यापेक्षा निम्मा खर्च जरी विद्यार्थ्याच्या साठी चांगले प्रशिक्षण, सुविधा देण्यासाठी वापरले तरी जास्त मार्क मिळतील.
कमिटी येण्याच्या दिवशीच प्लानिंग म्हणजे खोटारडेपणा लपवण्यासाठी केलेली एक व्युव्ह रचनाच असते. त्यांना कुठे न्यायचं, त्यांना काय दाखवायचं , कुणाला पुढे करायचं. एक एक गोष्ट व्यवस्थितपणे ठरवलेली असते. कमिट्याना पण सगळ माहिती असत . कदाचित लोकांची पळापळ ते मस्त एन्जॉय करत असतात . व्यवस्थितपणे कमिटी पार पडते आणि सगळे हुश्श करतात.
खरी मजा येते ती कमिटी गेल्यावर . कमिटी गेल्यानंतर या कमिटीला या अमुक अमुक मजल्यावर येउन दिलं नाही किंवा अमुक अमुक काम आम्ही कसं व्यवस्थितपणे लपवलं , झाकून टाकलं या विषयीच्या बढाया मारायला सुरुवात होते . पण या बढाया मारताना आपण फसवणूक केलीय याची वाईट कस वाटत नाही हेच कळत नाही . हे म्हणजे असं झालं आहे कि तपासणी होणार म्हणून रोगयावर उपचार करायचा त्याला बर करायच सोडून पैसे देउन त्याच चांगल्या तब्येतीच फिटनेस सर्टिफिकेट मिळवायचं . सांगा कसा बरा होईल रोग आणि मग रोगी आय . सी. यु . मध्ये गेल्यावर रडून काय फायदा आहे काय?
येव्हढ सगळ केल्यावर शेवटी एकदा मानांकन मिळत पण सगळ्यांना माहिती असत कि ते मानांकन कसं मिळालं आहे. त्यामधील खरं किती आणि खोटं किती हे माहित असल्यामुळे त्यामुळे त्याच्याविषयी प्रेम आणि आदर वाटणे ऐवजी किळस आणि घृणा मनात येते. सुरुवातीला या मानांकन समितीना गांभीर्यान घेतलं जायचं पण पाकीट संस्कृतीने प्रवेश केल्यान या मानांकनानींच मान घालवून टाकला आहे.
एक मात्र खर कि विद्यार्थाला विषय समजणे ,त्याचा उपयोग त्यानं त्याच्या भावी आयुष्यासाठी व्हावा , त्यामुळे त्याचा वैयक्तिक उत्कर्ष व्हावा पर्यायाने समाजाचा आणि देशाचा आपोआपच होईल हा शिक्षण पद्धतीचा उद्देश असावा. सारे प्रयत्न हे विद्यार्थी घडवणेसाठीच व्हावे असा सोपा उद्देश शिक्षण पद्धतीचा असावा पण या ऐवजी लोकं जगवावीत हा झाला आहे आणि या नादात सगळ्या सोप्या गोष्टीच रॉकेट सायन्स बनवण सुरु झाल आहे.
या पूर्वीचे भाग वाचण्यासाठी dearengineers.blogspot.in या माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
शेअर करा ..
आपली मते ऐकण्यास/वाचण्यास आनंद होईल .
चित्तरंजन महाजन.
डॉल्फिन लॅब्स ,पुणे
९७६३७१४८६०

Tuesday, December 25, 2018

अभियांत्रिकी शिक्षण :- दशा आणि दिशा (भाग ३४ )

*** सुकनारं टॅलेंट आणि आटणार हार्डवर्क ***

मन्सूर खुदबुद्दिन सुतार माझा सहावीतील मित्र. दारूच्या आहारी जावून गेला हे ज्यावेळी मी ऐकल त्यावेळी मन चरकल. पाचवी आणि सहावीतील माझा जानी दोस्त. अवांतर वाचनाची पुस्तके ,वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक, वायरी , बॅटरीचे सेल,वायरी , बॅटरीचे बल्ब, डी.सी. मोटारी , टेपरेकॉर्डरची कॅसेट , वेगवेगळ्या आकाराची नट,बोल्टस असल्या गोष्टीमध्ये दोघानाही इंटरेस्ट. दप्तर अशा गोष्टीने भरलेल असायचं. कधीतरी आमच्या एखाद्या शिक्षकांना लहर आली तर ते म्हणायचे महाजन आणि मन्सूर आणा तुमची जादूची पोतडी पुढं. झालं मग आमच्या दप्तरांच छान पैकी डिसेक्शन व्हायचं.
मन्सूरला अभ्यासापेक्षा काहीतरी बनवण्यात खूपच इंटरेस्ट असायचा. त्यात त्याच्या वडिलांच वेल्डिंगच दुकानं मग काय गाड्यांचे वगैरे पार्टस बघायला मिळायचे आणि आमच्या कल्पनेची विमाने पुऱ्या ब्रम्हांडात भ्रमण करून यायची. त्यामुळे त्याचेबरोबर खुपच मजा यायची . पण एकच प्रॉब्लेम होता स्वारीला अभ्यासाचा खूपच कंटाळा. त्यामुळे गृहपाठ , परीक्षा गोष्टीत खूपच मागे होता . त्यामुळे छड्या वगैरे ठरलेलं असायच आणि मार्क्स पण पडायचे नाहीत. पण त्याचा विचार न करता त्याचं कल्पनेचं विमान सुसाट सुटलेलं असायचं आणि त्याच्या मागे बसायला मलाही आवडायचं. सातवीनंतर मी दुसऱ्या शाळेत गेलो. मग हळूहळू संपर्क तुटत गेला . कधी कधी त्याचेबरोबर भेट व्हायची नंतर पूर्ण संपर्क तुटला. तो काही जास्त शिकला नाही. लवकरच त्याने मशिनरी वगैरे दुरुस्तीची कामे घ्यायला सुरुवात केली होती. त्यात त्याचा चांगला जम बसला होता असं कळलं होतं. मनात खूप इच्छा असायची त्याला भेटायची पण गेली कित्येक वर्ष भेटच झाली नाही. आणि आता हि बातमी जेव्हा ऐकली तेव्हा खूपच वाईट वाटले.
मला वाटते आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी अशा गोष्टीचा अनुभव घेतला असेल. आपल्या वर्गात शिकणारी,आसपासची बरीच हरहुन्नरी मुले नंतर योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने वाया गेलेली तुम्हाला दिसतील. अशी मुले अभियांत्रिकी शिकत असतानाही आपल्याला भेटतात. यांची दुनिया वेगळी असते आणि त्यात डोकावण्यासाठी कुणाला वेळ नसतो. खऱ्या अर्थाने हि मुले टॅलेंटेड असतात पण हि मार्कांच्या पट्टीत कधीच बसत नाहीत. यांच मन असत कल्पनांनी भरलेल आणि तीच त्यांची ताकद असते. मन कल्पनेत वावरत असलेने यांना व्यवहार जमत नाही. त्यांच्या कल्पनेचा वेग आणि या जगाची चाल यांचेमध्ये खूपच फरक असतो.तसच अभियांत्रिकीचा बनलेला पुस्तकी अभ्यास त्यांना पेलत नाही कारण हा अभ्यासक्रम कल्पनांना वाव देत नाही तो टॅलेंटला वाव देणेसाठी नाही तर हार्डवर्क मोजण्यासाठी केलेला आहे . त्यामुळे हळूहळू यांच्या मनात डिप्रेशन येत, तासाला बसत नाहीत , दांड्या मारतात आणि हळूहळू व्यसनाचे आहारी जाताना दिसतात.
हि बाब फक्त विद्यार्थ्याबाबतच घडते असं नाही तर आपल्या अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रामध्ये काही शिक्षकाबाबतही घडत असते . काही शिक्षक असतात हुशार . सतत ते काहीना नवीन काही तरी करत असतात . त्यांना प्रयोग करणे आवडते. त्यांना पी. एच. डी. वगैरे कागदामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो. पण त्यांना वाव दिला जात नाही किबहुना त्यांना वाव देण्याची कोणती विशेष व्यवस्था आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये केलेली आढळून येत नाही. अशा व्यक्तींना कुजवन्यातच धन्यता मानली जाते. त्यामुळे अशा शिक्षकांचाही नंतर शिकवण्यातील रस निघुन जात आहे .
टॅलेंट आणि हार्डवर्क या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीत असणे हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे. आमच्याकडे हार्डवर्कला अतिशय महत्व दिलेलं आहे आणि त्यामुळे टॅलेंट सुकून जात आहे.
टॅलेंट म्हणजे झरा आणि हार्डवर्क म्हणजे भरलेल्या टाक्या. टॅलेंटनं हार्डवर्क करायचच नसत त्याला मुक्त सोडायचं असत . मुक्तपणे. या झऱ्याच पाणी उपसायच असत .त्याच्या कल्पनेवर काम करायला हार्डवर्क करणारी माणसे लावायची असतात. पण आमच्याकडे या झऱ्याभोवती कठडे केले जातात आणि यांच्या विहिरी बनवतात लागेल तेव्हा पाणी हापसतात आणि त्यांची तुलना साठवलेल्या पाण्याबरोबर करून परत त्याच विहिरीची टिंगल करतात. आता हळूहळू सगळीकडेच दुष्काळ पडत चालला आहे. हार्डवर्कपण आटत चालल्या आहेत. आता परत टॅलेंटला शोधून त्यांना जपलं पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्याची हार्डवर्क बरोबर व्यवस्थित सांगड घातली पाहिजे .नाहीतर भवितव्य अवघड आहे .